नवी दिल्ली : गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी वेगवेगळी पोटनिवडणुका घेण्याच्या निर्णयावर दाखल याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगास नोटीस जारी करून त्यांचे म्हणणे मागवले आहे. सुटीतील न्यायापीठाचे न्यायाधीश दीपक गुप्ता व सूर्यकांत यांनी याचिकेवरील सुनावणी २५ जूनला ठेवली आहे. यावर सुनावणी गरजेची आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

न्यायपीठाने सांगितले की, हा मुद्दा निवडणूक याचिकेतून उपस्थित करण्यासारखा नाही त्यामुळे त्यावर सुनावणी गरजेची आहे. वरिष्ठ वकील विवेक तनखा यांनी गुजरात काँग्रेसची बाजू मांडताना सांगितले की, यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने काही निकाल आमच्या बाजूने दिले आहेत. आम्ही यावर आताच काही सांगू इच्छित नाही, पण ही नैमित्तिक जागा आहे की वैधानिक रिकामी जागा आहे हे ठरवावे लागेल त्यामुळे त्यावर सुनावणी करण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले.

राज्यसभेच्या दोन जागा रिकाम्या असून केंद्रीय मंत्री अमित शहा व स्मृती इराणी हे दोन जण लोकसभेवर निवडून गेले आहेत त्यामुळे गुजरातमधील राज्यसभेत त्यांच्या जागा रिक्त आहेत.