देवभूमी अशी ओळख असलेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. खुद्द मुख्यमंत्री हरीश रावत यांचा हरिद्वार ग्रामीण व किच्छा या दोन्ही मतदासंघात पराभव झाला आहे. त्यांचा पराभव पचवणे काँग्रेसला चांगलेच जड जात आहे. दरम्यान, भाजपने उत्तराखंड स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून कोणाला पुढे केले जाते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सध्या सत्पाल महाराज, यशपाल आर्य आणि त्रिवेणीसिंह रावत यांची नावे चर्चेत आहेत.
या तिघांमध्ये सत्पाल महाराज व यशपाल आर्य ही उत्तराखंड राजकारणातील सक्रीय व लोकप्रिय व्यक्तीमत्वं आहेत. तिसरे नाव त्रिवेणीसिंह रावत हे धक्कदायक नाव असू शकतं. राज्याचा प्रमुख म्हणून नवा चेहरा आणायचे धोरण अवलंबल्यास त्रिवेणीसिंह रावत यांना संधी मिळू शकते. ज्याप्रमाणे हरियाणामध्ये मनोहर खट्टर यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्याचप्रमाणे त्रिवेणीसिंह रावत यांनाही संधी मिळू शकते. रावत हे संघाशी संबंधित असून त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे.
दुसरे नाव आहे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सत्पाल महाराज. सत्पाल महाराज हे १९९१ मध्ये केंद्रात रेल्वे राज्यमंत्री होते. ते गढवाल मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर गेले होते. वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सत्पाल महाराज यांचे नाव हे सत्पालसिंह रावत असे आहे. आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांना सर्वजण सत्पाल महाराज म्हणतात. चौबट्टापाल मतदारसंघातून या निवडणुकीत विजयी झाले. सत्पाल महाराज यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. राज्यात ते चांगलेच लोकप्रिय आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंडमध्ये येऊन गेले. त्यावेळी त्यांनी सत्पाल महाराज यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीकडे त्यावेळी राजकीयदृष्टया पाहिले गेले होते.
जर भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा विचार केला तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले यशपाल आर्य हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरू शकतात. यशपाल आर्य हे राज्यातील एक दलित नेते असून त्यांनी यापूर्वी विजय रावत यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे. परंतु त्यांना संधी दिल्यास पक्षीतील एकनिष्ठ नेत्यांवर अन्याय झाल्यासारखे होऊ शकते. म्हणून कदाचित यांचं नाव मागं पडू शकते. यापूर्वी मुख्यमंत्रीपद भूषवलेले रमेश पोखरियाल ‘निशंक’, बी.सी. खंडुरी यांची नावं सध्या तरी चर्चेत नाही.