भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल (दि. ७ मे) बंगळुरु येथे विद्यार्थिनींसह ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर ते म्हणाले की, ‘द केरल स्टोरी’ने नव्या प्रकारचा दहशतवाद उघड केला आहे. जेपी नड्डा यांच्यासोबत दक्षिण बंगळुरुचे खासदार तेजस्वी सूर्यादेखील चित्रपटाच्या शोला उपस्थित होते. आयनॉक्स बंगळुरु येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष शोचे आयोजन केले होते. या शोला उभय नेत्यांसह विद्यार्थिनींची उपस्थिती होती. ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरून सध्या मोठा गजहब सुरू असून त्या पार्श्वभूमीवर या शोचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटकमध्ये मागच्या वर्षीपासून महाविद्यालयात हिजाब बंदी आणि लव्ह जिहाद अशा मुद्द्यांनी मोठे वादळ निर्माण झालेले पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे भाजपाने आपल्या प्रचारात या चित्रपटाचा मोठ्या खुबीने वापर केलेला दिसून येत आहे.

“‘द केरल स्टोरी’मुळे नव्या प्रकारचा दहशतवाद समोर आहे, ज्यामध्ये कोणताही दारूगोळा वापरला जात नाही. विषारी दहशतवादाचा चेहरा यामुळे उघडा पडला. दहशतवादी कारवायांसाठी बंदुका, शस्त्र, बॉम्ब लागत होते, असे आजवर आम्ही ऐकले होते. मात्र चित्रपटात दाखविलेला दहशतवाद हा अतिशय धोकादायक आहे. हा दहशतवाद कोणत्याही राज्यात तसेच धर्माशी निगडित असू शकतो,” अशी प्रतिक्रिया नड्डा यांनी चित्रपट पाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

जेपी नड्डा पुढे म्हणाले, “आपली तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जात आहे, त्यांच्यावर कशा पद्धतीने प्रभाव टाकला जातोय, यावर या चित्रपटाने प्रकाश टाकला आहे. ‘द केरल स्टोरी’ने अतिशय विखारी प्रचार आणि षडयंत्र उघडे पाडले.” तसेच केरळ उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शन रोखण्याची याचिका फेटाळल्याकडेही नड्डा यांनी लक्ष वेधले. न्यायालयाने देखील ही बाब गंभीरतेने घेतली असून आपले निरीक्षण नोंदविले आहे, असे ते म्हणाले.

आपल्या तरुणांची दिशाभूल केली जात आहे. ज्यातून माघारी फिरण्याचा रस्ता नसलेल्या वाटेवर ते चालू लागतात. डोळ्यांत अंजन घालणारे हे वास्तव चित्रपटात दाखविण्यात आले असून सर्वांनीच हा चित्रपट पाहावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

हे वाचा >> ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील दावे किती खरे? ३२ हजार तरुणींचे धर्मांतर झाल्याचा आकडा कुठून आला?

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये ३२ हजार मुलींचे धर्मांतर करून त्यांना इसिस या संघटनेत सामील करण्यास भाग पाडले असल्याचा दावा करण्यात आला होता. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही लोकांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेऊन या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावत असताना त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचा निकाल दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘द केरल स्टोरी’बाबत काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा उल्लेख बेल्लरी येथील प्रचार सभेत केला होता. १० मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा झंझावात सध्या कर्नाटकात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “‘द केरल स्टोरी’ चित्रपटाबाबत खूप चर्चा होत आहे. देशाला आतून पोखरून काढण्याचीही चर्चा यानिमित्ताने होत आहे. केरळसारख्या सुंदर राज्यात, ज्या ठिकाणचे लोक खूप मेहनती आणि हुशार आहेत, अशा राज्यात काय षडयंत्र चालले आहे, यावर ‘द केरल स्टोरी’ चित्रपट उत्तम भाष्य करतो. पण देशाचे दुर्दैव बघा, देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या दहशतवादी तत्त्वांसोबत काँग्रेस पक्ष उभा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशमध्ये येत्या वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक रविवारी म्हणाले की, जर राज्यात ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त करण्याचा प्रस्ताव आला तर राज्य सरकार त्यावर निश्चित विचार करेल.