– हृषीकेश देशपांडे

गुजरातचे राजकारण भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांभोवतीच फिरत आहे. प्रादेशिक पक्षाला तेथे फार स्थान नाही. गेली २७ वर्ष राज्यात भाजपची सत्ता आहे. गुजरात ही त्यांच्या दृष्टीने हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचे हे गृहराज्य. त्या अर्थाने पक्षासाठी हे महत्त्वाचे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला फेस आणला होता. राज्यातील विधानसभेच्या १८२ पैकी ९९ जागाच जिंकता आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात उतरून भाजपला राज्य जिंकून दिले होते. आता या वर्षाअखेरीस राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. गेल्या पाच वर्षांत बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेसमधील अनेक आमदार फुटून भाजपमध्ये आले. काँग्रेसचे रणनितीकार मानले गेलेले अहमद पटेल आता नाहीत. त्यामुळे काँग्रेससाठी वाट बिकट आहे. तशात आता राज्यात भाजप-काँग्रेसपेक्षा वेगळा पर्याय म्हणून आम आदमी पक्ष उदयास आला आहे. पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी अहमदाबादमध्ये भव्य रोड शोद्वारे शक्तिप्रदर्शन केले. त्याची दखल या दोन्ही पक्षांनाही घ्यावी लागली. त्यामुळे आता राज्यात तिसरा पर्याय उदयास आला आहे.

राज्यातील आपची वाटचाल

पंजाब निवडणुकीतील दणदणीत विजयाने आम आदमी पक्षाचा विश्वास दुणावला आहे. देशात दोन ठिकाणी सत्ता असलेला आप हा भाजप तसेच काँग्रेसव्यतिरिक्त तिसराच पक्ष. आता इतर राज्यांकडेही त्यांनी मोर्चा वळवला आहे. गुजरातमध्ये आपची स्थापना २०१३ मध्ये झाली. पुढे २०१७मध्ये ७९ वर्षीय किशोर देसाई यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. ते गणिताचे निवृत्त प्राध्यापक आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील १८२ पैकी २९ जागा त्यांनी लढवल्या. मात्र अनेक मतदारसंघात ‘नोटा’पेक्षाही त्यांना कमी जागा मिळाल्या. त्यानंतर २०२० मध्ये संघटनेची फेरबांधणी करण्यात आली. ३२ वर्षीय गोपाळ इटालीया यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांच्यावर बूट फेकल्याने ते चर्चेत आले होते. या वर्षाच्या सुरुवातील गुजरातमधील स्थानिक निवडणुकीत काही ठिकाणी आपला लक्षणीय यश मिळवले. विशेष म्हणजे सुरत महापालिकेत काँग्रेसला मागे फेकत आपने २७ जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान पटकावले. गांधीनगर महापालिकेतही त्यांनी खाते उघडले. अनेक ठिकाणी काँग्रेसचा पराभव आपने मते घेतल्याने झाला.

केजरीवाल यांची रणनीती

अरविंद केजरीवाल यांनी गुजरात भेटीत भारतीय ट्रायबल पक्षाचे नेते आमदार महेश वसावा यांची भेट घेतली. निवडणुकीत आप त्यांच्याशी आघाडी करण्याची शक्यता आहे. लेवापाटीदार समाजातील प्रभावी नेते नरेश पटेल यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या राजकारणावर पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. त्यामुळे अडीच किलोमीटर तिरंगा यात्रा काढताना त्याचा मार्गही विचारपूर्वक आखण्यात आला होता. अहमदाबाद येथील निकोल येथून ही यात्रा सुरू झाली. पाटीदार समाजातील कामगार वर्गाची येथे वस्ती आहे. २०१५ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलन झाले त्याचे हे केंद्र होते. तर जुन्या अहमदाबादचा भाग असलेल्या बापूनगर परिसरात या यात्रेचा समारोप झाला. केजरीवाल यांनी साबरमती आश्रमालाही भेट दिली. पंजाबमधील यशानंतर राज्यातील ३३ पैकी ३० जिल्ह्यांमध्ये त्यांनी तिरंगा यात्रांचे आयोजन १२ ते १५ मार्च दरम्यान केले होते. वातावरणनिर्मिती करण्यात त्यांनी यश मिळवले आहे.

शिक्षणाचा मुद्दा

दिल्लीत सरकारी शाळांचा कायापालट केल्याचा दावा आपकडून केला जात आहे. गुजरातमध्येही शिक्षणाच्या खासगीकरणाचा मुद्दा पुढे करत त्यांनी प्रस्थापित पक्षांची कोंडी केली आहे. सरकारी आरोग्य सुविधांमध्ये बदल करण्याचे त्यांचे धोरण आहे. या बाबी सामान्यांशी निगडित आहेत. यातून इतर पक्षांना धोरण बदलावे लागेल हे आपचे यश असेल. आता केजरीवाल यांच्या पुढील राज्य दौऱ्यात मोठे रोड शो आयोजित करण्याची पक्षाची योजना आहे. त्यामुळे आप राज्यातील एक प्रमुख पक्ष म्हणून चर्चेत राहील याची खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील भाजप विरुद्ध काँग्रेस या पारंपरिक संघर्षात यंदा विधानसभेला आपचा तिसरी कोनही रंजक ठरणार आहे.