भारत-म्यानमार सीमेवरील मणिपूरमधील मोरेह शहरातील दोन तामिळ रहिवासी ५ जुलै रोजी म्यानमारच्या तामूमध्ये मृतावस्थेत आढळले. पी मोहन (२७) आणि एम अय्यरनार (२८) हे तरुण त्या दिवशी सकाळी तमूमध्ये गेले होते. त्यांच्या मानेवर गोळ्या लागल्याच्या जखमा होत्या. तमू शहरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले होते. गेल्या आठवड्यात दुपारी मोरेह येथील व्यापाऱ्यांनी त्यांची ओळख पटवली होती. म्यानमारच्या सत्ताधारी लष्करी मिलिशियाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली.

म्यानमारमध्ये दोन तामिळींच्या हत्येच्या निषेधार्थ मणिपूरच्या मोरेह भागातील काही लोकांनी शेजारच्या देशात घुसून लष्कराच्या छोट्या चौकीला आग लावली. यानंतर अधिकाऱ्यांनी सीमावर्ती शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

म्यानमारच्या सीमेवरील या भागात तामिळ लोक कसे पोहोचले?

आशियातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून बर्मातील रंगून  (आताचे यंगून) या शहराने संपूर्ण खंडातील व्यापारी आणि कामगारांना आकर्षित केले होते. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने तमिळ, बंगाली, तेलगु, ओरिया आणि पंजाबी मजूर आणि व्यापाऱ्यांना या समृद्ध बंदराच्या शहरात नेले. हे शहर भारत आणि चीनमधील सामरिकदृष्ट्या मजबूत दुवा होते. ब्रिटिशांनी नंतर तेथून माघार घेतली पण भारतीय तिथेच राहिले. त्यांनी व्यवसाय सुरू केले आणि बर्माच्या (आताचे म्यानमार) अर्थव्यवस्थेचे चालक बनले.

१९६० च्या दशकात बर्मातील सैन्य जंटाने सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर, तत्कालीन बर्मा सरकारच्या दोन निर्णयांमुळे, तिथल्या प्रवासी भारतीयांसाठी गोष्टी बदलल्या. ९१६३ मध्ये क्रांतिकारी परिषदेने पारित केलेल्या राष्ट्रीयीकरण कायद्याने आयात-निर्यात व्यापार, तांदूळ, बँकिंग, खाणकाम, सागवान आणि रबर यासह सर्व प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले आणि भारत सरकारला त्यांचे नागरिक त्यांच्या जमिनीवरून परत बोलवून घेण्यास सांगितले.

१९६५ मध्ये, तत्कालीन भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम आणि कोची येथून जहाजांची पहिली तुकडी रंगूनला पाठवली. बंदर सर्व वयोगटातील भारतीयांनी खचाखच भरलेले होते. बर्माला आपले घर बनवलेली कुटुंबे, तरुण कामगार त्यांच्या बायका आणि मुलांसह भारतीय जहाजांवर चढण्यासाठी धावपळ करत होते. प्रत्येक जहाजात सुमारे १,८००-२,००० निर्वासित होते.

सुरुवातीला, बर्मा सरकारने भारतीयांना त्यांच्याकडे जे काही आहे ते भारतात परत नेण्याची परवानगी दिली होती. पण, देशातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १५ रुपये आणि एक छत्री घेऊन जाण्यास परवानगी दिली,असे त्या वेळच्या एका प्रवासी भारतीयाने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

मोरेह येथे तमिळ स्थायिक कधी आले?

म्यानमारमधून ही कुटुंबे सागरी मार्गाने भारतात आली. काहींनी कुंपण नसलेल्या सीमेवरून भारतात प्रवेश केला. जहाजावर असलेल्यांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यात आले. तामिळी लोकांना चेन्नईला नेण्यात आले. काहींना तेथील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये तर काहींना राज्यभरातील इतर ठिकाणी ठेवण्यात आले.

परंतु हे नवीन जीवन अनेकांसाठी अयोग्य वाटले. त्यांनी नंतर म्यानमारला पायी आणि बोटीने परत जाण्याचा निर्णय घेतला. या प्रवासाला अनेक महिने लागले. जे लोक जमिनीवरून प्रवास करायचे ते मोरेह मार्गे जात असत. पण बहुतेकांना जंटाने पकडले आणि भारतात परत पाठवले.

१९४९ च्या दशकापासून तेथे राहणाऱ्या मूठभर कुकी आणि मेतेई कुटुंबांसह प्रवासी भारतीय मोरेहचे स्थायिक नागरिक झाले. ६० च्या दशकाच्या मध्यात मोरेहमध्ये २०,००० लोकसंख्येसह तमिळांची संख्या इतर प्रत्येक समुदायापेक्षा जास्त होती.

मोरेह येथील तमिळ लोकांची अवस्था कशी आहे?

मणिपूरची राजधानी इम्फाळपासून ११० किमी अंतरावर असलेल्या या सीमावर्ती शहरामध्ये गेल्या काही वर्षांत तमिळ समुदाय हा सर्वात प्रभावशाली समुदाय बनला आहे. समुदायाचे प्रतिनिधित्व तामिळ संगम नावाच्या संस्थेद्वारे केले जाते, आणि मोरेहच्या मध्यभागी असलेल्या गल्ल्यामंध्ये यांच्या लाकडी, सिमेंटच्या घरांचे वर्चस्व आहे. या गल्ल्यांमध्ये गरमागरम डोसा, सांबार वडा आणि इडली देणारे छोटेखानी भोजनालय आहेत. ३००० लोकसंख्येसह मोरेहमध्ये ३०० तमिळ कुटुंबे आहेत.

येथील श्री अंगलपरमेश्वरी मंदिर चेन्नईहून आलेल्या कारागिरांनी आणि तज्ञ कामगारांनी बांधले होते. येथे एक तमिळ युवा क्लब आहे जो दर महिन्याला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो आणि मुलींना भरतनाट्यमचे प्रशिक्षण दिले जाते. तिमिथी, किंवा फायर वॉकिंग फेस्टिव्हल, दरवर्षी मार्च-एप्रिल दरम्यान आयोजित केला जातो.

तामिळ समाज सध्याच्या घटनेकडे कसे पाहत आहे?

मोरेह चेंबर ऑफ कॉमर्स येथील व्यापारावर नियंत्रण ठेवते आणि तमिळ संगमचे अध्यक्ष त्याचे नेतृत्व करतात. व्यापार सुरळीत चालावा याची खात्री करण्यासाठी, मोरेह चेंबर ऑफ कॉमर्स लष्करी सैन्याशी चांगले संबंध ठेवते. किंबहुना, म्यानमारच्या कोणत्याही राजवटीने तमिळ समाजाला कधीच त्रास दिला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे नुकत्याच घडलेल्या या घटनेने तमिळ समाजाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक दशकांपासून, भारत आणि म्यानमारमधील अनौपचारिक व्यापार वस्तु विनिमय पद्धतीद्वारे चालत होता. अगदी जपान आणि चीनमधील उत्पादने या मार्गाने भारतात येत होती. भारत सरकारने म्यानमारशी औपचारिक व्यापारासाठी दिलेले प्रोत्साहन पुरेसे नाही. चीनने म्यानमारशी व्यापारासाठी १,५०० वस्तूंना परवानगी दिली आहे. तर भारत फक्त ४० वस्तूंना परवानगी देतो.