मंगल हनवते

ठाणे-बोरिवली प्रवास अतिवेगवान आणि सुकर व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले असून येत्या काही महिन्यात या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. यापूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र या प्रकल्पास केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नसल्याने भूमिपूजन रखडले होते. आता ही परवानगी मिळाल्याने प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तेव्हा आता लवकरच भूमिपूजन करून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार आहे. तेव्हा हा प्रकल्प नेमका कसा आहे, प्रकल्पाचे काम केव्हा सुरू होणार, याचा आढावा.

mumbai, Khar subway, bridge on the Khar subway , residents opposed proposed bridge, residents near khar, residents of khar subway, khar subway news, mumbai news,
मुंबई : खार भुयारी मार्गावरील प्रस्तावित पुलाला स्थानिकांचा वाढता विरोध, निवासी भागातील पुलाच्या अरेखनाला विरोध
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची गरज काय?

ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी आजच्या घडीला एक ते दीड तासाचा अवधी लागतो. ठाण्याहून बोरिवलीला रस्तेमार्गे जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने ठाणे- बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. काही कारणांमुळे हा प्रकल्प २०२१ पर्यंत मार्गी लावणे एमएसआरडीसीला शक्य झाले नाही. मात्र या प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर हा प्रकल्प २०२१ मध्ये एमएमआरडीएकडे वर्ग केला. सरकारच्या निर्णयानुसार आज एमएसआरडीसीचा मूळ प्रकल्प एमएमआरडीए मार्गी लावत आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: वन हक्क कायद्याची अंमलबजावणी का रखडली?

भुयारी मार्ग कसा असेल?

ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग ११.८ किमी लांबीचा असून या मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. हा मार्ग सहा मार्गिकांचा (येण्यासाठी तीन-जाण्यासाठी तीन) असणार आहे. या प्रकल्पासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एकूण १०.२५ किमीच्या दुहेरी बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिका असतील. त्यातील दोन मार्गिका वाहतुकीसाठी असतील तर एक मार्गिका आपत्कालीन असेल. आग, अपघात किंवा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास या मार्गिकेवरून तात्काळ रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्या आणि इतर सामग्री प्रत्यक्ष स्थळी पोहचवता येणार आहे. विशेष म्हणजे आपत्कालीन स्थितीत वाहनचालक-प्रवाशांना तसेच वाहनांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बोगद्यात तब्बल ४५ क्रॉस पॅसेज (एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी वाट) तयार करण्यात येणार आहेत. बोगद्यात प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पादचारी क्रॉस पॅसेज असेल. तर प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेजनंतर एक वाहन क्रॉस पॅसेज असेल. बोगद्याच्या सुरुवातीला एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून तेथे अपघात, दुर्घटनेची माहिती मिळाल्याबरोबर अपघात स्थळाजवळील पादचारी क्रॉस पॅसेज आणि वाहन क्रॉस पॅसेजचे दरवाजे उघडले जातील. त्यानंतर नागरिकांना पादचारी क्रॉस पॅसेजने दुसऱ्या बोगद्यात जाता येईल. वाहनांसाठी असलेल्या क्रॉस पॅसेजमधून वाहनांना बाजूच्या बोगद्यात जाता येईल. वाहनचालक-प्रवासी, वाहने सुरक्षित स्थळी आणून त्यांना बोगद्याबाहेर आणले जाणार आहे. एकूणच क्रॉस पॅसेज आणि आपत्कालीन मार्गिकेमुळे बोगद्यातील प्रवास सुरक्षित होणार आहे.

हेही वाचा >>>ज्ञानव्यापी आणि शाही इदगाह मशीद: ‘हा’ अधिनियम हिंदू याचिकाकर्त्यांना का रोखू शकला नाही?

वन्यजीव मंडळाची परवानगी का?

ठाणे ते बोरिवली अंतर केवळ २० मिनिटात पार करता येऊ शकणाऱ्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया एमएमआरडीएने पूर्ण केली आहे. त्यानुसार हैदराबादस्थित मेघा इंजिनीयरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने निविदा प्रक्रियेत बाजी मारून कंत्राट मिळविले आहे. कंत्राट अंतिम झाल्यानंतर प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्राथमिक कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. त्यानुसार १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या प्रकल्पास केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नसल्याने भूमिपूजनाचा निर्णय रद्द करावा लागला. हा प्रकल्प वन्यजीवांचा अधिवास असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जात असल्याने अधिवासाला धक्का न लागता तेथे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळ आणि राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यानुसार राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी काही महिन्यांपूर्वी मिळाली आहे. मात्र केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळविण्यातही आता एमएमआरडीएला यश आले आहे. गेल्या आठवड्यात ही परवानगी मिळाली असून आता या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे ते बोरिवली प्रवास २० मिनिटांत केव्हापासून?

केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्याने आता भूमिपूजनाचाही मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणावेळी या प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्यात येण्याची शक्यता आहे. भूमिपूजन झाले तरी भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी नऊ-दहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. भुयारीकरणासाठी चार टीबीएम यंत्रे लागणार आहेत. या यंत्रांची निर्मिती पाहिल्यांदाच भारतात होणार आहे. ही यंत्रे तयार करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे काम सुरू होण्यासाठी वेळ लागणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर प्राथमिक कामास सुरुवात होईल. त्यानंतर नऊ-दहा महिन्यात भुयारीकरणास सुरुवात होईल. काम सुरु झाल्यापासून पाच वर्षात काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली असा प्रवास केवळ २० ते २२ मिनिटात करण्यासाठी २०२९-३० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.