त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपाने ‘चालो पालताई’ म्हणजे ‘चला बदल घडवूया’ असा नारा दिला होता. त्रिपुराच्या जनतेने भाजपाच्या याच नाऱ्यावर विश्वास ठेऊन तिथे सत्ता परिवर्तन घडवून आणले. आता भाजपाच्या याच बदलाच्या नाऱ्याचा त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या आधी माणिक सरकार यांची देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री अशी ओळख होती. त्यांची नैतिकता, प्रामाणिकपणाचे कौतुक व्हायचे.

पण आता याच माणिक सरकार यांनी सत्ताधारी भाजपाकडे राहण्यासाठी नवीन घर आणि एसयूव्ही कारची मागणी केली आहे. आपल्याकडे राहण्यासाठी कायमस्वरुपी घर नाहीय. त्यामुळे आपल्याला निवासासाठी घर उपलब्ध करुन द्यावे असे त्यांनी त्रिपुरा विधानसभेच्या सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. आगरतला येथे मिनिस्टर क्वार्टर लेनमध्ये तीन नवीन घरे बांधण्यात आली आहेत. तिथे माणिक सरकार यांनी घर मागितले आहे.

सरकार यांनी विधानसभेच्या सचिवांना पत्र लिहून घराची मागणी केली असून मतदारसंघांना भेटी देण्यासाठी इनोव्हा किंवा स्कॉर्पियो कार देण्याची तोंडी मागणी केली आहे. सीपीआय(एम)चे त्रिपुरा राज्याचे जे मुखपत्र आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे. माणिक सरकार यांच्या या मागण्यांवर भाजपाने टीका केली आहे. निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना सरकार यांनी त्यांच्या हातात १५२० रुपये दाखवले होते तर उर्वरित २४१० रुपये बँकेत जमा असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्रीपदावर असताना मिळणारा संपूर्ण पगार ते पक्षाला दान करायचे.