मुंबईला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण म्हणजे गेट वे ऑफ इंडिया आणि हॉटले ताज. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या पूर्वेस अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर गेटवे ऑफ इंडिया स्थित आहे. ताजमहाल हे मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल आहे. कुलाब्याजवळ गेट वे ऑफ इंडियाच्या समोर दोन इमारती आहेत. गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातच ताज महाल हॉटेल आहे, त्यामुळे अनेकांना वाटतं की, गेट वे ऑफ इंडिया ताजपेक्षा जुना आहे, पण तसं नाहीये… या परिसराचा रंजक इतिहास काय आहे, जाणून घेऊ येऊ या.

ताज हॉटेल जुनं की गेट वे ऑफ इंडिया? असा प्रश्न अनेकांना पडतो, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ताज महाल हॉटेल हे प्रथम बांधण्यात आले होते. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया बांधण्यात आले होते. हॉटेल ताज हे १६ ऑक्टोबर १९०३ रोजी बांधण्यात आले होते, त्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच ४ डिसेंबर १९२४ रोजी गेट वे ऑफ इंडिया उभारण्यात आला. या दोन्ही वास्तूंच्या इतिहासावर ओझरती नजर टाकू या….

अपोलो बंदर

गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलबाबत जाणून घेण्यापूर्वी अपोलो बदंरबाबत जाणून घ्या. अपोलो बंदर हे खरं नाव नाही. या बंदराचं खरं नाव पालवा बंदर आहे. या बंदरावर पालवा नावाचा मासा पकडून आणण्यात आला होता, त्यामुळे या बंदराचं नाव पालवा बंदर ठेवण्यात आलं. ज्याचा उल्लेख पोर्तुगिजांनी पोलेम असा केला. पोलेमचं इंग्रजीमध्ये (पॅलो) Pallo झालं आणि पॅलोचं नंतर अपोलो झालं. हे मुंबईचे औपचारिक प्रवेशद्वार होते, कारण महत्त्वाचे लोक या बंदरावर येत असत. याला आता गेट वे ऑफ इंडिया असे म्हणतात.

हेही वाचा – ‘मिठी’ कोपली, मुंबई बुडाली, माणसं वाहिली; २६ जुलैला नेमकं काय घडलं आणि का घडलं? जाणून घ्या

हॉटेल ताज

टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी इंडियन हॉटेल कंपनीची (आयएचसीएल) स्थापना १८९९ मध्ये केली. भारतात पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा त्यांचा मानस होता. अरबी समुद्राच्या साक्षीने १६ ऑक्टोबर १९०३ रोजी पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले. स्वत: जमशेटजींनी लंडन, पॅरिस, बर्लिन, डुसेलडॉर्फ इथून सामान, फर्निचर, अंतर्गत सजावटीच्या कलात्मक वस्तू मागवल्या होत्या. हॉटेल ताज मुंबापुरीचं सरताज ठरलं. तेव्हापासून ताज हॉटेलची साखळी भारतभर पसरत गेली. आज एक ताज महाल पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच एका हॉटेलचीच टोलेजंग इमारत दिसते. या दोन वेगवेगळया इमारती दिसत असल्या, तरीसुद्धा या दोन्ही इमारती ताज महाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. या दोन्ही इमारतींच्या बांधकामाचे आराखडे वेगवेगळ्या कालावधीमध्ये व वेगवेगळ्या वास्तुशास्त्रज्ञांकडून आखण्यात आले आहेत.

पहिल्या महायुद्धाच्या वेळेस या हॉटेलचे रूपांतर ६०० पलंगाच्या हॉस्पिटलमध्ये झाले होते. त्यानंतर २००८ च्या अतिरेकी हल्ल्याने मुंबईबरोबर सारं जग हादरलं; पण हॉटेल ताजवरील हल्ला काळजावर ओरखडा उमटवणारा होता. अतिरेक्यांनी या वास्तूची निवडच भारतीयांच्या गौरवावर घाला घालण्यासाठी केली होती. २०१० मध्ये या हल्ल्याच्या खुणा तशाच जपत पूर्वीच्या तोऱ्याने ताज पुन्हा उभे राहिले आहे.

हेही वाचा – Video : दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातील या पुलास ‘भिडे पूल’ हे नाव कसे पडले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेट वे ऑफ इंडिया

इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या १९११ सालच्या ऐतिहासिक भेटी स्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. स्वागतासाठी त्यावेळच्या अपोलो बंदराच्या पायथ्याशी मोगलाई थाटाचा तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता. भेटीच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी स्मारक उभारण्याची योजना आखण्यात आली. जॉर्ज विट्टे या वास्तुविशारदाच्या कल्पनेतून साकार झालेली ती वास्तु म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया. हे ४ डिसेंबर १९२४ साली लोकांसाठी खुले करण्यात आले. गेटवे ऑफ इंडिया सोळाव्या शतकातील गुजराती धर्तीच्या शिल्पकेलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पिवळ्या बसातर दगडात ह्या वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे. आजही हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे येतात. ही वास्तु ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू ठरली आहे.