पीटीआय, कोलकाता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी असलेला तृणमूलचा नेता शहाजहान शेख हा ‘सीमेपलीकडे पळून गेला असावा’ अशी चिंता व्यक्त करतानाच, त्याला तत्काळ अटक करावी आणइ त्याच्या दहशतवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांचा तपास करावा, असे निर्देश पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ‘शेख याचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत’, या राज्यपालांच्या वक्तव्यावर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने रविवारी जोरदार टीका केली. राज्यपालांना या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलीस प्रमुखांना दिले, असे राज भवनाने शनिवारी रात्री जारी केलेल्या निवेदनात नमूद केले. शेख याचा ठावठिकाणा निश्चित करण्याच्या आणि योग्य ती कारवाई करण्याच्या आवश्यकतेवर राज्यपालांनी भर दिला. शेख याने सीमा ओलांडली असावी असा आरोप करतानाच, त्याच्या दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांची तत्काळ चौकशी केली जावी, असे या निवेदनात म्हटले आहे. हेही वाचा >>>बांगलादेशात कमी मतदान; विरोधी पक्षांच्या बहिष्काराचा फटका ‘त्यांच्या वक्तव्याला काय आधार आहे हे आम्हाला माहीत नाही’, असे तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले. घटनेनुसार, रज्यपाल राज्य सरकारशी सल्लामसलतीने काम करतात. त्यामुळे कुठल्याही ठोस अहवाल किंवा पुराव्याशिवाय ते असे मत व्यक्त करू शकत नाहीत, असेही घोष म्हणाले. तृणमूल काँग्रेस पक्षात मतभेद नाहीत, अभिषेक बॅनर्जीचा दावा डायमंड हार्बर: पक्षाच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस एकसंध असून, जुने सदस्य आणि नवी पिढी यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी सांगितले. आपल्याला पक्षात निष्क्रिय राहायचे आहे असे वृत्त ‘चुकीचे व निराधार’ असल्याचे सांगून, असलेले अभिषेक यांनी ते फेटाळून लावले.