नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याची माहिती देताना केंद्र सरकारने ‘प्राइम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख केल्यामुळे तर्कवितर्काना पुन्हा उधाण आले असून भाजपेतर विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे ‘इंडिया विरुद्ध भारत’ वाद बुधवारी आणखी तीव्र झाला.

पंतप्रधान मोदी गुरुवारी इंडोनेशियामध्ये गुरुवारी होणाऱ्या २० व्या एशियन-इंडिया परिषद व १८ व्या ईस्ट एशिया परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्राच्या इंग्रजीमधील निवेदनामध्ये ‘प्राइम मिनिस्टर ऑफ भारत’ असे नमूद करण्यात आहे. त्यासंदर्भात भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यम व्यासपीठावरून बुधवारी माहिती दिली.केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राष्ट्रपतींच्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ या उल्लेखाचे समर्थन केले. संविधानामध्येच ‘इंडिया दॅट इज भारत’ असे नमूद केले आहे. दोन्ही शब्दांचा उल्लेख संविधानामध्ये केला आहे. लोकांनी संविधानातील हा उल्लेख जरूर वाचला पाहिजे. संविधानामध्ये ‘भारत’ या शब्दाचा अर्थही ध्वनित होतो. आपण भारत असे म्हणतो तेव्हा त्यातील भावार्थ, अर्थ आणि समज स्पष्ट दिसते. त्याचे प्रतििबबही संविधानामध्ये उमटलेले दिसते, असे जयशंकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>सनातन वादात योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज- मोदी

मोदी सरकारमधील मंत्री व भाजपचे नेते ‘भारता’ची बाजू समर्थपणे लढवत असले तरी, संविधानातील ‘इंडिया’ शब्द वगळण्यासाठी विशेष अधिवेशनामध्ये घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याबाबत केंद्र सरकारने अजूनही मौन बाळगले आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नकार दिला. ‘जी-२० समूहाच्या शिखर बैठकीची माहिती देणाऱ्या मोठ-मोठय़ा फलकावर इंडिया आणि भारत हे दोन्ही शब्द लिहिलेले आहेत’, असे त्यांनी सांगितले.

महाआघाडीसाठी ‘भारत’ आद्याक्षरांचा नवा प्रस्ताव

‘भारता’च्या अद्याक्षरांचा नवा अर्थ लावत काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी विरोधकांच्या महाआघाडीला ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असे नवे नाव सुचवले आहे. भाजपेतर महाआघाडीने ‘एलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मनी अँड रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो’ (भारत) असे नवे नाव घेतले तर भाजप काय करेल, असा सवाल थरूर यांनी इंडिया विरुद्ध भारत असा नाहक वाद घालणे भाजपने थांबवले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

हेही वाचा >>>SHOCKING: हुंड्यासाठी पत्नीचा अमानुष छळ, थेट हात बांधून विहिरीत लटकावलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लालुप्रसाद यांची टीका

‘इंडिया’मधील ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनीही या वादात उडी घेतली. इंडिया नाव ब्रिटिशांनी दिले असेल तर बदलून टाका. मात्र ब्रिटिशांनी उभारलेल्या हावडा पुलाचे काय करणार? ब्रिटिशांनी देशात ६३ हजार रेल्वे मार्ग बनवले होते, ब्रिटिशांनी उभ्या केलेल्या अनेक उद्योग-धंद्यांचे काय करणार, ब्रिटिशांनी बनवलेले रस्ते, बोगद्यांचे काय करणार, हिंमत असेल तर या सगळय़ा गोष्टी पुन्हा तयार करून दाखवा. तसे करण्याची क्षमता नसेल तर जनता आणि देशाला मूर्ख बनवणे बंद करा, असे खडे बोल लालूप्रसाद यांनी सुनावले.