बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी (दि. २६ मार्च) इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा केली. या चर्चेत जागावाटप निश्चित झाले असून जागावाटपाची अधिकृत यादी पटना येथून प्रसिद्द केली जाईल, अशी माहिती तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. काँग्रेस नेते मुकूल वासनिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह आणि प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांचीही उपस्थिती होती.

बैठकीनंतर काय म्हणाले तेजस्वी यादव?

“काँग्रेस, राजद आणि डावे पक्ष एकत्र मिळून लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. आजच्या चर्चेमध्ये जागावाटपावर सकारात्मक चर्चा झाली असून एकत्र लढण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. सर्व जागांवर सर्व पक्षांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल. याचा आम्हाला विश्वास आहे.” दरम्यान बिहारमध्ये काही जागांवर राजदने आपले उमेदवार जाहीर केले. त्यानंतर काँग्रेस नाराज असल्याचं बोलले जात होते. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि. २७ मार्च) अजून एक बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत जागावाटप निश्चित करून जाहीर केले जाऊ शकते, अशी शक्यता आहे.

Lok Sabha Election: भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी, मोदी, शाह, फडणवीस यांच्यासह ४० नावं

राहुल गांधी आणि लालू यादव यांच्यातील सौहार्द

इंडिया आघाडीच्या पहिल्या बैठकीत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी यांना सल्ला दिला होता की, दाढी कमी करा आणि लग्न करा. “राहुल गांधीनी भारत जोडो यात्रेतून अतिशय चांगले काम केले आहे, आता राहुलनी दाढी कमी करावी आणि लग्न करावे. सोनिया गांधी लग्नाबद्दल आमच्याकडे तक्रार करत असतात. त्यामुळे राहुलने आता आईचे ऐकले पाहिजे.” त्यानंतर राहुल गांधीनीही लालूप्रसाद यादवांना सांगितले होते की, “तूम्ही म्हणत असाल तर आता ऐकावे लागेल.” दरम्यान राहुल यांनी लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीशा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्वयंपाकाचे धडे घेतले होते.

भाजपाची नवी यादी जाहीर

भाजपाने रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी १११ उमेदवारांची नावे जाहीर केली, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री आश्विनी कुमार चौबे, व्हीके सिंग आणि खासदार वरुण गांधी यांना डावलून अभिनेत्री कंगना रणौत आणि अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे.

कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?

तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना संबलपूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा २०१९ च्या निवडणुकीत ओडिशामधील पूरी या मतदारसंघात पराभूत झाले होते, मात्र यावेळी त्यांना पुन्हा एकदा याच मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. संविधान बदलण्यासाठी भाजपला बहुमत हवे आहे, असे विधान करणारे उत्तर कन्नडमधून लोकसभेचे ६ वेळा खासदार राहिलेले माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांची पक्षाने यावेळी हकालपट्टी केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे विराेधकांनी भाजपाला चांगलेच लक्ष्य केले होते.