केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात सुरुवातीला देशभरातून विरोध झाला. अनेक ठिकाणी तरुणांनी हिंसक आंदोलन केले. त्यानंतर पहिल्या वर्षासाठी या योजनेतील वयोगट २१ वरुन २३ वर करण्यात आला. सध्या अग्निवीर योजनेच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. विशेष म्हणजे यात अनेक युवतींचा देखील समावेश आहे. भूदल, हवाई दल आणि नौदल अशी विभागणी करुन तीनही दलासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण सुरु असून सहा महिन्यांपर्यंत हे प्रशिक्षण चालेल. त्यानंतर अग्निवीरांना प्रत्यक्ष सैन्यात काम करण्याची संधी दिली जाईल. जून २०२२ मध्ये केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत अग्निवीरांना चार वर्षांपर्यंत सैन्यात काम करण्यासाठी भरती केले आहे. तीनही दलांमध्ये अग्निवीरांना काम करण्याची संधी मिळेल. या योजनेत सहभागी होण्यासाठी १७.५ ते २१ वर्ष असा वयोगट निश्चित करण्यात आला आहे. पुढच्यावर्षीपासून मात्र २१ वर्षांची मर्यादा पाळली जाईल. चार वर्ष सैन्यात काम केल्यानंतर २५ टक्के अग्निवीरांना सैन्यात सामावून घेतले जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किती अग्निवीर प्रशिक्षण घेत आहेत?

केंद्र सरकारने जेव्हा योजनेची सुरुवात केली तेव्हा ४६ हजार अग्निवीर भरती केले जातील, असे सांगितले होते. यातील ४० हजार अग्निवीर भूदलात काम करतील तर उर्वरित तीन – तीन हजार अग्निवीर अनुक्रमे हवाई दल आणि नौदलात सामील होणार होते. मात्र पहिल्या बॅचमध्ये २० हजारांहून अधिक अग्निवीर भरती झाले आहेत. यामधील जवळपास १९ हजार अग्निवीर भूदलमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. नौदलात तीन हजार अग्निवीर आहेत. ज्यामध्ये ३४१ युवती आहेत. हवाई दलात दाखल झालेल्या युवकांना ‘अग्निवायू’ म्हटले जाते.

हे वाचा >> अग्निवीर योजनेला देशभरातून विरोध का झाला? काय होत्या युवकांच्या मागण्या

कुठे होत आहे प्रशिक्षण?

भूदलात सामील झालेल्या अग्निवीरांचे प्रशिक्षण अनेक रेजिमेंटल सेंटरवर होत आहे. झारखंड मधील रामगढ जिल्ह्यातील पंजाब रेजिमेंटल सेंटरमध्ये २१७, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असणाऱ्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये २ हजार ६०० पेक्षा जास्त अग्निवीर प्रशिक्षण घेत आहेत. जम्मू-काश्मीर मधील लाइट इन्फेंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये देखील प्रशिक्षण सुरु आहे. यासोबतच मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि गोव्यासह अनेक राज्यांमध्ये असलेल्या रेजिमेंटल सेंटरवर अग्निवीरांना प्रशिक्षित केले जात आहे.
हवाई दलात प्रवेश मिळालेल्या अग्निवायूंना कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे असलेल्या एअरमॅन ट्रेनिंग स्कूल (ATS) येथे प्रशिक्षित केले जात आहे. तर नौदलात प्रवेश मिळालेल्या युवकांना ओडिशातील INS चिल्का ट्रेनिंग बेस येथे प्रिशिक्षित केले जात आहे.

कधीपर्यंत चालणार प्रशिक्षण?

तीनही दलातील अग्निवीरांचे प्रशिक्षण सहा महिन्यांपर्यंत चालेल. त्यानंतर त्यांना त्या त्या दलात रुजू केले जाईल. भूदलाच्या माहितीनुसार अग्निवीरांची ट्रेनिंग ३१ आठवड्यांपर्यंत चालेल. पहिले १० आठवडे बेसिक प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतरचे २१ आठवडे लष्करी प्रशिक्षण दिले जाईल. नौदलात सामील झालेल्या अग्निवीरांना देखील अशाचप्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षण झाल्यावर काय?

सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात अग्निवीरांची सैन्यात रुजू करण्याची प्रक्रिया सुरु होईल. भूदलातील काही अग्निवीरांना थेट सीमेवर देखील काम करण्याची संधी मिळू शकते. ज्याप्रकारे सैनिकांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते, त्याच प्रकारचे प्रशिक्षण अग्निवीरांना मिळणार असल्यामुळे त्यांच्याकडेही सैनिकांसारखीच जबाबदारी दिली जाईल. तसेय हवाई दलात घेतलेल्या अग्निवायूंना एअरबेसवर तैनात केले जाईल. नौदलातील अग्निवीरांना लष्करी जहाज किंवा एअरबेसवर तैनात केले जाईल.

पगार किती मिळणार?

अग्निवीरांना पहिल्या वर्षासाठी महिन्याला ३० हजार पगार मिळेल, ज्यामध्ये २१ हजार थेट हातात मिळतील. दुसऱ्या वर्षी ३३ हजार, तिसऱ्या वर्षी ३६,५०० आणि चौथ्या वर्षी ४० हजार रुपये पगार मिळेल. यासोबतच अग्निवीरांना ४८ लाखांचे विमा कवच मिळेल. सेवेच्या काळात जर एखाद्यावेळीस हौतात्म्य पत्करावे लागले किंवा शारीरिक इजा झाल्यास या विम्याचा लाभ होणार आहे.

चार वर्षांनंतर अग्निवीरांचे काय होणार?

अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात घेतले जाणार आहे. चार वर्षांची सेवा समाप्त झाल्यानंतर ७५ टक्के अग्निवीर निवृत्त होतील, तर फक्त २५ टक्के अग्निवीरांना सेनेत कायम केले जाईल. चार वर्षांनी निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना पोलिस आणि पॅरामिलिट्री दलात काम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. चार वर्षांनी निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना कोणतीही ग्रॅच्युटी किंवा पेशंन मिळणार नाही. सेवा निधी पॅकेज अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील. तसेच ज्या २५ टक्के अग्निवीरांना सैन्यात घेतले जाईल, त्यांना १५ वर्षांपर्यंत सेवा द्यावी लागणार आहे. याकाळात सैन्याला लागू होणाऱ्या सर्व सुविधा त्यांना मिळतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know all about agniveer training camp place duration and salary kvg
First published on: 12-01-2023 at 18:53 IST