भाजपाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा या आधीच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्यानंतर आता भाजपाच्या अजून एक राष्ट्रीय प्रवक्त्या शाझिया इल्मी चर्चेत आल्या आहेत. नुपूर शर्मांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आल्यानंतर झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, शाझिया इल्मी यांच्या एका विधानाला विश्व हिंदू परिषदेनंच तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. तसेच, यासंदर्भात भाजपानं तातडीने खुलासा करावा, अशी मागणी देखील विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. हे प्रकरण आहे बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींची झालेली सुटका आणि त्यानंतर झालेल्या सत्काराचं! नेमकं झालं काय? शाझिया इल्मी यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस'मध्ये लिहिलेल्या लेखावरून विश्व हिंदू परिषदेनं आक्षेप घेतला आहे. या लेखामध्ये इल्मींनी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या सुटकेवर आक्षेप घेतला आहे. गुजरात सरकारच्या या निर्णयाशी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीही संबंध नाही, असंही इल्मी यांनी या लेखात म्हटलं आहे. मात्र, विश्व हिंदू परिषदेला खरा आक्षेप त्यानंतरच्या उल्लेखावर आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचा सत्कार करणारे विश्व हिंदू परिषदेचे लोक होते, असा दावा इल्मींनी या लेखात केला आहे. विश्व हिंदू परिषदेची आगपाखड 'द इंडियन एक्स्प्रेस'ला पाठवलेल्या टिप्पणीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रवेश कुमार चौधरी यांनी इल्मींचा लेख म्हणजे विश्व हिंदू परिषदला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचा दावा केला आहे."शाझिया इल्मी या दिल्लीच्या उच्च वर्गातल्या अशा गटाचं प्रतिनिधित्व करतात जो चुकीची माहिती पसरवण्यासाठी ओळखला जातो.त्यांना संघाची विचारसरणी काय हे माहिती नाही. विशेषत: विश्व हिंदू परिषदेनं हिंदू संस्कृतीसाठी केलेलं काम त्यांना माहिती नाही", असं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे. "त्या गुन्हेगारांचा सत्कार करणारे विश्व हिंदू परिषदेचे नव्हते. जिथे सत्कार झाला, ते कार्यालय देखील आमचं नव्हतं", असाही दावा चौधरी यांनी केला आहे. दरम्यान, शाझिया इल्मींनी शनिवारी रात्री उशिरा केलेल्या ट्वीटमध्ये यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. "जर त्या गुन्हेगारांचा सत्कार करणारे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य नव्हते, तर मी माझ्या विधानासाठी माफी मागते", असं या ट्वीटमध्ये इल्मी यांनी म्हटलं आहे.