लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असले, तरी अमेठी आणि रायबरेलीच्या जागेचा सन्पेन्स अद्यापही कायम आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अशात आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही जागांसाठी उमेवादारांच्या नावाची घोषणा होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणात आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अमेठीतून राहुल गांधींऐवजी प्रियंका गांधी वाड्रा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर राहुल गांधी हे रायबरेलीतून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. असे झाले तर अमेठीत प्रियंका गांधी यांची थेट लढत भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी होणार आहे.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत, “उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या…”
अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. या जागांवर पारंपारिकपणे गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतात. मात्र, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायबरेलीची जागा खाली झाली आहे. तर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधीचा पराभव केल्यानंतर ही जागाही काँग्रेसला गमवावी लागली आहे.
अमेठी आणि रायबरेलीमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी पूर्ण केली असून जर रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली, तर राहुल गांधी यांचा अर्ज भरताना सोनिया गांधी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, भाजपाने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जाागांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तर रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये रायबरेलीतून सोनिया गांधी यांनी दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव केला होता.