BJP Leader Dilip Ghosh Unhappy: पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारला लक्ष्य करून २४ तासही उलटत नाहीत, तोच राज्यातील भाजपातून थेट केंद्रीय नेतृत्वावरच नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खुद्द पश्चिम बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीच दिलेल्या सूचक प्रतिक्रियांमधून त्यांची नाराजी व्यक्त होत असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील भाजपात सारंकाही आलबेल नसल्याचंच यातून स्पष्ट होत असून अमित शाह यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीलाही दिलीप घोष यांना आमंत्रित करण्यात आलं नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

नेमकं काय घडतंय पश्चिम बंगालमध्ये?

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे वरीष्ठ केंद्रीय नेते अमित शाह यांनी रविवारी पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत भाष्य केल्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही लक्ष्य केलं. यानंतर अमित शाह यांनी भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ही बैठक ‘ऑपरेशन बंगाल’चा भाग असल्याचंही बोललं जाऊ लागलं आहे.

पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवूनच अमित शाह यांनी ही बैठक घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, इतक्या महत्त्वाच्या बैठकीला खुद्द बंगालच्या प्रदेशाध्यक्षांनाच आमंत्रित केलं नसल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. खुद्द दिलीप घोष यांनीच यासंदर्भात माहिती दिल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

काय म्हणाले दिलीप घोष?

या बैठकीसाठी अनुपस्थित राहिल्याबाबत विचारणा केली असता दिलीप घोष यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “मला या बैठकीचं आमंत्रण नव्हतं. मला वाटतं भाजपाच्या इतरही अनेक नेत्यांनादेखील आमंत्रण नव्हतं. अशा परिस्थितीत संघटनेत बैठकीला बोलावण्या किंवा न बोलावण्याबाबत कोणतेही ठोस नियम नाहीत. आता तेच लोक सांगू शकतात की त्यांनी मला या बैठकीसाठी आमंत्रित का केलं नव्हतं”, असं घोष म्हणाले. “आता नव्या लोकांना पक्षाकडून जबाबदारी देण्यात आली आहे. हे नवे लोक त्या बैठकीला उपस्थित होते. ते आता निर्णय घेतील आणि आम्ही ते निर्णय पाळू”, अशा सुरात दिलीप घोष यांनी आपली भूमिका मांडली.

दिलीप घोष-ममता बॅनर्जी भेट

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर पक्षांतर्गत तणावाची चर्चा सुरू झाली. अनेक स्थानिक भाजपा नेत्यांनी दिलीप घोष तृणमूलशी जवळीक वाढवत असल्याचा आरोप करतानाच पक्षाच्या हितसंबंधांना धक्का पोहोचत असल्याची तक्रार केली आहे. दिलीप घोष यांना अमित शाह यांच्या बैठकीला न बोलावलं जाण्यामागे त्यांच्या या भेटीगाठीच कारणीभूत असल्याचंही सांगितलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.