लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार देशभरात ४०० हून जास्त जागा जिंकू, असा दावा करणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाला ४०० नाही तर ३०० जागांचा टप्पा गाठणंही अशक्य दिसत आहे. खासकरून उत्तर प्रदेश, राजस्थान व हरियाणा या तीन राज्यांचे निकाल भाजपाला धक्का देणारे आहेत. महाराष्ट्रातही महायुतीची कामगिरी फार चांगली नाही. या निवडणुकांच्या निकालांवर भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी मोदींची हुकुमशाही मानसिकता असल्याचंही त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. “भाजपा कमीतकमी २२० जागा जिंकेल असा अंदाज मी वर्तवला होता, तो आता समोर आलेल्या २३७ या आकडेवारीच्या अगदी जवळ जाणारा आहे. भाजपानं माझा सल्ला ऐकला असता तर त्यांना ३०० चा आकडा गाठता आला असता. पण, दुर्दैवाने मोदींच्या हुकूमशाही मानसिकतेमुळे भाजपा खड्ड्यात गेली आहे, ज्यातून आता पक्षाला बाहेर पडावं लागेल,” अशी सूचक पोस्ट सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशसह ‘ही’ दोन राज्ये NDA च्या हातातून निसटणार? निकालांबद्दल महाराष्ट्रातील भाजपा नेते म्हणाले, “नेमकं काय…”

आतापर्यंत हाती आलेले कल पाहता भाजपा २९१ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीचे उमेदवार २३३ जागांवर पुढे आहेत. १९ जागांवर इतर आघाडीवर आहेत. यावर्षी ४०० हून अधिक जागा मिळवणार असा विश्वास भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला होता, पण ही आकडेवारी पाहता मतदारांच्या मनात मात्र बदलाचे वारे वाहत होते, हे स्पष्ट झालं आहे. अनेक दिग्गज भाजपा नेत्यांना काँग्रेसनी पिछाडीवर टाकलं आहे. यात ओम बिर्ला व स्मृती इराणी यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. दोनवेळा अमेठीतून खासदार झालेल्या स्मृती इराणी यांना काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मांनी मागे टाकलं आहे. सुरुवातीपासूनच शर्मा आघाडीवर तर इराणी पिछाडीवर आहेत. निकालांचे कल असेच राहिले तर दोनवेळा केंद्रात मंत्री राहिलेल्या स्मृती इराणी यांना यंदा मात्र संसदेत जाता येणार नाही.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थान व हरियाणामध्ये भाजपाने २०१९ मध्ये सर्व जागा जिंकल्या होत्या, पण इथेही चुरशीची लढत पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचे कल पाहता भाजपाला आपले गड राखता येणार नाही असंच दिसतंय. सर्वाधिक ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीने जबरदस्त पुनरागमन केलं आहे, याठिकाणी सपाचे उमेदवार ३५ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.