Donald Trump On India Vs Pak : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती सांगितली जाते. मात्र, यानंतर दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविरामाचा करार झाल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव कमी झाला. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी आपण पुढाकार घेतल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे.

एवढंच नाही तर भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर शस्त्रविरामाचा तोडगा काढल्याचा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती. तसेच अनेकदा पत्रकार परिषदेत देखील याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा भारताने फेटाळून लावलेला आहे. दरम्यान, यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठं भाष्य केलं आहे. ‘भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नही निकालात काढू’, असा नवा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या काश्मीरच्या वादावर भाष्य केलं. तसेच हा काश्मीर प्रश्नही ते निकालात काढू शकतात असं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी हे भाष्य केलं. या संदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिलं आहे. ट्रम्प यांनी दावा केला की त्यांनी दोन्ही देशांशी त्यांच्यामधील दीर्घकालीन संघर्षाबद्दल आपण बोललो होतो.

‘काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा’

भारताने याआधीही अनेकदा काश्मीरबाबतची भूमिका जगासमोर मांडलेली आहे. भारताने सातत्याने सांगितलं आहे की काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे. तसेच यामध्ये तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही. त्यामुळे भारताने अशा प्रकारच्या तिसऱ्या देशाची यामध्ये मध्यस्थी नाकारलेली आहे आणि पाकिस्तानबरोबरचे सर्व मुद्दे द्विपक्षीय आणि शांततेने सोडवले पाहिजेत अशी भूमिका याआधी अनेकदा भारताने मांडलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की त्यांनी फोनच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान संघर्ष टाळला. त्यांनी म्हटलं की, “मी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवलं आणि हे मी व्यापाराच्या माध्यमातून केलं. मला वाटत नाही की कोणीही याबाबत लिहिलं असेल”, असंही त्यांनी म्हटलं आहे.