हरिद्वारमधील एका दांपत्याने आपला मुलगा आणि सूनेविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. यामागील कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दांपत्याने आपला मुलगा आणि सून मूल जन्माला घालत नसल्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. जर मूल जन्माला घातलं नाही तर पाच कोटींची भरपाई द्यावी अशी या दांपत्याची मागणी आहे. वडील एस आर प्रसाद आणि त्यांच्या पत्नीने नातवंडं हवीत ही मागणी करत मुलगा आणि सूनेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. सर्व पैसा मुलाचं शिक्षण आणि त्यांच्या प्रशिक्षणावर खर्च केल्यानंतर आपल्याला आर्थिक समस्या जाणवत असल्याचं या दांपत्याचं म्हणणं आहे. "मी माझा सर्व पैसा मुलाला दिला. अमेरिकेत त्याला प्रशिक्षण दिलं. माझ्याकडे आता पैसा शिल्लक नाही. आम्ही बँकेतून कर्ज काढून घऱ बांधलं. आम्ही आर्थिकदृष्ट्या आणि वैयक्तिकदृष्ट्या त्रस्त आहोत. आम्ही याचिकेत मुलगा आणि सूनेकडून प्रत्येकी अडीच कोटींची मागणी केली आहे," असं एस आर प्रसाद यांनी एएनआयशी सांगितलं आहे. "२०१६ मध्ये त्यांचं लग्न झालं. त्यानंतर आम्हाला नातवंडांसोबत खेळायला मिळेल अशी आशा होती. मुलगा किंवा मुलगी काहाही असो…आम्हाला फक्त नातवंड हवं आहे," असं ते म्हणाले आहेत. प्रसाद याचे वकील ए के श्रीवास्तव यांनी या केसमुळे समाजातील सत्य समोर आल्याचं म्हटलं आहे. "ही केस समाजाला आरसा दाखवणारी आहे. आपण आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो, त्यांना चांगल्या कंपनीत काम करु शकतील इतकं लायक बनवतो. पालकांची आर्थिक काळजी घेणं मुलांची जबाबदारी आहे. दांपत्याने एक वर्षात नातवंड द्या किंवा पाट कोटी द्या अशी मागणी केली आहे".