प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला २३ सप्टेंबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील रांची येथे हिरवा झेंडा दाखवला होता. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेचा उद्देश १२ कोटींहून जास्त गरीब कुटुंबांना (अंदाजे ५५ कोटी लाभार्थ्यांना) उपचारासाठी प्रति कुटुंब दरवर्षी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करणे हा आहे.
या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक-आर्थिक जात जनगणना २०११ मधील (एसईसीसी २०११) निकषांवर आधारित कुटुंबांचा समावेश आहे. पीएम-जेएवाय ही योजना आधी राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना (एनएचपीएस) म्हणून ओळखली जात होती, नंतर या योजनेचं नाव बदलण्यात आलं, तसेच त्याचा विस्तारही करण्यात आला.
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता
आयुष्मान भारत योजनेसाठी कच्चे घर असणारे लोक, भूमिहीन लोक, ग्रामीण भागात राहणारे लोक, तृतीयपंथी, दारिद्र्यरेषेखालील लोक , अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक (EWS) तसेच कमी उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकतात आहेत. जे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, मजुरी करून उदरनिर्वाह करतात ते सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
PMJAY योजनेत कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?
आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना सुलभ आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने आयुष्मान भारत योजना योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रति कुटुंब दरवर्षी ५ लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळते.
एबी-पीएमजेएवाय अंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या आरोग्य विम्यात वैद्यकीय तपासणी, कन्सल्टेशन व उपचार, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या सेवा, नॉन-इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह केअर, औषधं आणि वैद्यकीय वस्तू, आजाराचे निदान आणि लॅब टेस्ट, राहण्याची व्यवस्था, आवश्यक असल्यास मेडिकल इम्प्लांट, अन्नांची सोय, उपचारांशी संबंधित गुंतागुंत आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या १५ दिवसांचा खर्च अशा विविध घटकांचा समावेश आहे.
PMJAY योजनेत कोणत्या गोष्टींचा समावेश नाही?
इतर आरोग्य विमा पॉलिसींप्रमाणे, आयुष्मान भारत योजनेतही काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत.
- आउट पेशंट डिपार्टमेंट (ओपीडी) खर्च
- औषधं
- कॉस्मेटिक सर्जरी
- प्रजनन समस्यांशी संबंधित उपचार
- इंडिव्हिज्युअल डायग्नोसिस
- अवयव प्रत्यारोपण
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोणत्या आजारांवर उपचार होतात?
या योजनेंतर्गत करोना, कॅन्सर, किडनीचे आजार, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघे आणि हिप रिप्लेसमेंट, वंध्यत्व, मोतीबिंदू अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात.
तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आयुष्मान कार्ड काढायचे असेल तर तुम्ही कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा उल्लेख असलेले ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आणि इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा UTI-ITSL केंद्रावर जा. तिथे पात्रता तपासा, तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवून मिळेल.