पाचपैकी चार राज्यांच्या विधानसबा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून त्यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपाने काँग्रेसविरोधात मोठा विजय मिळवला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसनं केसीआर यांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळावर पूर्णविराम लावत रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बहुमत प्राप्त केलं. या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत भाजपा मुख्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जातीपातीचं राजकारण केल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तेलंगणापर्यंत आवाज पोहोचायला हवा”

तेलंगणामध्ये काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या पार्श्वभूमवीर तिथे विजयी झालेल्या काँग्रेसला मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच टोला लगावला. मोदींनी भारत माता की जयचा नारा दिल्यानंतर समोरून त्यांना अत्यंत अल्प प्रतिसाद आला. त्यावर “घोषणांचा आवाज थेट तेलंगणापर्यंत पोहोचायला हवा”, असं मोदींनी म्हणताच समोरून मोठ्या आवाजाच घोषणा येऊ लागल्या.

“आजचा विजय ऐतिहासिक आहे. अभूतपूर्व आहे. आज सबका साथ, सबका विकासची भावना जिंकली आहे. विकसित भारताच्या आवाहनाचा विजय झाला आहे. भारताच्या विकासासाठी राज्यांचा विकास या विचाराचा विजय झाला आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकपणा व सुशासनाचा विजय झाला आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले. “तेलंगणातही भाजपाला समर्थन वाढत आहे”, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.

“माझ्यासाठी देशात चारच जाती महत्त्वाच्या”

दरम्यान, यावेळी बोलताना मोदींनी विरोधकांवर जातीपातींचं राजकारण केल्याचा आरोप केला. “या निवडणुकीत देशाला जातीजातींमध्ये वाटण्याचा खूप प्रयत्न झाला. पण मी सातत्याने म्हणत होतो की माझ्यासाठी देशात चारच जाती सर्वात मोठ्या आहेत. जेव्हा मी या चार जातींबाबत बोलतो, तेव्हा आपली स्त्रीशक्ती, युवा शक्ती, आपले शेतकरी आणि आपले गरीब कुटुंब या चार जातींना सशक्त केल्यामुळेच फक्त देश सशक्त होऊ शकतो”, असं मोदी यावेळी म्हणाले.

राहुल गांधींनी स्वीकारला तीन राज्यांमधला पराभव, अपयशानंतर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “विचारांची…”

“आपले ओबीसी, आदिवासी सहकारी याच वर्गातून येतात. या निवडणुकीत या चारही जातींनी भाजपाच्या योजना आणि रोडमॅपबाबत मोठा उत्साह दाखवला आहे. आज प्रत्येक गरीब, तरुण, आदिवासी, शेतकरी हे सांगतोय की तो स्वत:च जिंकला आहे. आज देशातली स्त्रीशक्ती भाजपाबरोबर आहे”, असं नरेंद्र मोदींनी यावेळी नमूद केलं.

तेलंगणातील भाजपाचा आलेख

तेलंगणामध्ये पराभव झाला असला, तरी भाजपाचा आलेख कायम वर जाणारा असल्याचं मोदी म्हणाले. “तेलंगणात प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा आलेख सातत्याने वर चढत चालला आहे. मी तेलंगणाच्या लोकांना विश्वास देतो की भाजपा तुमच्या सेवेत कोणतीही कसर ठेवणार नाही”, असं मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi bjp hq speech in delhi after rajasthan madhya pradesh chhattisgarh victory pmw
First published on: 03-12-2023 at 19:53 IST