Air India Kanishka Bombing Turns 40: अलीकडेच अहमदाबाद येथे झालेल्या अपघातानंतर भारतीय विमान प्रवासाच्या इतिहासात झालेल्या अनेक विमान दुर्घटनांच्या कटू स्मृती जागृत झाल्या. त्याच दुर्दैवी घटनांच्या यादीतील एक घटना दुर्दैवी घटना म्हणजे बोईंग ७४७ ‘एम्परर कनिष्क’ या विमानामध्ये झालेला बॉम्बस्फोट.
या स्फोटात ३२९ प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. ही घटना २३ जून १९८५ रोजी आयर्लंडच्या किनाऱ्यावर घडली. आयर्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे १९० किमी अंतरावर हवेतच बॉम्बस्फोट होऊन ‘एअर इंडिया १८२’ हे विमान अटलांटिक महासागरात कोसळले होते. ही दुर्घटना भारतासाठी अनेकार्थाने महत्त्वाची आणि दु:खद होती. काल या दुर्घटनेला ४० वर्षं पूर्ण झाली. शिवाय गेल्या आठवड्यात रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी या घटनेतील एका संशयित आरोपीची ओळख पटवल्याचे वृत्त व्हँकुव्हर सन या वृत्तपत्राने दिले आहे. या संशयिताला ‘मिस्टर एक्स’ असे नाव देण्यात आले आहे.
हल्लेखोरांचे लक्ष्य भारतीय नागरिकच
- विमानातील हा स्फोट भारतात झालेला नसला तरी हल्लेखोरांचे लक्ष्य भारतीय नागरिकच होते.
- भारतात येणाऱ्या या विमानात २६८ कॅनेडियन नागरिकांपैकी २७ ब्रिटिश आणि २२ भारतीय नागरिकांचा समावेश होता.
- अनेक प्रवासी सुट्टीसाठी किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात जात होते.
- एअर इंडियाच्या ४५ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचाही यात समावेश होता.
- हा साखळी बॉम्ब हल्ला होता, या साखळीतील दुसरा स्फोट जपानमधील नारीता विमानतळावर होणार होता. परंतु, प्रत्यक्ष घटनेच्या आधीच दुसरा बॉम्ब अकस्मात फुटला आणि दोन जपानी कामगारांचा मृत्यू झाला.
हल्ल्यामागे खलिस्तानी षडयंत्र
स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीचा जोर हा ७० च्या दशकात मूळ धरू लागला. जगजित सिंह चौहान यांनी ब्रिटनमध्ये खलिस्तानी चळवळ सुरू केली. खलिस्तानी आंदोलनाचा इतिहास रक्तरंजीत आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर ८० च्या दशकात पंजाबमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये हिंदूंवर गोळीबार केल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. पंजाबातील वाढत्या हिंसाचाराला भिंद्रनवाले जबाबदार आहेत, त्यामुळेच त्यांना पायबंद घालणे गरजेचे होते, हे लक्षात आल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्याला ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे आदेश दिले.
या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’अंतर्गत सुवर्ण मंदिराला वेढा घालण्यात आला. हे ऑपरेशन यशस्वी झाले, परंतु त्यानंतर इंदिरा गांधी आणि माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची खलिस्तान्यांकडून हत्या करण्यात आली. शिवाय या ऑपरेशन दरम्यान ८४ जवान शहीद झाले, दोनशेहून अधिक जखमी झाले. तर, ४९३ आंदोलक मारले गेले. यानंतर खलिस्तानवाद्यांनी ‘कनिष्क फ्लाइट १८२’ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला.
कटाचे सूत्रधार कोण होते?
- या कटाचे सूत्रधार तलविंदर सिंग परमार (बब्बर खालसा या खलिस्तानी अतिरेकी संघटनेचा संस्थापक) आणि ब्रिटिश-कॅनेडियन नागरिक इंदरजित सिंग रेयात (ब्रिटिश कोलंबियामध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता) हे दोघे होते.
- आता या स्फोटाच्या ४० वर्षानंतर कॅनेडियन पोलिसांनी एका संशयितांची ओळख पटवली आहे. परंतु, ही व्यक्ती कोण हे जाहीर केलेले नाही.
- उलट त्याची ओळख लपवण्यात आली असून त्याला ‘मिस्टर एक्स’ हे नाव दिले आहे. ४० वर्षांपूर्वीही हाच प्रकार निदर्शनास आला होता.

कॅनेडियन सरकारचे दुर्लक्ष
- हा विमानातील बॉम्बस्फोट होण्याआधी अशा प्रकारची काही दुर्दैवी घटना होऊ शकते, याविषयीची गोपनीय माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणा असलेल्या रॉने कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणेस दिली होती.
- कॅनेडियन गुप्तचरांकडे बॉम्ब चाचण्या आणि संशयास्पद हालचालींची माहिती होती. तरीही CSIS आणि RCMP यांनी कोणतीही कारवाई केली नाही. किंबहुना CSIS कडून काही पुरावे नष्ट करण्यात आले, जे भविष्यातील तपासणीसाठी महत्त्वाचे ठरणारे होते.
- या स्फोटानंतर तपास दोन दशके चालला. या प्रकरणात अनेक हत्या, खोट्या साक्षींचे सत्र सुरू राहिले. २०१० साली आलेल्या अहवालात CSIS, RCMP आणि कॅनडियन सरकारला त्यांच्या निष्काळजीपणासाठी जबाबदार धरले.
- एअर इंडियाच्या फ्लाइट १८२ मध्ये झालेला बॉम्बस्फोट ही खूप मोठी दुर्घटना होती.
- पण कॅनडाच्या नागरिकांना त्याविषयी आज फारशी माहिती नाही. २०२३ साली झालेल्या एका सर्वेक्षणात ९०% कॅनडियन नागरिकांनी हे कबूल केलं की, त्यांना या घटनेबद्दल फारच कमी माहिती आहे. विशेषतः ३५ वर्षांखालील नागरिकांपैकी निम्म्याहून अधिकांनी या घटनेचं नावही ऐकलं नव्हतं.

आता सापडलेला संशयित कोण?
रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांना (आरसीएमपी) विमानस्फोटात ३२९ लोकांचा बळी घेणाऱ्या हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी प्राणघातक बॉम्बची चाचणी करणाऱ्या ‘मिस्टर एक्स’ या व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आहे. परंतु, ती व्यक्ती आता जिवंत नसल्याने त्याची ओळख लपवण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. कनिष्क दुर्घटनेची चाळीस वर्षांची ही वेदनादायी कथा आजही त्यातील प्रत्येक प्रवासी- कुटुंबाला दुःखाच्या गर्तेत लोटणारी आहे. दहशतवादाच्या छुप्या जाळ्यापुढे किती निरागस जीव क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतात, याची ती कायमची आठवण आहे.