Difference Between Yatra And Jatra : जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत महाराष्ट्रात अनेक छोट्या- मोठ्या गावांमध्ये जत्रा भरतात. कोकण, विदर्भ, मराठवाडा, खान्देश या सर्व ठिकाणी विविध देवी-देवतांच्या उत्सवांनिमित्त किंवा आनंदासाठी म्हणून या भव्य जत्रांचे आयोजन केले जाते. तसेच महत्त्वाच्या सणांनिमित्तही विविध ठिकाणी यात्रा भरत असतात. गावोगावी खंडोबा, म्हसोबा, आंगणेवाडी यांसह अनेक देवी- देवतांच्या जत्रा भरत असतात. तर, खास देव-देवतांच्या पूजेसाठी यात्रा होत असतात. उदा. पंढरपूरची यात्रा, आळंदी यात्रा, अमरनाथ यात्रा. पण, जत्रा आणि यात्रा या दोन्ही शब्दांमध्ये नेमका फरक काय? आणि ते कोणत्या अर्थाने वापरले जातात? जाणून घेऊ.
जत्रा आणि यात्रा या शब्दांत नेमका फरक काय?
जत्रा आणि यात्रा म्हणजे एक उत्सव असतो. या दोन्ही गोष्टी आपल्या लोकसंस्कृतीशी संबंधित असून, त्या महत्त्वाच्याही आहेत. दरम्यान, या दोन्ही शब्दांचा नेमका अर्थ काय हे आपण ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ….

हे दोन्ही शब्द केव्हापासून प्रचलित झाले?

जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द लोक एकाच अर्थाने वापरतात. धार्मिक कार्यासाठी एकत्र आलेला, जमलेला मेळा असा त्यांचा अर्थ. पण, लोकभाषा आणि परंपरेने चालत आलेल्या अर्थांकडे पाहिल्यानंतर या दोन्ही शब्दांच्या अर्थांचे वेगळेपण नजरेत येते.
वारकरी कधी पंढरपूरची जत्रा म्हणत नाहीत; तसेच म्हसोबाची यात्रा, असे कधी म्हटले जात आहे. रूढ संकेतांनुसार जिथे गोड नैवेद्य असतो, ती यात्रा असते; तर खारा नैवेद्य असतो, ती जत्रा असते. पण, हल्ली तसे संकेत कुणी पाळत नसले तरी ताईबाईची ती जत्राच आणि पंढरपूरची ती यात्राच.

यात्रेचा असाही एक अर्थ सांगितला जातो आणि तो म्हणजे देवाच्या दर्शनासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो, त्याला यात्रा असे म्हणतात. हा प्रवास सहसा धार्मिक / आध्यत्मिक श्रद्धा म्हणून केला जातो. मग तो पायी असू शकतो किंवा कसाही. जसे की पंढपूरची यात्रा, काशी यात्रा, अमरनाथ यात्रा, जगन्नाथ पुरी रथयात्रा. ठरलेल्या देवी-देवतांचे दर्शन घेऊन आल्यानंतर यात्रा पूर्ण झाली, असे मानले जाते. यासाठी लोक एकत्र मिळून प्रवास करतात. या यात्रा अनेक गाव, वस्ती, वाड्यांना भेट देत पुढे सरकतात आणि इच्छित स्थळी जाऊन थांबतात.

पण, यात्रा केवळ देव-देवतांपुरत्याच मर्यादित नाहीत. हल्ली आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, अनेक राजकीय पक्षदेखील भव्य यात्रांचे आयोजन करताना दिसतात. उदा. भाजपाची महाजनादेश यात्रा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीभारत जोडो न्याय यात्रा इ.

तर, जत्रा ही स्थिर असते. बहुतेक ठिकाणी एखाद्या देवी-देवतांच्या मंदिरांलगत दोन दिवस किंवा आठवडाभर अशा जत्रा भरविल्या जातात. जत्रांमध्ये खाण्यापिण्यासह, विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी स्टॉल्स असतात. लहान, तसेच मोठ्यांसाठी आकाशपाळण्याासह अनेक खेळ असतात. या जत्रांमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तसेच सर्व जाती-धर्मांतील समुदाय या जत्रेत मोठ्या आनंदाने सहभागी होताना दिसतात. जत्रा या मजा-मस्तीसाठी असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्येही अशा भव्य जत्रांचे आयोजन केले जाते. या जत्रांमध्ये लोक करमणुकीसाठी एकत्र येत असतात. जत्रा कधी विशिष्ट लोकसमुदायाशी संबंधित असतात किंवा राजकीय… जसे की, मालवणी जत्रा, वर्सोव्यात कोळी समाजाकडून आयोजित केली जाणारी जत्रा. पण, अशा जत्रांमधून सामाजिक एकोपा जपला जातो. तसेच जत्रांमागील कारण काही का असेना; पण ते अनेकांसाठी आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र असते. तसे विविध राजकीय पक्षांच्या आमदार, खासदारांकडूनही आपापल्या विभागात भव्य जत्रांचे आयोजन केले जाते.