लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा अवघ्या तीन दिवसांवर आला तरी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाने स्वतःकडे घेतल्यानंतरही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आपला दावा सोडलेला नाही. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, आजही जोरदार शक्तिप्रदर्शनाने त्यांचा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे विशाल पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

विशाल पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीने मोठी चूक केली आहे. भाजपाचा पाडाव करण्यासाठी सक्षम उमेदवार देणे आवश्यक होते. पण तसे घडलेले नाही. म्हणून आपण अर्ज भरून पक्षाकडे मागणी करावी, अशा पद्धतीचा निर्णय लोकांनी घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या ३८ हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आम्ही काही निर्णय घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून काल (१५ एप्रिल) मुहूर्तावर अर्ज भरला आहे. आमच्या कुटुंबाची ही १४ वी लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे आम्ही दरवेळी अर्ज भरत असतो. ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन काल अर्ज भरला. आज सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबरीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही चालत निघणार आहोत. ठिकठिकाणी चौकसभा घेऊन पुन्हा कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहोत. काल दोन अर्ज भरले होते, आज उरलेले दोन अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करू.”

आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला

अर्ज भरून तुम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करत आहात? असा प्रश्न विचारल्यानंतर विशाल पाटील म्हणाले की, २२ तारखेपर्यंत अर्ज राहिला तरच बंडखोरी होते. १९ तारखेला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा होईल. एकंदरीत परिस्थिती पाहता, भाजपाला पाडण्यासाठी काय रणनीती असू शकते, याचा विचार मविआने करणे आवश्यक आहे. जर १९ तारखेपर्यंत माझी उमेदवारी जाहीर झाली नाही तर निश्चितपणे माझा एबी फॉर्म जमा होईल.

“सांगली लोकसभा ही आमची नैसर्गिक जागा आहे. त्यामुळे ती आम्हालाच मिळावी, अशी अपेक्षा असणे चूक नाही. पण एकत्र आघाडीत निवडणूक लढवित असताना जसे काही फायदे असतात, तसे काही तोटेही असतात. ते स्वीकारावे लागतात”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.