रिलायन्स जिओने जगातला सर्वांत स्वस्त ४जी मोबाईल भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनची किंमत अवघी ९९९ रुपये आहे. ‘जिओ भारत’ नावाने लाँच केलेल्या या फोनमधील ऑपरेटिंग सिस्टीम ‘रिलायन्स जिओ’ची आहे. स्वस्तात ४जी इंटरनेट देण्यासोबतच या फोनमध्ये करमणूक व डिजिटल पेमेंट करण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे. फोनमध्ये देण्यात येणारे फीचर्स आणि स्वस्त टॅरिफ प्लॅन याद्वारे ‘भारती एअरटेल’ व ‘व्होडाफोन आयडिया’कडे असलेले ग्राहक आकर्षित करण्याची ‘जिओ’ची योजना असल्याचे सांगण्यात येते. या नव्या फोनच्या माध्यमातून प्राथमिक स्तरावरील २५ कोटी मोबाइल ब्रॉडबँड ग्राहक जोडण्याचे ‘रिलायन्स’चे लक्ष्य आहे. विशेषतः ग्रामीण भागात एअरटेल आणि व्होडफोन आयडिया यांच्याकडून २जी नेटवर्क सुविधा पुरविली जाते. विश्लेषकांच्या मते, जिओचा नवा फोन एअरटेल आणि व्होडाफोनचे ग्राहक स्वतःकडे खेचण्यात यशस्वी ठरू शकतो; ज्यामुळे बीएसएनलसह या दोन्ही कंपन्यांना याचा फटका बसू शकतो.
कसा आहे जिओचा फोन?
जिओ भारत हा मोबाइल फोन ९९९ रुपयांमध्ये मिळणार असून, कंपनीच्या दाव्यानुसार ४जी इंटरनेट सेवा देणारा हा सर्वांत स्वस्त फोन आहे. या फोनमध्ये जिओ सिनेमा (Jio Cinema), जिओ सावन (Jio Saavn) यांसारखे ‘जिओ’चे ॲप्स मोफत मिळणार आहेत. तसेच जिओ पे (Jio Pay) ॲपवरून यूपीआय पेमेंट्सही करता येणार आहेत. रिलायन्सने नुकतेच एक निवेदन काढले आहे. त्यानुसार ७ जुलैपासून Jio Bharat फोनची बीटा ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ६,५०० तालुक्यांमध्ये जवळपास एक दशलक्ष फोन वितरित केले जाणार आहेत.
जिओ भारत फोनची निर्मिती करण्यासाठीचे कंत्राट भारतीय मोबाइल उत्पादन कंपनीला देण्यात आले आहे. रिलायन्स आणि मोबाइल निर्माण कंपनी ‘कार्बन’ (Karbonn) या दोन कंपन्या ‘जिओ भारत’चे उत्पादन करणार आहेत. याचा अर्थ एकाच फोनची निर्मिती दोन वेगवेगळ्या कंपन्या करणार आहेत. आणखी एक बाब म्हणजे गूगल आणि जिओ या दोन कंपन्यांचा सहयोग या नव्या फोनमध्ये नसेल. याआधी ‘जिओ फोन’ आणि ‘जिओ फोन नेक्स्ट’च्या निर्मितीमध्ये गूगलचा सहयोग घेण्यात आला होता.
सध्या, ‘जिओ भारत’मधील ऑपरेटिंग सिस्टीम फक्त ‘जिओ’ने निर्माण केलेले ॲप वापरण्याची मुभा देते. जिओ ऑपरेटिंग सिस्टीमनुसार इतर ॲप्लिकेशन कंपन्या स्वतःचे ॲप तयार करणार का? याबाबत अजून ठाम माहिती मिळू शकलेली नाही. जर इतर कंपन्यांनी जिओला सपोर्ट करणारे ॲप्स तयार केले नाहीत, तर जिओ फोनचा वापर मर्यादित होईल आणि फक्त जिओ स्युटमधील ॲप्स वापरण्याचे बंधन त्यांच्यावर राहील. जिओमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ फोन लाँच करतेवेळी त्यामध्ये व्हॉट्सॲप आणि इतर ॲप्लिकेशन चालणार नाहीत. व्हॉट्सॲपची मालक कंपनी ‘मेटा’ने २०२० साली जिओ प्लॅटफॉर्मसाठी ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती आणि या कंपनीत ‘मेटा’ची ९.९९ टक्के भागीदारी आहे.
इतर टेलिकॉम कंपन्यांवर याचा परिणाम काय होणार?
‘जिओ भारत’च्या फोनची किंमत अतिशय कमी ठेवण्यात आली आहेच; त्याशिवाय फोनचा टॅरिफ प्लॅनदेखील अतिशय स्वस्त आहे. २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी ग्राहकांना १२३ रुपये द्यावे लागतील; ज्यामध्ये प्रतिमहिना १४ जीबीचा इंटरनेट डेटा मिळणार आहे. इतर कंपन्यांकडून हाच प्लॅन १७९ रुपयांमध्ये मिळत असल्याचे ‘जिओ’कडून सांगण्यात आले.
‘जिओ भारत’च्या टॅरिफ प्लॅनमुळे एअरटेल आणि व्हीआयचे २जी ग्राहक जिओकडे खेचले जातील, असे विश्लेषकांचे मत आहे. जिओ भारतच्या या फोनमुळे जिओ कंपनी तळागाळातील मोबाइल वापरकर्ते ग्राहक स्वतःकडे खेचू शकेल. ‘भारती एअरटेल’सारख्या कंपनीला याचा तोटा होण्याची शक्यता आहे. नुकतीच त्यांनी ९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत १५५ रुपये केली होती. भारती एअरटेलसाठी ही नकारात्मक बाब असून, पुढील १२-१८ महिन्यांसाठी दरवाढीची कोणतीही शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया जेपी मॉर्गन या वित्तीय कंपनीने काढलेल्या निवेदनात दिली आहे.