Poorva Choudhary: या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालांवरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारी पूर्वा चौधरी या वादाच्या केंद्रस्थानी आहे. देशातून ५३३ वा क्रमांक मिळवणारी पूर्वा चौधरी सोशल मीडियावर तिचा निकाल शेअर केल्यानंतर चर्चेत आली. यानंतर युजर्सनी तिच्यावर ओबीसी आरक्षण आणि नॉन-क्रीमी लेअर कोट्याचा गैरवापर करून परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान गेल्या वर्षी महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थ अधिकारी पूजा खेडकरवर ओबीसी आरक्षणाच्या गैरवापरासह अनेक आरोप झाले होते. त्यानंतर तिला सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
पूर्वा चौधरीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याची पोस्ट केल्यानंतर सुरुवातीला कमेंट सेक्शनमध्ये तिचे अनेकांनी अभिनंदन केले. मात्र काही वेळातच अभिनंदनाचे रूपांतर टीकेत झाले. यावेळी अनेक युजर्सनी तिच्या श्रीमंत पार्श्वभूमीचा उल्लेख करून आरक्षणाच्या लाभांसाठी तिच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने पोस्ट केली आहे. यामध्ये पूर्वा चौधरीचे कथित फोटो शेअर करत म्हटले आहे की, “अलीकडेच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पूर्वा चौधरीकडे ४ लाखांची बॅग आहे. ती परदेशात पर्यटनासाठी जाते. तिचे वडील प्रशासकीय अधिकारी आहेत. तरीही तिने ओबीसी आरक्षण आणि नॉन-क्रीमी लेअर कोट्याचा वापर करून परीक्षा उत्तीर्ण केली. यूपीएससी मध्ये आणखी एक घोटाळा.”
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “पूर्वा चौधरी ओबीसी आरक्षण लाभ घेताना दिसत आहे. पण तिचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहिले तर तिची भव्य जीवनशैली लक्षात येईल. आरक्षण व्यवस्था सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांना न्याय देण्यासाठी आहे की ‘विशेषाधिकृत’ मागासलेल्यांसाठी यशाची शिडी?”
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यानंतर, या वादाच्या पार्श्वभूमीवर, पूर्वा चौधरीने तिचे इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केले आहे.
दरम्यान, राजस्थान प्रशासकीय सेवेत असलेले पूर्वा चौधरीचे वडील ओमप्रकाश सहारन यांनी त्यांच्या मुलीचा बचाव करताना म्हटले की, “वयाच्या ४० व्या वर्षापूर्वी थेट आरएएस भरतीच्या बाबतीत, ओबीसी नॉन-क्रीमी लेयर लाभ लागू होत नाही. मी ४४ व्या वर्षी आरएएस अधिकारी झालो. त्यामुळे, माझ्या मुलीने प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.”
इंडिया टुडेशी बोलताना, सध्या राजस्थानमधील कोटपुतली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले सहारन म्हणाले की, टीकाकारांना पात्रता निकषांबद्दल चुकीची माहिती मिळाली आहे. यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले की अपात्रतेचा नियम फक्त वर्ग १ च्या सरकारी पदांवर नियुक्त किंवा पदोन्नती झालेल्यांनाच लागू होतो, ही अट त्यांच्या मुलीच्या बाबतीत लागू होत नाही असे ते म्हणतात.