अनेक जागतिक शहरांमध्ये शाश्वत शहरी वाहतुकीसाठी सायकलिंग ट्रॅक हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. जेव्हा काटेकोर नियोजन आणि प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते, तेव्हा सायकलने दररोज प्रवास करण्यासही प्रोत्साहन मिळते. सायकलच्या वापरामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होते आणि हवेची गुणवत्ता सुधारते. समर्पित सायकल ट्रॅक जगभरातील शहरांमध्ये आहेत. ॲमस्टरडॅम, बीजिंग आणि इतर अनेक शहरांचा यात सामवेश आहे. शहरी स्थानिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करूनही मुंबईत समर्पित सायकलिंग ट्रॅक योजनेला गती मिळू शकली नाही.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने त्यांच्या गतिशील योजनेचा भाग म्हणून समर्पित सायकलिंग ट्रॅक बांधण्याचा प्रस्ताव दिला. याचे ध्येय कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत प्रवासाला प्रोत्साहन देणे हे होते. असं असताना अलीकडेच बीकेसीची गर्दी कमी करण्यासाठी एक व्यापक योजना सादर करण्यात आली होती. यामध्ये कमी वापरात असलेल्या जागेचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्याची कल्पना मांडण्यात आली.

मुंबईचा सायकलिंग ट्रॅक उपक्रम कधी सुरू झाला?

मुंबईत समर्पित सायकलिंग ट्रॅक संकल्पना पहिल्यांदा २००९ मध्ये उदयास आली. २०११ मध्ये सहा कोटी रुपये खर्च करून हिरव्या रंगाच्या सायकल ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, हा प्रकल्प यशस्वी ठरला नाही. अंमलबजावणी आणि वाहतूक शिस्तीच्या अभावी मोटारसायकलस्वारांनी सायकल ट्रॅकवर अतिक्रमण केले आणि हे ट्रॅक वाहनांच्या पार्किंगसाठी वापरले जाऊ लागले. कालांतराने योग्य देखभाल किंवा सार्वजनिक पाठिंब्यावाचून सायकलिंग ट्रॅक वापरात आलेच नाही.

सायकलिंग ट्रॅकसाठी मुंबईत नक्की काय योजना होती?

गेल्या काही वर्षांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यासह अनेक एजन्सीजने संपूर्ण शहरात समर्पित सायकल ट्रॅकचे जाळे तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत.
२०१० नंतर एमएमआरडीएने त्यांच्या शहरी गतिशीलतेच्या दृष्टिकोनाचा भाग म्हणून अनेक सायकलिंग कॉरिडॉर प्रस्तावित केले. त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्टेशन स्टडी (सीटीएस-२)ने २०४१ पर्यंत मुंबईत १,००० किलोमीटरहून अधिक सायकलिंग ट्रॅक बांधण्याची योजना मांडली होती. प्रस्तावांमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावरील समर्पित ट्रॅक आणि बांधकामाधीन विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉरचा समावेश होता. असं असून यापैकी कोणताही प्रकल्प नियोजन टप्प्याच्या पलीकडे गेलेला नाही.

मुंबई महापालिकेनेही स्वतःचे उपक्रम सुरू केले, त्यामध्ये सायन ते मुलुंडपर्यंत पसरलेल्या तानसा जलवाहिनीच्या बाजूला एक समर्पित सायकलिंग ट्रॅक बांधणे हे सर्वात महत्त्वाचे होते. सुरुवातीला अंमलबजावणी होऊनही हा प्रकल्प दुर्लक्षित राहिला आणि शेवटी त्याबाबतीत पुढे काहीच झाले नाही.

मुंबईत सायकल ट्रॅक का अपयशी ठरत आहेत?

जागतिक स्तरावर आणि मुंबईत व्यायामाचा एक प्रकार म्हणून सायकलिंगला लोकप्रियता मिळाली असली तरी शहरातील समर्पित सायकल ट्रॅक मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले आहेत. शहराचे नियोजन करणारे संबंधित आणि गतिशीलतातज्ज्ञ या अपयशाचे कारण खराब नियोजन, अपुरी पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सहभागाचा अभाव असल्याचे समजतात.
मुंबईत जागेची कमतरता हे एक मोठे आव्हान आहे. रस्ते आधीच गर्दीने भरलेले असल्याने आणि वाहतूक कोंडी ही रोजचीच असल्याने सायकलस्वारांसाठी फक्त रुंद, अखंड पट्टे वाटणे हे सोयीस्कर मानले जाते. उदाहरणार्थ, वांद्रे-कुर्लासारख्या भागात मोटारचालक आणि पादचाऱ्यांमध्ये वारंवार संघर्ष होत आहेत.
अनेक प्रकरणांमध्ये बांधलेले सायकलिंग ट्रॅक आंतरराष्ट्रीय डिझाइन मानकांनुसार नव्हते. असमान पृष्ठभाग, अयोग्य चिन्हे आणि सातत्य नसल्याच्या तक्रारींचा यात सामवेश होता. सायकल भाड्याने देण्याची सेवा दुरुस्ती स्टेशन किंवा सुरक्षित पार्किंग नसल्याने प्रवाशांसाठी दररोज सायकल चालवणे कठीण झाले. आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे अतिक्रमण आणि अंमलबजावणीचा अभाव. कमकुवत देखरेखीमुळे अनेक ट्रॅकवर रस्त्यावरील विक्रेत्यांनी तसंच पार्क केलेल्या वाहनांनी आणि पादचाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यामुळे ते निरुपयोगी झाले आहेत.

“देशाबाहेरील शहरांमध्ये यशस्वी झालेल्या योजना सुरू करण्यापूर्वी आपल्याला प्रथम मुंबईच्या मुख्य पायाभूत सुविधांच्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. जनता आणि नियोजनकार दोघांनीही सायकलिंगला वाहतुकीचे एक गंभीर एकीकृत साधन म्हणून अद्याप पाहिलेले नाही. ही एक अशी योजना होती जी अपयशी ठरणारच होती”, असे शहरातील पहिल्या सायकलिंग ट्रॅक प्रकल्पात सहभागी असलेल्या एमएमआरडीएच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले.

यापुढे काय?

वांद्रे-कुर्ल्यामधील वाहतूक कोंडी वाढल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या परिसरातील सध्या अस्तित्वात असलेले मात्र वापरात नसलेले सायकल ट्रॅक तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडेच झालेल्या एमएमआरडीए बैठकीत मंजूर झालेला हा निर्णय मुंबईतील सर्वात वर्दळीच्या व्यावसायिक जिल्ह्यांधील वाहतूक प्रवाह सुधारण्यासाठी आणि गर्दीच्या वेळी होणारा विलंब कमी करण्यासाठीच्या व्यापक योजनेचा एक भाग आहे. ३७० हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या बीकेसीमध्ये आता दररोज दोन लाखांहून अधिक कर्मचारी आणि चार लाख पर्यटकांची गर्दी होत असते. सायन पूल बंद झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. जड वाहनांना बीकेसीच्या आधीच अरुंद अंतर्गत रस्त्यांवरून जावे लागत आहे, त्यामुळे प्राधिकरणाला अल्पकालीन आणि दीर्घकालीन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जलदगतीने उपाययोजना करणे भाग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपाययोजनेचा एक भाग म्हणून सध्याच्या सायकलिंग पायाभूत सुविधांचे काही भाग अतिरिक्त वाहतूक लेनमध्ये रूपांतरित केले जातील, त्यामुळे रस्त्याची क्षमता प्रति लेन अंदाजे ६०० ते ९०० वाहनांनी वाढेल. म्हणजेच २.७ मीटर रुंदीचे सायकल ट्रॅक दोन पदरी (२+२) रस्ते प्रत्येक दिशेने तीन पदरी केले ​​जातील. एमएमआरडीएने हे बांधण्यासाठी पूर्वी खर्च केलेल्या ६.२५ कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता नव्याने ते ट्रॅक तोडण्यासाठी आणि त्यांचे रस्त्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी आणखी २५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. दरम्यान, सध्या शहरात समर्पित सायकलिंग ट्रॅकसाठी कोणतेही नवीन प्रस्ताव विचाराधीन नाहीत.