“ते सारसबाग का काही तरी इकडेच आहे ना? काय म्हणालीस काही तरी ? ‘सारसबाग…’ अभिमानाने नाव घ्यायचं हा सारसबागेचं”, हा डायलॉग ऐकला की तुम्हाला ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटातील मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीचा ‘तो’ सीन नक्कीच आठवला असेल. अनेक रहिवासी आणि पर्यटकांनी पुण्यातील ही प्रसिद्ध सारसबाग तर नक्कीच पहिली असेल. पण, या सारसबागेला नावं कसं पडलं? ही सारसबाग नक्की कुणी बांधली? या ठिकाणाला सारसबाग हेच का नाव देण्यात आलं? हे आज आपण या लेखातून पाहणार आहोत.

लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात सारसबाग कुणी बांधली याची एक रंजक गोष्ट सांगितली आहे. पुण्यातील सारसबाग, पर्वती टेकडी, तळ्यातला गणपती या ठिकाणांना अनेक इतिहासप्रेमी, सकाळी व्यायाम करणारे, तर देवदर्शनास येणाऱ्या अनेक पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी दिसते.

तर गोष्ट अशी की, श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी वाढत्या पुणे शहराच्या नियोजनेत वाढ व्हावी , त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून वेळोवेळी भरपूर मेहनत घेतली. त्यांनी इसवी सन १७५५ ला पर्वतीच्या पायथ्याला आंबील ओढ्यावर दगडी धरण बांधून २५ एकर क्षेत्राचे मोठे तळे बांधले आणि आंबील ओढ्याचा प्रवाह बदलला. १७ महिने या तळ्याचे बांधकाम चालू होते. त्यावेळी हे बांधकाम करण्यास ४,९९,५५३ रुपये इतका खर्च झाला. तर या बांधलेल्या तळ्यात एक छोटे बेट राखून तिथे एक बाग बांधली. बेटावर निरनिराळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गशोभा वाढविण्यात आली. त्यानंतर इसवी सन १९६० नंतर पुणे नगरपालिकेने तळ्याच्या जागेवर मातीची भर टाकून स्वच्छता करून बाग तयार केली. तिचे नाव सारस नावाच्या पक्षावरून ‘सारसबाग’ असे ठेवण्यात आले. या सारसबागेत गणेश मूर्ती संग्रहालयसुद्धा आहे.

हेही वाचा…‘सँडहर्स्ट रोड’च्या नावाचा प्लेग आजाराशी काय आहे संबंध? जाणून घ्या रेल्वेस्थानकाची रंजक गोष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर नानासाहेबांनी राखलेल्या सारसबागेच्या बेटावर पुढे त्यांच्या नातवाने म्हणजेच श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी इसवी सन १७८४ मध्ये एक दगडी मंदिर बांधले. तेथे उजव्या सोंडेच्या संगमरवरी गणेशाची स्थापना केली आहे. हे सिद्धिविनायकाचे मंदिर तळ्यात असल्याने त्याचे नाव ‘तळ्यातला गणपती’ असे रूढ झाले. हिवाळ्यात या गणपतीच्या मूर्तीला स्वेटरसुद्धा परिधान केला जातो. कधीकाळी नानासाहेब पेशवे पर्वतीचे देवदर्शन करून या तळ्यातल्या व भोवतालच्या बागांमध्ये विरंगुळ्यासाठी येत होते. तर आज आपण सारसबाग आणि तळ्यातला गणपती ही प्रसिद्ध ठिकाणे कोणी बांधली आणि ठिकाणांचा इतिहास थोडक्यात जाणून घेतला.