Shashi Tharoor On Operation Sindoor: काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी बुधवारी पाकिस्तानला कडक इशारा देत म्हटले की, भविष्यात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल. महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करताना, थरूर म्हणाले की, आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले आहेत. ‘इथून दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश आता दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,” असे थरूर यांनी पनामा येथील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करणाऱ्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या जागतिक स्तरावरील प्रचाराचा एक भाग म्हणून थरूर पनामाला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध राष्ट्रीय भूमिका मांडण्यासाठी हे शिष्टमंडळ अमेरिका, ब्राझील आणि कोलंबियासह देशांमध्ये पाठवले आहे.
भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या भीतीशिवाय जगण्याच्या शिकवणीवर भाष्य केले.
महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही
काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, “त्यांनी (महात्मा गांधी) आपल्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या धाडसी नेतृत्वातून आपल्याला हे देखील शिकवले की, आपण आपल्या हक्कांसाठी नेहमी उभे राहिले पाहिजे आणि भीतीशिवाय जगले पाहिजे. भारतात आपल्याला आज दहशतवाद्यांच्या भीतीशी लढावे लागत आहे, ज्या लोकांना जग दहशतवादी म्हणते, त्यांना असे वाटते की, ते आपल्या देशात येऊन, निष्पाप लोकांना मारून आपण काही मोठे राजकीय किंवा धार्मिक उद्दिष्ट साध्य करत आहेत.”
“कोणताही स्वाभिमानी देश अशा गोष्टींना बळी पडणार नाही आणि जेव्हा असे होईल तेव्हा महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ,” असे थरूर पुढे म्हणाले.
दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचाही पाठलाग केला पाहिजे
दहशतवाद सहन न करण्याच्या देशाच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, भारताने केवळ दहशतवाद्यांचाच नव्हे तर त्यांना मदत करणाऱ्या आणि पोसणाऱ्यांचाही पाठलाग केला पाहिजे.
“आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी दहशतवाद हा एक मार्ग असू शकत नाही. जर काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी इतर मार्ग आहेत. हे स्पष्ट आहे की, सीमेपलीकडे दहशतवाद्यांना पाठवणे हे अस्वीकार्य आहे,” असे पनामा येथे थरूर म्हणाले.