Mohammad Abdul Hamid बांगलादेशमधील परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. बांगलादेशात अजूनही राजकीय गोंधळ सुरू आहे. गेल्या वर्षी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या मोठ्या निदर्शनांमध्ये निदर्शकांवर झालेल्या हिंसक कारवाईत माजी राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत त्यांची चौकशीही सुरू आहे; मात्र, आता ते अत्यंत नाट्यमय पद्धतीने देश सोडून पळून गेल्याचे वृत्त समोर आले आहे.
गेल्या गुरुवारी (८ मे) माजी राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद अतिशय घाईघाईने देशातून निघून गेले. प्राप्त माहितीत असे म्हटले आहे की, मोहम्मद अब्दुल हमीद रात्रीच्या अंधारात शांतपणे देशाबाहेर पळून गेले आणि मुख्य म्हणजे ते लुंगीवरच देशातून पळाले. मात्र, त्यांनी अचानक पळून जाण्याचे कारण काय? कोण आहेत मोहम्मद अब्दुल हमीद? जाणून घेऊ…

मोहम्मद अब्दुल हमीद कोण आहेत?
मोहम्मद अब्दुल हमीद यांचा देशाच्या राजकारणात १९५९ पासूनचा मोठा इतिहास राहिला आहे. मोहम्मद अब्दुल हमीद यांनी १९६९ साली अवामी लीगमध्ये सामील होत, त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या एका वर्षानंतर ते मैमनसिंग-१८ मतदारसंघातून संसदीय सदस्य म्हणून निवडून आले. मोहम्मद अब्दुल हमीद हे त्यांच्या साधेपणा आणि विनोदी भाषणांसाठी ओळखले जायचे. मुख्य म्हणजे त्यांना २०१३ ते २०२३ पर्यंत सलग दोनदा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीत देशाच्या इतिहासातील एकमेव राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे.
गेल्या ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या देशातून पळून गेल्यानंतर किशोरगंज सदर पोलीस ठाण्यात एका खून खटल्यात मोहम्मद अब्दुल हमीद यांचे नाव आरोपी म्हणून समोर आले. या खटल्यास मोहम्मद अब्दुल हमीद यांच्यासह शेख हसीना, त्यांची बहीण शेख रेहाना, त्यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय व मुलगी सायमा वाजेद पुतुल यांच्या नावाचादेखील समावेश आहे. २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान निदर्शकांवर केलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या हिंसाचारासाठीदेखील त्यांची चौकशी सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये संतप्त जमावाने बुलडोझरने पाडलेल्या घरांमध्ये हमीद यांच्या घराचाही समावेश होता.
मोहम्मद अब्दुल हमीद यांनी कसा सोडला देश?
बांगलादेशमधील अंतरिम युनूस सरकारने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी घातल्यापासून बांगलादेशात राजकीय गोंधळ वाढत असल्याकहे चित्र आहे. याचदरम्यान हमीद यांनी गुरुवारी पहाटे हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थाई एअरवेजच्या विमानाने बांगलादेश सोडला. त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा रियाद अहमद आणि त्यांचा मेव्हणा नौशाद खान यांच्याबरोबर वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगून देशातून पळ काढला आहे. परंतु, त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे की, बांगलादेशात त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यापासून वाचण्यासाठी ते देशातून पळून गेले.

विमानतळ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, हमीद गुरुवारी पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी थाई एअरवेजच्या विमान ‘TG ३४०’मध्ये चढले आणि थायलंडच्या वेळेनुसार सकाळी ६ वाजून १५ वाजता बँकॉकला उतरले. मुख्य म्हणजे एका गोष्टीमुळे ते अधिक चर्चेत आले आहेत. ती म्हणजे देशातून बाहेर जाताना ते व्हीलचेअरवर बसले होते आणि त्यांनी लुंगी परिधान केली होती. त्यांना बाहेर पडण्याची परवानगी का देण्यात आली, असा प्रश्न विमानतळ अधिकाऱ्यांना करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘ढाका पोस्ट’ला सांगितले की, राज्यघटनेच्या कलम ३४ आणि १०२ नुसार, न्यायालयाकडून विशिष्ट बंदी असल्याशिवाय कोणत्याही बांगलादेशी नागरिकाला प्रवास करण्यापासून रोखता येत नाही. आम्हाला त्यांच्यावर बंदी घालण्याचे कोणतेही निर्देश मिळाले नव्हते. तसेच त्यांना ताब्यात घेण्यासाठी किंवा अटक करण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही विनंती किंवा अर्ज आलेला नव्हता.
मोहम्मद अब्दुल हमीद यांनी देश सोडल्यानंतर काय घडले?
मोहम्मद अब्दुल हमीद देशाबाहेर पडल्यानंतर त्यांना देश सोडण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न विविध गटांकडून उपस्थित करण्यात आला. आरक्षणविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन (एसएडी) या गटाने २४ तासांचा अल्टिमेटम दिला आणि मोहम्मद अब्दुल हमीद यांना बाहेर पडण्यास मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या वर्षी झालेल्या निदर्शनांच्या प्रमुख आयोजक व राष्ट्रीय नागरिक पक्षाच्या संयोजक नाहिद इस्लाम यांनी फेसबुकवर लिहिले, “बेकायदा फॅसिस्ट सरकारच्या अध्यक्षांना आमच्या डोळ्यांसमोरून पळून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.”
तसेच राजकीय गट गण अधिकार परिषदेने माजी राष्ट्रपती हमीद यांना परत आणण्यासाठी अंतरिम युनूस प्रशासनाला ४८ तासांचा वेळ दिला. या गोंधळानंतर युनूस सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि १५ दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण सल्लागार प्रोफेसर सी.आर. अबरार यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीतील इतर सदस्यांमध्ये पर्यावरण सल्लागार सय्यदा रिझवाना हसन, तसेच कामगार व रोजगार सल्लागार आणि निवृत्त ब्रिगेडियर जनरल एम. सखावत हुसेन यांचा समावेश आहे.
युनूस सरकारमधील गृह सल्लागार मोहम्मद जहांगीर आलम चौधरी म्हणाले, जर हमीदला देश सोडून जाण्यास मदत करणाऱ्यांचा शोध घेण्यात अपयश आले, तर ते त्यांच्या पदाचा त्याग करतील. मुख्य म्हणजे आता या प्रकरणात विमानतळ इमिग्रेशन युनिटमधील एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एका विशेष शाखेचे अधिकारी व किशोरगंज सदर प्रकरणातील तपास अधिकारी यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. ‘नेत्र न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या राष्ट्रीय सुरक्षा गुप्तचर (एनएसआय) व लष्करी गुप्तचर संस्था डायरेक्टरेट-जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजेंस (डीजीएफआय) यांनी परवानगी दिल्याने मोहम्मद अब्दुल हमीद बँकॉकला जाऊ शकले.
इतरही अवामी लीगच्या नेत्यांनी देश सोडला?
गेल्या वर्षी शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर अवामी लीगचे अनेक नेते आणि सदस्य देश सोडून पळून गेले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी दावा केला की, शेख हसीना यांच्या अवामी लीगचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले. बांगलादेशातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक अवामी लीग नेत्यांमध्ये हसीना यांच्या सरकारमधील कायदामंत्री अनिसुल हक आणि खासगी उद्योग व गुंतवणूक सल्लागार सलमान एफ. रहमान यांचा समावेश होता. अनिसुल हक आणि सलमान एफ. रहमान यांनी १३ ऑगस्ट रोजी स्थानिकांच्या वेशात बोटीने ढाका येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही नागरिकांनी त्यांना ओळखले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. निदर्शनांदरम्यान गोळीबारात ठार झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी या दोघांनाही अटक करण्यात आली.