पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजप आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार केला. यादरम्यान युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी ट्वीट करत काही शंका उपस्थित केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता विश्लेषण : पंतप्रधान मोदींचा ताफा अडवणारी शेतकरी संघटना अजूनही आंदोलन का करत आहे?; जाणून घ्या…

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.

“याच भाजपाने आपल्यावर पाण्याचा मारा केला आणि कुंपण…”, शेतकरी नेत्याने बसवर उभे राहून मानले आंदोलकांचे आभार, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान श्रीनिवास यांनी ट्वीट करत यावेळी आंदोलकांच्या हातात भाजपाचा झेंडा का होता? असा प्रश्न विचारला आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “जर हे लोक आंदोलनकर्ता होते तर त्यांच्या हातात भाजपाचा झेंडा का होता? पंजाब पोलिसांनी यांना रोखलं नाही तर केंद्र सरकारच्या अख्त्यारित असणाऱ्या एसपीजी सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीजवळ का येऊ दिलं? आयबी अधिकारी कुठे होते? ते मोदी जिंदाबादच्या घोषणा का देत होते?”.

दरम्यान याआधी श्रीनिवास यांनी “Modi ji, How’s the Josh? #Punjab” असं ट्वीट केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या ट्वीटमुळे पंजाब सरकारवर अनेकांनी संशय़ व्यक्त केला.

तसंच याआधी पावसाचा आणि त्यामुळे सभेच्या ठिकाणी उडालेल्या गोंधळाचा व्हिडीओ श्रीनिवास यांनी ट्विटरवरुन शेअर केला होता. पंतप्रधान मोदींच्या हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाच्या ठिकाणी होणाऱ्यासभेमधील हा व्हिडीओ शेअर करत श्रीनिवास यांनी मोदींवर निशाणा साधला होता.

श्रीनिवास यांनी, “कथित सुरक्षेमधील चूक” या कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सभेच्या ठिकाणी पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. मात्र त्याचबरोबर सभेसाठी मंचासमोर मांडण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसताय. सभेच्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांच्या रांगांमध्ये उभं राहून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचं दिसतेय. हा व्हिडीओ आधी मैदानाच्या मागील बाजूस आणि नंतर मंचाकडे पॅन होऊन सभेसाठी मैदानामध्ये गर्दी नसल्याचं दर्शवत आहे. या व्हिडीओमधून श्रीनिवास यांना सुरक्षेत चूक झाली म्हणून नाही तर रिकाम्या खुर्चांमुळे पंतप्रधानांनी सभा रद्द केली, असं सूचित करण्याचा प्रयत्न केला.

खराब हवामानामुळे ऐनवेळी बदल

विधानसभा निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरे करत आहेत. पंजाबमध्ये मोदींची पहिलीच निवडणूक जाहीरसभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मोदी बुधवारी भटिंडा विमानतळावर उतरले, तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. पाऊस पडत असल्याने व खराब हवामानामुळे मोदी विमानतळावर २० मिनिटे थांबले होते. पण, दृष्यमानता कमी असल्याने कारने स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदींचा ताफा रस्त्याच्या मार्गाने दोन तास प्रवास करणार असल्याची माहिती पंजाबच्या पोलीस महासंचालकांना कळवण्यात आली. संपूर्ण नियोजित मार्गावर आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आल्याची पोलीस महासंचालकांकडून खात्री करून घेतल्यानंतर मोदींचा ताफा विमानळावरून रवाना झाला, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘मी जिवंत परतलो..’

शेतकरी आंदोलकांनी ताफा अडवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माघारी परतावे लागल़े ‘मी भटिंडा विमानतळावर जिवंत परतलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद कळवा’ अशी उपरोधिक टिपण्णी मोदी यांनी पंजाबच्या अधिकाऱ्यांना उद्देशून केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth congress national president srinivas b v tweet over pm narendra modi security lapse sgy
First published on: 06-01-2022 at 13:08 IST