Stampede in RCB Victory Parade आरसीबीने १८ वर्षांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला. ४ जूनला त्यांची विजयी परेड निघाली. या विजयी परेडच्या आधी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत ४७ जण जखमी झाले आहेत, चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिली आहे. या घटनेचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान नेमकं काय घडलं याचा थरार प्रत्यक्षदर्शीने सांगितला आहे. लोक पाण्यासाठीही तडफडत असल्याचं त्याने म्हटलं आहे.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
घडलेली घटना पाहून मी फार म्हणजे फारच निराश झालो. चिन्नास्वामी मैदानाच्या बाहेर असलेली गर्दी फुगत गेली, गर्दीचा प्रचंड लोट निर्माण झाला. मी मैदानाच्या ठिकाणाहून बाहेर पडायचं ठरवलं आणि मला तितक्यात समजलं की माझा मुलगाही तिथेच आहे आणि तो सापडत नाहीये, त्याच्याशी संपर्क होत नाहीये. माझ्या कुटुंबाने मला त्यासंदर्भातला मेसेज पाहिला. त्यानंतर त्या गर्दीत मी मुलाला फोन करायचा प्रयत्न केला. पण नेटवर्क नव्हतं. काही वेळ काळजीत गेला आणि तितक्यात माझ्या मुलाचा मेसेज आला की की मी गर्दीच्या पुढे उभा आहे. मी तोपर्यंत तो सगळा भाग सोडून घरी आलो होतो. मी माझ्या मुलाला तातडीने तिथून घरी निघून ये सांगितलं. तो त्या ठिकाणी गेला आहे हे मला माहीत नव्हतं. साधारण २० एक मिनिटं चिंतेत गेली. त्यानंतर माझ्या मुलाने माझ्या मुलीला तो गर्दीतून बाहेर पडल्याचं सांगितलं. तिने त्याला व्हिडीओ कॉल कर असं सांगितलं. त्याने व्हिडीओ कॉल केला आणि आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं तेव्हा कुठे आमचा जीव भांड्यात पडला. असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
लोक पाण्यासाठी तडफडत होते
या प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितलं, “मी त्या गर्दीत लोकांना मरताना पाहिलं. तिथे पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. लोक तडफडत होते. अनेक जण रडतही होते. चेंगराचेंगरी झाली तरीही त्या ठिकाणी प्रथमोपचार, रुग्णवाहिका यांच्यासारख्या सेवा उपलब्ध नव्हत्या. मी चिन्नास्वामी मैदानाबाहेर जे घडलं त्यासाठी पोलिसांना मुळीच दोष देणार नाही. उलट त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. अन्यथा किमान १०० लोकांचा जीव गेला असता. मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली कल्पना होती मग त्यांनी आधीच सगळी व्यवस्था का केली नाही?” असा सवाल या प्रत्यक्षदर्शीने केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर त्याने हे वक्तव्य केलं आहे.

४ जूनच्या दिवशी संध्याकाळी पावणेपाचच्या दरम्यान काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरी संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुरु झाली. चिन्नास्वामी स्टेडियम तिकिटधारकांसाठी खुलं होतं. अशात गेट क्रमांक १ उघडलं गेलं आणि फ्री येणाऱ्यांना तिथून प्रवेश देण्यास सुरुवात झाली ज्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. महेश, इनयानाथ या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार प्रत्येकजण त्या गेटच्या दिशेने धावत जाऊ लागले. अलोट गर्दी एकाच दिशेने धावली. सुरुवातीला तीन मुली खाली पडल्या आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली.