करोनाला रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत हा संपूर्ण जगासाठीच चर्चेचा विषय आहे. करोना संकट आल्यापासूनच लॉकडाउन, कंटेनमेंट झोन, क्वारंटाइन हे शब्द आता नित्याचा भाग झाले आहेत. करोना संकटामुळे सुरुवातीला अनेकांची चिंता वाढवणारा लॉकडाउन आता अनेकांसाठी सवयीचा भाग झाल्यासारखा आहे. दरम्यान केरळने लॉकडाउनच्याही एक पुढे पाऊल टाकलं असून 'ट्रिपल लॉकडाउन' आणला होता. हा 'ट्रिपल लॉकडाउन' म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊयात. आता लॉकडाउन लागला तर नेमक्या कोणत्या गोष्टींवर बंधनं येतात आणि फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी असते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र ट्रिपल लॉकडाउन हे निर्बंध पुढील टप्प्यावर नेतं. ट्रिपल लॉकडाउनमध्ये नेहमीच्या निर्बंधांसोबत केरळ सरकारकडून ड्रोन्स आणि जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी ट्रिपल लॉकडाउन हा अत्यंत कठोर उपाय असल्याचं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं. तसंच ट्रिपल लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे त्या जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्यानंतर प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असेल. कधी जाहीर करण्यात आला होता ? केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी १४ मे रोजी राज्यात लॉकडाउनची घोषणा केली होती. थिरुअनंतपुरम, एर्नाकुलम, मल्लपूरम अशा काही ठराविक ठिकाणी हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याने हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. केरळमधील लॉकडाउन ३० मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान सध्या फक्त मल्लपूरम येथेच ट्रिपल लॉकडाउन लागू असणार आहे. ट्रिपल लॉकडाउनचे नियम काय? - ज्या परिसरात ट्रिपल लॉकडाउन लावण्यात येणार आहे तो झोनमध्ये विभागायचा आणि नियंत्रणाची जबादारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवायची - गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन्सचा वापर आणि क्वारंटाइनमध्ये आहेत त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी जिओ-फेन्सिंग तंत्राचा वापर - विलगीकरणात न राहणारे किंवा इतरांना विलगीकरणातून बाहेर पडण्यासाठी मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार - खाद्यपदार्थांच्या होम डिलिव्हरीसाठी वॉर्ड समित्यांनी योग्य ती पावलं उचलावीत - थिरुअनंतपुरम जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, खाद्यपदार्थ, घरसामान, फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि मच्छी, गुरांचा चारा, बेकरी सोमवारी सुरु राहतील - सोमवारपासून दुकानं पर्यायी दिवशी उघडी राहतील. तसंच सर्व दुकानं २ वाजण्याच्या आधी बंद होतील. यामध्ये होम डिलिव्हरीशी संबंधित दुकानांचाही समावेश असेल. - बँक, विमा आणि आर्थिक सेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कमीत कमी कर्चमाऱ्यांसोबत सुरु राहील. - सहकारी बँका फक्त सोमवार आणि गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु असतील. - दूध तसंच वृत्तपत्र वितरण सकाळी ८ च्या आधी पूर्ण झालं पाहिजे. - वाजवी किंमतीची दुकानं आणि मिल्क बूथ सर्व दिवशी संध्याकाळी ५ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. - रेस्तराँ आणि हॉटेल्सना फक्त होम डिलिव्हरी सेवेसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७.३० पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल किंवा रेस्तराँमध्ये जेवण्यास किंवा पार्सल घेऊन जाण्यास परवानगी नसेल. - मेडिकल दुकानं, पेट्रो पंप, एटीएम, जीवनाश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं, हॉस्पिटल्स सर्व दिवशी सुरु असतील. - अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी लोकांना दूरचा प्रवास करण्यास मनाई असेल. - इतर सर्व गोष्टींवरही बंधनं असतील.