Marriage एका विवाहितेने केलेल्या Reddit वरुन केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरुन चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. लग्न करुन काय फायदा? खूप जबाबदाऱ्या अंगावर पडतात असं या महिलेने म्हटलं आहे. तिची ही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. या महिलेच्या पोस्टवर विविध युजर्सनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे महिलेची पोस्ट?
एका विवाहितेने Reddit वर पोस्ट केली आहे. ती म्हणते भारतात महिलांनी लग्न करुन काय फायदा? समजा मी अविवाहित आहे आणि नोकरी करते आहे. मला आईच्या हातचा गरमगरम चहा सकाळी उठल्यावर मिळतो. माझा नाश्ता तयार असतो. मी चहा, नाश्ता झाला की ऑफिसला जाते. शांतपणे काम करुन घरी येते. पण हेच जर माझं लग्न झालं असेल तर सकाळी लवकर मलाच उठायचं आहे, चहा, नाश्ता, लाँड्रीतले कपडे ने -आण करणं शिवाय सगळ्या कुटुंबाची काळजी घेणं हे सगळं मलाच करायचं आहे. भारतीय महिलांनी विवाह करुन फायदाच काय? खूप साऱ्या जबाबदाऱ्या अंगावर पडतात.” असं या महिलेने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मला अनेकजण सल्ले देतील…
पुढे ही महिला म्हणते, “मला लोक सल्ला देतील की तू जर पैसे कमावते आहेस तर लग्नानंतर स्वयंपाक करण्यासाठी बाई ठेवू शकतेस. झाडू, पोछा आणि भांडी घासण्यासाठीही बाई ठेवू सकतेस. पण त्या बायकांना पगारही मलाच द्यावा लागेल ना? पण मी जर घरकाम करत असेन तर माझ्या नवऱ्याला पगार मिळवणारी घरकाम करणारी बाई मिळेल. मग मला सांगा भारतीय महिलांनी लग्न करुन फायदाच काय? लग्नानंतर मला पगार मिळत राहिल, पण जे अनोळखी होते त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल. मग मी काय चुकीचं बोलते आहे?” असे प्रश्न या महिलेने तिच्या पोस्टमधून उपस्थित केले आहेत.
महिलेची पोस्ट व्हायरल, युजर्स म्हणतात…
या महिलेने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. काहींनी तिला सल्ले दिले आहेत तर काहींनी तिची बाजू घेतली आहे. काहींनी लग्न करणं म्हणजे तडजोड असते ती महिलांना करावीच लागते वगैरे म्हटलं आहे. एक युजर म्हणतो तुला लग्न करायचं आहे की वेगळं राहायचं आहे? हे एकदा ठरव. तू आणि तुझा जोडीदार, तुझा पती दोघंही कमवणारे असाल तर घरकाम करणाऱ्या बायकांचा खर्च तुम्ही अर्धा अर्धा उचलू शकता. शिवाय डबल पगारही घरात येईल. तुझ्यासाठी ही विन विन सिच्युएशन असेल. तुला लग्न करायचं नसेल तर करु नकोस, पण त्यामुळे या संस्काराला नावं ठेवू नकोस असंही एका युजरने म्हटलं आहे. आणखी एक युजर म्हणतो तू लग्न कसं करतेस? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अनेकदा अनेक पुरुष हे स्त्रियांना पूर्ण पाठिंबा देणारे, त्यांच्या मागे भक्कम आधार म्हणून उभे असतात. अशा पुरुषाशी लग्न केलंस तर तुझं काहीही अडणार नाही. शिवाय लग्न हे काही फायद्यांची किंवा तोट्यांची यादी मोजण्याची गोष्ट नाही असंही तिला एका युजरने सांगितलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.