Lost City of found in Rajasthan Link to River Saraswati: प्राचीन सरस्वती नदी आणि तिच्या काठावरची संस्कृती या विषयाला अनेक राजकीय रंग असले तरी तब्बल ८०००-५००० वर्षांपूर्वी ही नदी अस्तित्त्वात होती हे निर्विवाद सत्य आहे, तसे शास्त्रीय पुरावेही उपलब्ध आहेत. सरस्वती नदीचा उगम हिमालयात झाला. पश्चिमेला सिंधू नदी आणि पूर्वेला गंगा नदी यांच्या दरम्यान पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधून ती वाहत होती. याच नदीच्या तीरावर प्राचीन भारतीय संस्कृतींचा उदय झाला. त्यामुळे भारतीय इतिहासात या नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सरस्वती नदी ही अनेकार्थाने गूढरम्य ठरली आहे. गेल्या दोन शतकांहून अधिक कालखंडासाठी सरस्वती नदीच्या सभोवतालच्या रहस्यांचा उलगडा करण्यात अभ्यासक गुंतलेले आहेत. सरस्वती नदी आणि तिच्या प्रमुख उपनद्या ओळखून त्या अनुषंगाने नदी काठावरच्या या प्राचीन संस्कृतीचा उलगडा करणारे पुरावे गोळा करणे हे विद्वानांचे प्राथमिक उद्दिष्ट होते.
प्राचीन नदी प्रवाह
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) राजस्थानमधील डीग जिल्ह्यातील बहाज गावात ४,५०० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे पुरावे उघडकीस आणले आहेत. १० जानेवारी २०२४ रोजी सुरू झालेल्या या उत्खननात अनेक महत्त्वपूर्ण शोध लागले आहेत. त्यामध्ये २३ मीटर खोल भूगर्भातील एक प्राचीन नदी प्रवाह (पॅलिओ-चॅनल) आढळून आला आहे, या प्रवाहाचा संबंध ऋग्वेदात वर्णन केलेल्या पौराणिक सरस्वती नदीशी असल्याचा दावा पुरातत्त्वज्ञ करत आहेत.
नदी आणि मानवी वसाहतींचा उदय
या प्राचीन नदी प्रणालीमुळे त्या काळातील मानवी वसाहतींचा उदय झाला असावा आणि बहाज हे गाव मोठ्या सरस्वती खोर्याशी जोडले गेले असावे. या उत्खननात आतापर्यंत ८०० हून अधिक प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. त्यामध्ये मातीची भांडी, ब्राह्मी लिपी असलेली मोहोर, तांब्याचे नाणे, यज्ञकुंड, मौर्यकालीन मूर्ती, शिव आणि पार्वतीच्या मूर्ती, तसेच हाडांपासून बनवलेली साधने यांचा समावेश आहे.
महाभारतातील एक सर्वात शक्तिशाली नदी
या उत्खननात हडप्पा संस्कृती नंतरचा कालखंड, महाभारत काळ, मौर्य काळ, कुषाण काळ आणि गुप्त काळ असे पाच वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडांचे पुरावे आढळले आहेत. या नव्या शोधामुळे भूतकाळात ब्रज प्रदेश हा धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा केंद्रबिंदू असल्याचे लक्षात येते. सरस्वती नदीचे वर्णन ऋग्वेद आणि महाभारतात एक सर्वात शक्तिशाली नदी म्हणून आले आहे.
सर्वात खोल उत्खनन
बहाज गावातील हे उत्खनन सुमारे २३ मीटर खोलवर गेले असून आतापर्यंत राजस्थानमध्ये झालेल्या उत्खननांपैकी हे सर्वात खोल उत्खनन आहे. ASI चे उत्खनन मोहिमेचे प्रमुख पवन सारस्वत यांनी NDTV ला सांगितले की, या उत्खननात एका प्राचीन नदीचा प्रवाह (पॅलिओ चॅनल) आढळून आला असून, त्याचा संबंध ऋग्वेदातील सरस्वती नदीशी असण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, ही जलप्रणाली प्रारंभिक मानवी वसाहतींना आधार देत होती आणि सरस्वती खोर्याला मथुरा व ब्रज प्रदेशाशी जोडत होती.
महाभारताचे पुरावे
ASIच्या टीमनुसार, या उत्खननात महाभारतकालीन स्तर देखील सापडले असून त्यामध्ये मातीची भांडी आणि हवनकुंड आढळली आहेत. या हवनकुंडांवर चौकोनी आणि गोल चित्रे असून अग्निहोत्राच्या विधींचे अवशेष सापडले आहेत. महाभारत काळातील कपडे आणि भांड्यांच्या वर्णनाशी येथे सापडलेली मृदभांडी जुळतात असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मौर्यकालीन पुरावे
पुरातत्त्वज्ञांच्या मते, या ठिकाणच्या उत्खननात इ.स.पू. ४०० मधील एक मूर्ती सापडली असून ती मौर्यकालीन मातृदेवीचे शिर मानले जात आहे. तसेच, गुप्तकालीन स्थापत्यशैलीतील चिखलाच्या भिंती आणि खांब, धातुकामाशी संबंधित भट्ट्या सापडल्या आहेत, त्यातून तांबे व लोह यांसारख्या कच्च्या धातूंचा वापर होत होता, हे सूचित होते. याशिवाय, हाडांपासून तयार केलेल्या सुया, केस विंचरण्यासाठी चिरे आणि साच्यांसारखी साधने सापडली असून, भारतात प्रथमच अशा प्रकारची साधने आढळली आहेत.
एक मानवी सांगाडाही सापडला आहे
या उत्खननात सापडलेले अन्य महत्त्वाचे पुरावे म्हणजे शिव-पार्वतीच्या मृत्तिकामूर्ती, ज्या शक्ती आणि भक्ती परंपरेशी संबंधित आहेत. तसेच, शंखाच्या बांगड्या आणि सेमी प्रेशियस दगडांचे मणीही सापडले असून, त्या काळातील व्यापार आणि सौंदर्यपरंपरेचे प्रतिबिंब त्यातून दिसते. १५ पेक्षा अधिक यज्ञकुंड सापडली असून, वैदिक आणि उत्तरवैदिक काळातील धार्मिक विधींवर त्यामुळे शिक्कामोर्तब होते. याशिवाय, उत्खननादरम्यान एक मानवी सांगाडाही सापडला असून, त्याची तपासणी करण्यासाठी तो इस्त्रायलला पाठवण्यात आला आहे.
उत्तर भारताच्या प्राचीन इतिहासाला मिळणार दिशा
या उत्खननामुळे केवळ राजस्थानच नव्हे, तर संपूर्ण उत्तर भारताच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने यासंदर्भात एक अहवाल सांस्कृतिक मंत्रालयाकडे सादर केला असून, या परिसराला राष्ट्रीय पुरातत्त्वीय संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात येणार अशी शक्यता आहे.
बहाज येथील उत्खननातून केवळ प्राचीन वसाहतीचे पुरावे मिळाले नाहीत, तर ऋग्वेदातील पौराणिक सरस्वती नदीचे ऐतिहासिक संदर्भही पुन्हा समोर आले आहेत. या शोधामुळे भारताच्या सांस्कृतिक स्मृती आणि पुरातत्त्वीय परंपरेला नव्याने आकार मिळत आहे. सरस्वती नदीच्या अस्तित्वाच्या दिशेने सुरू झालेल्या शास्त्रीय चाचण्या आणि तिच्या काठावर वसलेल्या संस्कृतींचे प्रत्यय देणारे पुरावे, हे केवळ धार्मिक श्रद्धेचे नाही, तर वैज्ञानिक अन्वेषणाचेही प्रतीक ठरतात.