Narendra Modi On Vande Mataram 150 years : भारताचं राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (७ नोव्हेंबर) दिल्लीत ऐतिहासिक कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी एक स्मारक टपाल तिकीट आणि एक स्मारक नाणं दखील प्रकाशित केलं.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताचं महत्त्व नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हे या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचं भाष्य देखील केलं आहे. ‘वंदे मातरम्, हे शब्द एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न, एक संकल्प आहेत’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“वंदे मातरम्, हे शब्द एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न, एक संकल्प आहेत. वंदे मातरम् हे शब्द भारतमातेची भक्ती आहेत, भारतमातेची आराधना आहेत. एवढंच नाही तर वंदे मातरम् हे शब्द आपल्याला इतिहासात परत घेऊन जातात आणि आपल्या वर्तमानाला नवा आत्मविश्वास आणि आपल्या भविष्याला प्रेरणा देतात. वंदे मातरम् हे शब्द म्हणजे असा कोणताही संकल्प नाही जो साध्य करता येत नाही, असं कोणतंही ध्येय नाही जे आपण साध्य करू शकत नाही, म्हणजेच वंदे मातरम्”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

‘वंदे मातरम् स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बनलं होतं’

“वंदे मातरम् हे शब्द आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतात. आपल्याला हे शब्द बळ देतात. हे गीत पिढ्यानपिढ्या भारतीयांच्या हृदयात उत्साह आणि देशभक्ती निर्माण करतं. वंदे मातरम् केवळ एक गीत नव्हतं तर स्वातंत्र्यलढ्याचा आवाज होता. ज्यामुळे प्रत्येक क्रांतिकारी भारत माता की जय म्हणू लागला. याच भावनेने देशाला गुलामगिरीतून मुक्त होण्याची ताकद दिली. गुलामगिरीच्या काळ्या काळात, वंदे मातरम् हा भारतमातेच्या मुक्तीचा मंत्र बनला. या गाण्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात हा संकल्प जागृत केला की भारतमातेची मुले स्वतःचं भाग्य स्वतः बनवती”, असं मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “हे येणारे वर्ष देशाच्या एकतेचं, अखंडतेचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक बनेल. हा उत्सव भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि आजही आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आत्म्याला पुनरुज्जीवीत करेल. “वंदे मातरम् हा केवळ इतिहास नाही, तर तो भारताच्या अस्तित्वाची ओळख आहे”, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.