बारामती भाजपचा विजय झाल्यास आपण राजकारणामधून निवृत्ती घेऊ असं माजी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. बारामतीच्या काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन पण भाजपला बारामती जिंकता आली नाही तर त्यांनी निवृत्ती घ्यावी’ असं आव्हानही अजित पवरांनी केलं आहे. आज तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघामध्ये आज मतदान होणार आहे. यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा मुद्दा बनवलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. बारामतीचा गड १०० टक्के राखणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास अजित पवार यांनी मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.

बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पावर यांची कन्या आणि सध्याच्या विद्यामान खासदार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या समोर भाजपाच्या कांचन कुल यांचे आव्हान आहे. त्यामुळे हा मतदारसंघात रंगतदार लढत होणार आहे.

दरम्यान आज तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये नेत्यांच्या मुलांचे मतदारसंघ असल्याने या नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुप्रिया सुळे, सुजय विखे-पाटील, नीलेश राणे, रक्षा खडसे, विशाल पाटील या नेतेमंडळींच्या मुलासुनांचे भवितव्य आज ठरणार आहे.