अनिकेत साठे

भारतीय नौदलाने अपहृत एमव्ही रुएन जहाजावर अरबी समुद्रात केलेल्या कारवाईत ३५ समुद्री चाच्यांना शरण येण्यास भाग पाडून ताब्यात घेतले. तसेच १७ ओलिसांची सुखरूप सुटका केली. भारतीय भूमीपासून १४०० सागरी मैल (२६०० किलोमीटर) अंतरावर राबविलेल्या मोहिमेतून भारतीय नौदलाने आपले सामर्थ्य नव्याने अधोरेखित केले. 

चाचेगिरीविरोधात ४० तासांची कारवाई कशी होती?

सोमालियाच्या पूर्वेला २६० सागरी मैल अंतरावर १५ मार्च रोजी एमव्ही रुएन जहाजाच्या हालचाली टिपल्यानंतर आयएनएस कोलकाता सक्रिय झाली. ड्रोनद्वारे रुएनवर सशस्त्र समुद्री चाचे असल्याची खात्री करण्यात आली. चाच्यांनी हे ड्रोन पाडले, युद्धनौकेवर गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कोलकाताने प्रतिसाद दिला. जहाजाची सुकाणू यंत्रणा, नौकानयन सहायक प्रणाली निष्प्रभ करत चाच्यांना थांबण्यास भाग पाडले. नियोजनपूर्वक मोहीम राबवत चाच्यांशी वाटाघाटी सुरू ठेवल्या. नौदलाची आयएनएस सुभद्रा या क्षेत्रात तैनात झाली. ‘HAL’वैमानिकरहित विमान आणि ‘P8I’ सागरी गस्ती विमानाने जहाजावर पाळत ठेवली. नौदलासमोर सोमाली चाच्यांना शरणागती पत्करण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. अखेर १६ मार्च रोजी त्यांनी आत्मसमर्पण केले. जहाजावरील बेकायदेशीर शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि प्रतिबंधित वस्तू हस्तगत करण्यात आल्या. जवळपास ४० तासांनी मोहीम तडीस गेली.

हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचे नवे शस्त्र ‘AI’

सावधगिरी बाळगण्याचे कारण?

ही मोहीम चाचेगिरीविरोधात होती, तशीच जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या बचावाची देखील होती. अपहृत रुएनवर समुद्री चाच्यांबरोबर १७ कर्मचारी होते. चाच्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना आयएनएस कोलकाताने आक्रमक कारवाईची कल्पना देण्यासाठी हेलिकॉप्टर व युद्धनौकेतून जहाजाच्या आसपास गोळीबार केला. त्याचा उद्देश केवळ धोक्याची पूर्वसूचना देण्यापर्यंत सीमित होता. कर्मचाऱ्यांची जीवितहानी होऊ नये, याची काळजी घेण्यात आली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना कुठलीही इजा न होता चाच्यांच्या तावडीतून सुरक्षितपणे बाहेर काढता आले.

सामाईक कारवाईचे दर्शन कसे घडले?

देशाच्या तीनही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाईदल आणि नौदल यांचा एकात्मिक युद्ध विभाग अर्थात जॉइंट थिएटर कमांड स्थापण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या मोहिमेत नौदल व हवाई दलाने सामाईक कारवाईचे दर्शन घडवले. समुद्री चाच्यांना रोखण्याचे आदेश मिळाल्यानंतर आयएनएस कोलकाताचे कमांडिंग अधिकारी कॅप्टन शरद सिनसुनवाल यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेची आखणी झाली. त्यांनी सुरक्षा यंत्रणा व हवाई दलाशी समन्वय साधून योजना आखली. हवाई दलाचे सी – १७ ग्लोबमास्टर विमान सहभागी झाले. नौदल कमांडोंना या विमानाने अपहृत जहाजाजवळ उतरवले. या मोहिमेला हवाई दलाचे पाठबळ मिळाले.

हेही वाचा >>> चिंताजनक अहवाल, २०३० पर्यंत भारतातील सौर कचऱ्यात होणार तब्बल २० पटींनी वाढ

मोहिमेचे फलित काय?

डिसेंबर २०२३ म्हणजे चार महिन्यांपूर्वी एमव्ही रुएन या व्यापारी जहाजाचे अपहरण झाले होते. तेव्हापासून ते सोमालियन चाच्यांच्या ताब्यात होते. या कारवाईने भारतीय नौदलाने व्यापारी जहाजांच्या अपहरणाचा डाव हाणून पाडला. शिवाय, चाच्यांच्या ताब्यातून रुएन व ओलीस ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची मुक्तता केली. हे जहाज पोलाद वाहून नेत होते. एक दशलक्ष डॉलर किमतीच्या मालासह तेही भारतीय किनारपट्टीवर आणले जात आहे.

व्यापारी मार्गांना सुरक्षाकवच कसे लाभते?

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र, त्यापलीकडे आणि हिंद महासागरात प्रवेश करण्याच्या मार्गावर (चोक पॉइंट्स) प्रभावी भूमिका पार पाडण्यासाठी भारतीय नौदल सदैव सज्ज असते. हिंद महासागर क्षेत्रात प्रमुख व्यापारी मार्ग आहेत. तिथून जवळपास एक लाख २० हजार जहाजे प्रवास करतात. कोणत्याही वेळी या क्षेत्रातील विविध भागातून सुमारे १३ हजार व्यापारी जहाजे मार्गस्थ होत असतात. हे क्षेत्र चाचेगिरी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा केंद्रबिंदू समजले जाते. नैसर्गिक आपत्तीवेळी मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पुरविणे ही देखील भारतीय नौदलाची महत्त्वाची भूमिका आहे. जागतिक सागरी नियमांचे पालन करुन खोल समुद्रातील जहाजांचा मागोवा घेणे आणि चाचेगिरीविरोधात कारवाईची क्षमता या निमित्ताने पुन्हा सिध्द करण्यात आली. सप्टेंबरमध्ये आयएनएस कोलकाताने ऑकलंडला भेट दिली होती. तेव्हा कॅप्टन शरद सिनसुनवाल यांनी भारतीय नौदल देशाच्या हिताचे रक्षण करण्यास सदैव तयार व सक्षम असल्याची ग्वाही दिली होती. या कारवाईतून तेही त्यांनी दाखवून दिले.