Vijay Rupani : अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर या सगळ्यांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही बसले होते. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. ही ओळख आता डीएनए चाचणीमुळे पटली आहे अशी माहिती समोर आली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने ११ वाजून १० मिनिटांनी दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबाला देण्यात आलं.

गुजरातचे आरोग्य मंत्री काय म्हणाले?

गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ३२ जणांचे डीएनए जुळले आहेत. तर १४ कुटुंबीयांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याचं पार्थिव दिलं आहे. अनेक मृतदेह भीषण जळालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे डीएनए चाचणी करुनच ते त्यांच्या नातेवाईकांना दिले जात आहेत असंही पटेल यांनी स्पष्ट केलं. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

विजय रुपाणींचा विमान अपघातात मृत्यू

एअर इंडियाच्या एआय १७१ या विमानाच्या अपघाताने देशभरात खळबळ उडाली आहे. या विमान दुर्घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे हे एआय १७१ विमान होते. प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचादेखील समावेश होता. या अपघातात त्यांचादेखील मृत्यू झाला आहे. विजय रुपाणी हे लंडनला त्यांच्या मुलाला आणि पत्नीला भेटण्यासाठी जात होते. त्यांनी सीटचा लकी नंबर घेतला होता. मात्र हा लकी नंबरही त्यांना वाचवू शकला नाही.

विजय रुपाणी कोण होते?

१) विजय रुपाणी यांनी १९८७ मध्ये राजकारणात पदार्पण केले होते, परंतु २०१४ साली त्यांना विधानसभेची जागा जिंकण्यात यश आले. रुपाणी भाजपातील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजपा) स्वतःसाठी एक मजबूत पाया रचला होता.

२) आनंदीबेन यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली, तेव्हा त्यांच्या सर्व प्रयत्नांना यश मिळाले होते. ते ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

३) विजय रुपाणी यांचा जन्म बर्मामधील यांगून येथे झाला होता आणि लहान वयातच ते त्यांच्या पालकांसह भारतात आले.
शिक्षण घेत असतानाच त्यांची ओळख भाजपाची वैचारिक शाखा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (आरएसएस)शी झाली आणि ते संघात सामील झाले.

४) मुख्य म्हणजे महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी राजकारणात सक्रियपणे भाग घेण्यास सुरुवात केली.

५) १९८७ मध्ये ते भाजपाचे उमेदवार म्हणून राजकोट महानगरपालिकेत निवडून आले आणि अखेर १९९६ मध्ये महापौर झाले.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते हळूहळू यशाचे टप्पे गाठत होते. १९९८ मध्ये ते भाजपा राज्य युनिटचे सरचिटणीस झाले आणि २००६ मध्ये त्यांना राज्यसभेवर नामांकन मिळाले.

६) २००६ ते २०१२ या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.