काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी गांधी यांनी संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनाही निमंत्रण पाठवलं आहे. यावरून पक्षाचे नेते के. सी. त्यागी यांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीला नेत्यांना निमंत्रित करून पक्षात फूट पाडण्याचा सोनियांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली असून त्याचे निमंत्रण नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त जनता दलाला मिळालं आहे. अलिकडेच नितीशकुमार यांनी बिहारमधील महाआघाडीतून बाहेर पडून भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएशी हातमिळवणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसनं नाराज नेते शरद यादव यांना या बैठकीचं निमंत्रण पाठवलं आहे. यादव यांनी सध्या तरी नितीशकुमार यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचा त्यांनी उघडपणे विरोध केला आहे. भाजपशी हातमिळवणी केल्यानं त्यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे. सध्या यादव हे बिहारमध्ये रॅली काढणार आहेत. महाआघाडीतून बाहेर पडण्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयाबाबत ते जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या निमंत्रणानंतर शरद यादव विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थिती लावणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, आरजेडी, बसप, सप, डीएमके, रासप, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील, अशी चर्चा आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित राहतील, अशी चर्चा आहे.