Why Mehbooba Mufti and Farooq Abdulla visited Kheer Bhawani temple? काश्मिरी पंडितांसाठी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी अत्यंत महत्त्वाची असते. या दिवशी भक्त जम्मू आणि काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातील तुलमुल्ला येथील राग्न्या देवीची मनोभावे पूजा करतात. हीच देवी खीर भवानी म्हणून प्रसिद्ध आहे.
यावर्षी खीर भवानीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्यांमध्ये पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती , नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचा समावेश होता.
खीर भवानी मंदिर
या देवीला दुधाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो म्हणूनच ती खीर भवानी म्हणून प्रसिद्ध आहे.
- काश्मिरी पंडित समुदाय माता दुर्गेचा अवतार असलेल्या देवी खीर भवानीला त्यांची कुलदेवी मानतो.
- हे मंदिर तुलमुल्ला येथे आहे. तुलमुल्ला हे श्रीनगरच्या ईशान्येस अंदाजे २५ किलोमीटर अंतरावर आहे.
- १२ व्या शतकातील कल्हणाच्या राजतरंगिणी या ग्रंथासह अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या मंदिरांचा उल्लेख आढळतो.
- ‘द मिस्ट्रियस स्प्रिंग ऑफ खीर भवानी’ या पुस्तकात काश्मिरी शिक्षणतज्ज्ञ आणि पक्षीतज्ज्ञ संसारचंद कौल म्हणतात की, भृङ्गीश संहितेच्या राग्न्या प्रादुर्भाव या शेवटच्या अध्यायात या स्थळाचा उल्लेख आहे.
- या मंदिराचे सध्याचे बांधकाम २० व्या शतकातीलच आहे. या बांधकामाचे श्रेय डोग्रा शासक महाराजा प्रताप सिंह यांना जाते. नंतर महाराजा हरि सिंह यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
नागांचे रक्षण आणि लंकेशी असलेले नाते
- एका आख्यायिकेनुसार रावण लंकेत राग्न्या देवीची पूजा करत असे. परंतु, त्याच्या अत्याचाराने नाराज होऊन देवीने लंका सोडली आणि हनुमानाच्या मदतीने काश्मीरमध्ये स्थलांतर केले आणि तुलमुल्ला हे स्थळ निवासस्थान म्हणून निवडले.
- “…रावणाच्या दुष्कर्मांमुळे क्रोधित झालेल्या देवीने त्याला शाप दिला आणि हनुमानाला ३६० नागांसह तिच्या वाहनातून सदसरला (काश्मीर) घेऊन जाण्याचा आदेश दिला.
- हनुमानाने खोऱ्याच्या उत्तरेकडील बाजूस, भोवती बोअरूस (भवानीश), आहतुंग (तुंगिश), लाडवुन (लब्दावन), वोकूर (भागेह) या गावांनी वेढलेल्या परिसरात एक जागा निवडली. इथेच त्याने देवीची स्थापना केली आणि तिच्या सर्व सख्यांसह पूजन सुरू केले. याच देवीला ‘खीरभवानी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. तिला फक्त दूध, साखर, भात आणि इतर शाकाहारी नैवेद्यच प्रिय होते, असे कौल नमूद करतात.
- देवी राग्न्यीशी संबंधित आणखी एका दंतकथेचा उल्लेख करताना कौल त्यांच्या पुस्तकात लिहितात: “…या दंतकथेनुसार खीर भवानीचा झरा कसा सापडला, याची एक वेगळीच कथा सांगितली जाते. कृष्ण पंडित नावाच्या एका ब्राह्मणाला दृष्टांत झाला.
- या दृष्टांतात एका देवतेने (दूत) त्याला सांगितले की, खीर भवानीचा झरा तुलमुल्ला येथील दलदलीत आहे. ‘मी तो झरा कसा शोधू?’ असे त्याने विचारले. त्यावर उत्तर मिळाले, ‘शादीपूर (काश्मीरमधील एक गाव) पर्यंत एक होडी घे आणि तिथून एक साप तुला मार्गदर्शन करेल. ज्या क्षणी तू झऱ्याजवळ पोहोचशील, त्या वेळी साप त्या झऱ्यात उडी घेईल. तोच खीर भवानीचा झरा आहे.’
झरा: रंग बदलणं आणि नशिबाचं प्रतिबिंब
काश्मीरमध्ये ‘नाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र झऱ्याचं पाणी रंग बदलतं, असं मानलं जातं. स्थानिक श्रद्धेनुसार, झऱ्याचे रंग (खोऱ्याच्या) स्थानिक प्रांतांच्या नशिबाचं प्रतिबिंब दर्शवतात.
- निळा आणि हिरवा असे हलके रंग शुभ मानले जातात, तर काळा किंवा लालसारखे गडद रंग संकटाचा इशारा समजले जातात.
- जम्मूचे रहिवासी गिर्जा भट सांगतात, “पिढ्यानपिढ्या स्थानिक लोक झऱ्याच्या पाण्याकडे खोऱ्याच्या भविष्याचा आरसा म्हणून पाहतात. जेव्हा पाणी स्वच्छ असतं, तेव्हा ते सौहार्दाचं लक्षण मानलं जातं; पण जेव्हा ते गडद होतं, तेव्हा अपशकुन मानतात.” यंदा मेळ्यात गेल्यावर “नाग पूयिन ऑस साफ (झऱ्याचं पाणी स्वच्छ होतं)” हे पाहून त्या आनंदी झाल्या.
- काश्मिरी पंडित सांगतात की १९९० मध्ये, त्यांच्या सामूहिक विस्थापनाच्या सुमारास झऱ्याचं पाणी काळं झालं होतं. ही घटना त्यांच्या सामूहिक स्मृतीत आजही कोरलेली आहे.
- दिल्ली विद्यापीठाच्या संशोधक स्वाती टिकू यांनी ‘Manifestation of Goddess Kheer Bhavani: A Psychological Exploration’ या शोधनिबंधात १८८८ मधील ब्रिटीश लँड सेटलमेंट कमिशनर वॉल्टर लॉरेन्स यांचा उल्लेख केला आहे. लॉरेन्स यांनी लिहिलं होतं; “काश्मीरमधील सर्वात पवित्र स्थळ कदाचित खीर भवानीचं आहे; सिंध खोऱ्याच्या तोंडाशी असलेला झरा… मी तुळा मुला येथे खीर भवानीचा झरा पाहिला, तेव्हा त्याला जांभळी छटा होती. पण जेव्हा दुष्काळ किंवा कॉलराची साथ येणार असते, तेव्हा त्याचं पाणी काळं होतं.”
- खीर भवानी मंदिरात दरवर्षी लागणारा मेळा जम्मू अणि काश्मीर धर्मार्थ ट्रस्टच्या व्यवस्थापनाखाली भरतो आणि हजारो भक्तांना दरवर्षी आकर्षित करतो.
- “अष्टमीच्या निमित्ताने भक्त देवी राग्न्येच्या सन्मानार्थ हवन करतात. या वेळी दूध अर्पण करणे, ‘कांड’ (साखरेचा शंकूसारखा पदार्थ) पवित्र झऱ्यात टाकणे, फुलं व सुवासिक पान (व्यान पातर) विखुरणं असे विधी पार पाडले जातात. हा उत्सव काश्मिरी पंडितांच्या विस्थापित समुदायासाठी एकत्र येण्याचा क्षण असतो, श्रद्धेचा नवा संकल्प असतो आणि टिकून राहण्याच्या ताकदीचं प्रतीक असतो,” असं निवृत्त आयएफएस अधिकारी पोष्करनाथ पंडित सांगतात.