करोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यानंतर आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झगडणाऱ्या आपल्या देशाला याच बेरोजगारीच्या आणखी मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी केंद्राने पॅकेज जाहीर करावं अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. सध्या सरकारने काय केलं नाही काय करायला हवं होतं या सगळ्या चर्चांची वेळ नाही. सध्या एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करायला हवा असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्या आर्थव्यवस्थेवर प्रचंड तणाव येणार आहे. मात्र या संकटाचा सामना करावाच लागणार. सध्याच्या घडीला माणसाचं आयुष्य वाचणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. मात्र त्याचवेळी व्हायरस आपली अर्थव्यवस्था नष्ट करणार नाही याचीही काळजी आत्तापासून सरकारने घ्यायला हवी असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- १० लाख लोकांमागे फक्त १९९ चाचण्या, राहुल गांधींनी सांगितल्या १० महत्वाच्या गोष्टी

लघू उद्योगांना, शेतकऱ्यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच भारत एकजूट करुन उभा राहिला तर या संकटाचा सामना अतिशय आरामात करु शकतो. या व्हायरसला हरवू शकतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आणखी वाचा- आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही – राहुल गांधी

प्रत्येक आठवड्याला मजुरांना, गरीबांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू, १ किलो साखर आणि १ किलो डाळ मोफत द्यावं. आपली धान्याची कोठारं भरली आहेत ती अशा संकटाच्या काळात खुली करावीत असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. तसंच जे आर्थिक संकट आपल्यासमोर येणार आहे त्यासाठी सरकारने आत्तापासून तयारी करायला हवी असंही ते म्हणाले आहेत.