पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एका प्रचारसभेत पाकिस्तानकडील अण्वस्त्रांचा उल्लेख केला. पाकिस्तानकडील अण्वस्त्रे कुचकामी असून, ती वापरण्याइतका पैसाही त्या देशाकडे नाही. त्यामुळे ती विकून टाकण्याची वेळ पाकिस्तानवर आली असल्याचे मोदी म्हणतात. यानिमित्ताने पाकिस्तानकडील अण्वस्त्रांचा आढावा.

मोदी काय म्हणाले?

ओडिशातील एका प्रचारसभेत भाषण करताना मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला. काँग्रेसचे एक नेते मणिशंकर अय्यर यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत मोदी म्हणाले, की पाकिस्तानला अणुबॉम्ब बाळगता देखील येत नाहीत, इतकी त्या देशाची स्थिती खराब आहे. त्यांना ते विकायचे आहेत. पण अणुबॉम्बच्या दर्जाची कल्पना असल्यामुळे त्यांना खरीदण्यासाठीच कोणी पुढे येत नाही.

आणखी वाचा-प्रोसेस्ड फूडमुळे आरोग्यावर होतायत प्राणघातक परिणाम; अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर

मणिशंकर अय्यर काय म्हणाले होते?

मागे एका मुलाखतीमध्ये मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडील अणुबॉम्बचा उल्लेख केला होता. पाकिस्तान एक सार्वभौम राष्ट्र असून आपण त्यांचा मान ठेवला पाहिजे. हा मान ठेवून त्या देशाला काही खडे बोल सुनवायचे असतील, तर सुनवावे. पण चर्चा तर झालीच पाहिजे. आपण त्याऐवजी बंदुक घेऊन फिरत आहोत. त्याने काय होणार? त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. उद्या एका माथेफिरूने तेथे सत्तेवर आल्यावर तो वापरला तर? एखाद्या माथेफिरूने लाहोरमध्ये अणुबॉम्ब उडवला तर त्याचा किरणोत्सार अमृतसरपर्यंत होईल. अर्थात, मणिशंकर यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे.

पाकिस्तानकडे किती अण्वस्त्रे?

उपलब्ध नोंदींचा धांडोळा घेतल्यास असे दिसते की पाकिस्तानकडे भारताइतकीच अण्वस्त्रे आहेत. काही अहवाल भारताकडील अण्वस्त्रांची संख्या पाकिस्तानपेक्षा कमी असल्याचे सांगतात, पण त्याला अधिकृत दुजोरा मिळत नाही. अमेरिकन न्युक्लिअर नोटबुक अहवालाअंतर्गत गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका टिपणामध्ये पाकिस्तानकडील अण्वस्त्रांची संख्या १७० असू शकते असे म्हटले होते. ही संख्या २०२५मध्ये २०० पर्यंत जाऊ शकेल, असा अंदाज या टिपणात आहे.

आणखी वाचा-गुन्हेगारांची ‘हिस्ट्री शीट’ नक्की असते तरी काय? सर्वोच्च न्यायालय त्याबाबत काय म्हणालं?

दोन देश, भिन्न उद्दिष्टे…

भारताने व्यूहात्मक (स्ट्रॅटेजिक) अण्वस्त्रनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. भारताला पाकिस्तानबरोबरच चीनलाही पुरेशी जरब (मिनिमम डिटरन्स) बसवण्याबाबत विचार करावा लागतो. शिवाय अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र निर्मितीबाबत स्वयंपूर्ण महासत्ता होण्याचे भारताचे व्यापक आणि दीर्घकालीन लक्ष्य आहे. यालाच व्यूहात्मक नियोजन म्हणतात. पाकिस्तानसमोर भारताला नेस्तनाबूत करणे किंवा धाकात ठेवणे यापलीकडे कोणताही कार्यक्रम नाही. त्यामुळे पाकिस्तानचे प्राधान्य डावपेचात्मक (टॅक्टिकल) अण्वस्त्रनिर्मितीला अधिक असते. या अंतर्गत छोट्या पल्ल्याची क्षेपणास्त्रेही अण्वस्त्रसज्ज करता येतात. शिवाय पाकिस्तान वेळ पडल्यास (भारतीय आक्रमण झाल्यास) स्वतःच्याच देशात अण्वस्त्रे वापरण्याचा विचार करू शकतो. भारताचे धोरण याबाबतीत स्पष्ट आहे.

१९९८ मध्ये भारताने ‘नो फर्स्ट यूज़’ धोरण जाहीर केले. त्यानुसार, ‘कोणत्याही परिस्थितीत भारत प्रथम अण्वस्त्राचा वापर करणार नाही. मात्र भारताविरुद्ध भारताच्या भूमीवर वा कोठेही अण्वस्त्रांचा वापर झाल्यास, प्रतिसादाची वेळ, ठिकाण आणि तीव्रता ठरवण्याचा भारताचा हक्क अबाधित राहील’! अण्वस्त्रक्षम असूनही अशा प्रकारचे धोरण निश्चित करणारा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळेच एकीकडे अण्वस्त्रे असल्याचे धमकावत भारताच्या कुरापती काढताना, भारताच्या अण्वस्त्र धोरणाचा धसकाही पाकिस्तानने घेतला आहे. उद्या खरोखरच भारताविरुद्ध अण्वस्त्रे वापरून त्या देशाचे नुकसान करण्याचे दुःसाहस पाकिस्तानने केले, तर बदल्यात आपला देशच संपूर्ण बेचिराख करण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही अशी भीती अनेक पाकिस्तानी विश्लेषक आणि राज्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे भारताविरुद्ध पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.

पाकिस्तानची मारक क्षमता किती?

अणुबॉम्ब वाहून नेऊन शकतील अशी ३६ लढाऊ विमाने पाकिस्तानकडे असल्याचे न्युक्लिअर नोटबुकने नमूद केले आहे. ही सर्व फ्रेंच बनावटीची मिराज आणि चिनी बनावटीची जेएफ लढाऊ विमाने आहेत. याशिवाय अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतील अशी अब्दाली, घौरी, गझनवी, शाहीन, नासर ही क्षेपणास्त्रे पाकिस्तानने चीनच्या मदतीने विकसित केली आहेत. ती जमिनीवरून मारा करणारी आहेत. तर सागरावरून डागता येऊ शकेल असे बाबर क्षेपणास्त्र विकसनाच्या मार्गावर आहे. एमआयआरव्ही प्रकारातील अबाबिल क्षेपणास्त्रही पाकिस्तान विकसित करत असल्याचे काही अहवाल सांगतात.

आणखी वाचा-एअर इंडिया एक्स्प्रेसचे कर्मचारी सामूहिकरीत्या अचानक पडले आजारी; आंदोलनासाठी वैद्यकीय रजेचा वापर कशासाठी?

भारताची प्रगती किती?

गेल्या दोन दशकांत भारताने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र बचाव प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. तसेच, अनेक समस्या असल्या तरी एकीकडे सुखोई आणि राफेलसारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने खरीदतानाच दुसरीकडे तेजससारखे हलके लढाऊ विमान विकसित करण्यातही भारताने मोठी मजल मारली आहे. भारतीय नौदलही पाणबुड्या आणि विमानवाहू युद्धनौकांच्या निर्मितीमध्ये लक्षणीय प्रगती करत आहे. बालाकोट हल्ल्यांनी भारतीय हवाईदलाची मारकक्षमता आणि पाकिस्तानची कुचकामी बचाव यंत्रणा यांचे दर्शन घडले. रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र बचावप्रणालीची खरेदी, अग्नि-५ एमआयआरव्ही क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी या बाबी पाकिस्तानी राज्यकर्त्यांची चिंता वाढवणाऱ्या ठरल्या. त्यामुळेच कितीही खंक अवस्था ओढवली तरी अण्वस्त्र विकास कार्यक्रमात पाकिस्तानने खंड पडू दिलेला नाही. ती विकण्याची संभाव्यता खूपच कमी दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अण्वस्त्रसज्ज देश किती?

जगात आजघडीला नऊ अण्वस्त्रसज्ज देश असल्याचे मानले जाते. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन हे संयुक्त राष्ट्र सुरक्ष परिषदेतील स्थायी सदस्य देश अधिकृतरीत्या अण्वस्त्रसज्ज आहे. भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया अण्वस्त्रक्षम असल्याचे आता जगाने मान्य केले आहे. यातही केवळ भारताच्याच अण्वस्त्रविकास कार्यक्रमाला अमेरिकेसह बहुतेक देशांची मान्यता आहे. तर इस्रायल या देशाने अण्वस्त्रे असल्याचे कबूल केलेले नाही किंवा नाकरलेलेही नाही.