लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या बारामतीत नुकतंच मतदान पार पडलं. मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाचे काही प्रकार उघडकीस आले. याबाबत सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघाला दृष्ट लागली असंही मत व्यक्त केलं. आता चौथ्या टप्प्यासाठी प्रचार सुरु झाला आहे. अशात अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. साहेब नसते तर दादा म्हशी वळत असते असं एक जण म्हणाला त्यावर अजित पवारांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत का जाऊन बसलो?

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी सभा घेतली. यावेळी अजित पवारांनी पंतप्रधानांबाबतही भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते ते येण्यापूर्वी माझं भाषण झालं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले आणि मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत तात्पुरता जाऊन बसलो, का? तर मोदींना मी कांदा निर्यातीचा प्रश्न सांगितला. निर्यातबंदी हटवण्याची विनंती केली. त्यानंतर काय झालं ते तुम्हाला माहीत आहे असंही अजित पवार म्हणाले.

हे पण वाचा- अजित पवारांचा सवाल, “मी आईबरोबर मतदान करायला गेलो तर तुमच्या पोटात का दुखलं?”

राजकीय जीवनात मी चूक केली

अजित पवार पुढे म्हणाले, राजेश टोपे सगळ्या आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन शरद पवारांकडे गेले. आम्ही सगळे त्रासलो होतो. शरद पवार आम्हाला म्हणाले राजीनामा देतो. भावनिक राजकारणच मला नको आहे. मी माझ्या राजकीय जीवनात चूक केली ती म्हणजे या ठिकाणाहून अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलं. आता माझी चूक तुम्ही सुधारा असं आवाहन अजित पवारांनी केली.

अरे बाबा मी शेतकऱ्याचा मुलगा आहे

“एक जण म्हणाला अजित पवारांना शरद पवारांनी संधी दिली नसती तर अजित पवार म्हशी सांभाळत असते. अरे बाबा वळल्या असत्या म्हशी. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्यात काय? ” असं शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जी सभा घेतली त्यात अजित पवारांनी हे भाष्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बारामतीत साठीच्या आतील आणि तरुण मंडळी म्हणायचे आम्हाला अजित दादा हवा. पण साठीच्या पुढची मंडळी म्हणायचे, नको राव उतार वयात पवार साहेबांसोबत राहू, असं भावनिक राजकारण केल्यानं विकास होत नाही”, असंही अजित पवारांनी सांगितलं. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समोर आला. या मतदानाच्या आधी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. रोहित पवारांनी जेव्हा भावनिक आवाहन केलं तेव्हा तशाच पद्धतीने रडून दाखवत अजित पवारांनी त्यांची खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा म्हशी वळवण्याच्या वक्तव्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. जे चांगलंच चर्चेत आहे.