Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीला तिचा पती राजाची हत्या केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. सोनमचा तिच्या पतीच्या हत्येत सहभाग होता असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे. लुटीच्या उद्देशाने काही लोक आले, राजाला त्यांनी मारलं असं भासवून सोनमला काही काळ त्याची विधवा म्हणून राहायचं होतं. त्यानंतर तिला राज कुशवाह याच्याशी लग्न करायचं होतं. सोनम राज कुशवाहबाबत तिच्या कुटुंबाला समजावून सांगणार असं ठरलं होतं. मात्र एक चूक झाली ती खोटं बोलली आणि सगळा कट फसला. काही तपासकर्त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली आहे.

सोनम पोलिसांच्या रडारवर कशी आली?

राजा रघुवंशी पत्नी सोनमला घेऊन शिलाँग या ठिकाणी मधुचंद्राला गेला होता त्याच ठिकाणी त्याची हत्या झाली. राजा इंदूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. या हत्येचा तपास विशेष तपास पथकाकडून केला जातो आहे. दरम्यान बेपत्ता होण्यापूर्वी सोनमने तिच्या सासूला म्हणजेच राजा रघुवंशीच्या आईला फोन केला होता. मी आज उपास केला आहे, पतीच्या आरोग्यासाठी मी उपास करते आहे. जंगलात आम्हाला काही मिळणार नाही, आम्हाला जायचं आहे ती चढाई एकदम सरळ सरळ आहे. त्या ठिकाणी आम्ही मोठा झरा पाहण्यासाठी गेलो होतो असं सोनमने सासूला सांगितलं होतं. या फोनवरुन जेव्हा विशेष तपास पथकाने शोध घेतला तेव्हा त्यांना समजलं की ज्या हॉटेलमध्ये सोनम आणि राजा राहिले होते तिथे ती व्यवस्थित जेवली होती. तिने उपास वगैरे काहीही केला नव्हता. ती खोटं का बोलली असेल? हा प्रश्न पडला आणि पोलिसांच्या रडारवर सोनम आली. ज्यानंतर पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि सोनम राज कुशवाह या तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती हे पोलिसांना समजलं. पोलीस अधीक्षक विवेक सैयाम यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की हॉटेलवर सोनम जेवण करुन निघाली होती. त्यानंतर आम्ही तिचे कॉल रेकॉर्ड तपासले जेव्हा ती राज कुशवाहाच्या संपर्कात होती हे समजलं. राज कुशवाहा आणि सोनमचा कट असा होता की लुटीच्या उद्देशाने टोळी आली त्यांनी राजाची हत्या केली असं भासवायचं पण सोनम सासूशी आज उपास केला आहे असं खोटं बोलली आणि हा कट आहे हे पोलिसांना लक्षात आलं.

राजा आणि सोनम २३ मेपासून होते बेपत्ता

राजा आणि सोनम हे शिलाँगला हनीमूनसाठी गेले होते. त्यानंतर २३ मे रोजी ते दोघंही बेपत्ता झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह पोलिसांना १५० फूट दरीत सापडला. राजा आणि सोनम यांनी फिरण्यासाठी जी स्कूटर घेतली होती ती स्कूटर ज्या ठिकाणी होती तिथून २५ किमी अंतरावर हा मृतदेह आढळून आला. २३ मे ते २ जून इतका साधारण दहा ते ११ दिवसांचा कालावधी उलटला तरीही सोनम बेपत्ताच होती. सोनमचा शोध शोध पथकांनी आणि पोलिसांनी सुरुच ठेवला. ९ जूनच्या रात्री उत्तर प्रदेशातील गाझीपूर या ठिकाणाहून सोनमला अटक करण्यात आली. तपासकर्त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की सोनम तिच्या घरुन दागिने घेऊन निघाली होती. तिच्या नवऱ्यालाही तिने तुझ्याही सोन्याच्या वस्तू बरोबर घे असं सांगितलं होतं.

पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

पोलीस अधीक्षक विवेक सैयाम यांनी सांगितलं आम्ही जो तपास केला त्यात आम्हाला कळलं की राजा आणि सोनमने विमानाची तिकिटं बुक केली नव्हती. आधी ते गुवाहाटी या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी कामाख्या मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मेघालयातील शिलाँगला जायचं ठरवलं. मेघालय या ठिकाणी लुटीच्या घटना घडतात हे कदाचित सोनमला माहीत असावं किंवा राज कुशवाहाने तिला सांगितलं असावं. पण हे दोघं मेघालय या ठिकाणी का गेले याचा शोध आम्ही घेत आहोत. शिलाँग या ठिकाणीच राजाचा मृतदेह आम्हाला सापडला. एप्रिल महिन्यात एक हंगेरियन पर्यटकाचा मृतदेह ईस्ट खासी भागातच आढळून आला होता. ज्या तिघांनी राजाची हत्या केली त्यांना हॉटेलचं लोकेशन लाइव्ह लोकेशन हे सगळं सोनमने पाठवलं होतं. या तिघांनी गुवाहाटी या ठिकाणाहून दाओ हे हत्यार विकत घेतलं. राजा रघुवंशी आणि सोनम यांना आपण पर्यटक आहोत असं या तिघांनी भासवलं आणि ते तिघंही त्यांच्याबरोबर गेले. त्यानंतर राजाची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. या तिघांना राजा आणि सोनम यांच्यासह अल्बर्ट नावाच्या गाईडने पाहिलं होतं. त्याने पोलिसांना त्यासंबंधीचा जबाब दिला. त्यामुळे ही जटिल वाटणारी केस आम्हाला सोडवता आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Raja Raghuvanshi Murder Case
सोनम आणि राजा लग्नापूर्वी एकमेकांना ओळखत नव्हते. त्यांचे लग्न अरेंज मॅरेज होते, असे सोनमच्या वडिलांनी सांगितले आहे.(Photo: Social Media)

सोनम ट्रेनने उत्तर प्रदेशात आल्याची शक्यता

विवेक सैयाम यांनी सांगितलं सोनम ज्या कालावधीत बेपत्ता होती त्या कालावधीत ती बातम्या बघत होती. तिच्याकडे नवऱ्याजवळ असलेले पैसे आणि स्वतःजवळ असलेले पैसे होतेच. ती ट्रेननेच उत्तर प्रदेशला आली असावी असा संशय आम्हाला आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत. राज कुशवाहाला जेव्हा इंदूरहून आम्ही या प्रकरणात अटक केली तेव्हा सोनम शरण आली. सोनमला आता इतर आरोपींसह शिलाँगला आणलं जाईल. तिथे तिची चौकशी केली जाईल. हत्येची सुपारी देणाऱ्यांना तिने काय सांगितलं होतं? पैसे किती दिले? नेमकं काय घडलं या सगळ्याची उत्तरं तिला द्यावी लागणार आहेत.