भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत आहेत. आज नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवलीत जाहीर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यासह विनायक राऊत यांच्यावर टीका केली. ‘नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे’, असा टोला राज ठाकरे यांनी विनायक राऊत यांना लगावला. तसेच राज ठाकरे यांनी यावेळी नारायण राणे यांचे कौतुकही केले.

राज ठाकरे काय म्हणाले?

“बाकीचे राज्य विकासात पुढे चालले आहेत. खरे तर कोकणात अनेक कारखाने यायला हवेत. मी नारायण राणे यांना आवाहन करतो, कोकणात फक्त हॉटेल आणि इंग्लिश कोचिंग क्लासेस आणा. कोणीही केरळ आणि गोव्याला जाणार नाही. सर्वजण येथे येतील. नारायण राणे यांना मुख्यमंत्री असताना जेवढा वेळ मिळाला त्यामध्ये त्यांनी झपाट्याने कामे केली होती. जर पाच वर्षांचा कालावधी त्यांना मिळाला असता तर आज प्रचारासाठी कोणाला यायची गरज पडली नसती”, असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : “नरेंद्र मोदी सरकारमुळेच…”, राम मंदिराबाबत राज ठाकरेंचं मोठं विधान; नारायण राणेंच्या सभेत उद्धव ठाकरेंवरही डागली तोफ!

“कामाचा सपाटा लावणे आणि झपाटल्या सारखे काम करणे काय असते? ते नारायण राणे यांच्याकडे बघून कळेल. बाळासाहबे ठाकरे हे नेहमी सांगायचे की अंतुले यांच्यानंतर जर कामाचा सपाटा लावणारे कोणी असेल तर नारायण राणे आहेत. नारायण राणे यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपद हाताळले हे भल्याभल्यांना जमले नाही”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी कणकवलीत सभेत बोलताना नारायण राणे यांचे कौतुक केले.

राज ठाकरेंचा विनायक राऊतांना टोला

“एखादा विषय समजून घेणे आणि त्याची हाताळणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, हे ज्या माणसाला कळते आज तो माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे. माजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला आवाहन की यांना निवडून द्या. मात्र, एक प्रश्नही आहे. तुम्हाला नुसता बाकडावर बसणारा खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे. ज्यावेळी नरेंद्र मोदी यांचे सरकार येईल, त्यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे हे पुन्हा एकदा मंत्री असतील”, असे राज ठाकरे म्हणाले.