८० आणि ९० च्या दशकात मुंबई शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुनियोजीत गुन्हेगारी विश्वाने (oragnised crime) संपूर्ण यंत्रणेला खिळखिळं करून सोडलं होतं. खून, चोऱ्या, गँगवॉर या गोष्टी रोजच्याच झाल्या होत्या. राजकारण, चित्रपटसृष्टी, रीयल इस्टेट अशा वेगवेगळे क्षेत्रावर अन्डरवर्ल्डचा प्रभाव जाणवू लागला होता. मुंबईच्या रस्त्यांवर दिवसाढवळ्या चकमकी बघायला मिळत होत्या. त्यावेळी मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण होता. अमिबासारख्या पसरत चाललेल्या या गुन्हेगरी विश्वाला कुठेतरी आळा घालणं महत्त्वाचं होतं. तेव्हा ए.ए.खान, प्रफुल्ल भोसले, प्रदीप शर्मा, सचिन वाझे, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे यांच्यासारख्या काही पोलिस अधिकाऱ्यांनी अन्डरवर्ल्डच्या मुसक्या बांधायला सुरुवात केली.

त्यांचं सर्वात मोठं हत्यार होतं ते म्हणजे एन्काउंटर. अन्डरवर्ल्डच्या मनात या ऑफिसर्सबद्दल धडकी भरलेली होती, पण हळूहळू या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जाऊ लागलं आणि या अधिकाऱ्यांना ‘वर्दीतील गुंड’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं. याच पोलिस ऑफिसर्सचा हा सगळा अनुभव आणि एकूणच ९० च्या दशकातील मुंबईत वाढणारं अन्डरवर्ल्डचं वर्चस्व यावर भाष्य करणारा एक माहितीपट (documentary) ‘मुंबई माफिया : पोलिस वि. अन्डरवर्ल्ड’ प्रदर्शित झाला आहे. यामध्ये या सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांनी तेव्हाचे त्यांचे अनुभव आणि ‘कायद्याचे रक्षक’ ते ‘वर्दीतील गुंड’ हा प्रवास नेमका कसा झाला याबद्दल त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे.

सध्या हे पोलिस ऑफिसर्स आहेत तरी कुठे?

१९८७ मध्ये पोलीस दलात रुजू झालेले प्रफुल्ल भोसले हे याआधी सिटी बँकेत काम करायचे. प्रफुल्ल भोसले यांनी नाईक गँग. अरुण गवळी गँग, छोटा शकिल गँग यांच्या ८७ कुख्यात गुंडांचे एन्काउंटर केले. घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोप ख्वाजा युनूसच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले, पण त्यांच्या इतर एन्काउंटर्सपैकी कोणत्याच एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं नाही.

मात्र प्रदीप शर्मा आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या एनकाऊंटरच्या बातम्या एका पाठोपाठ एक पेपरात छापून येऊ लागल्या. यापैकी बरीच एन्काउंटर खोटी असल्याचा दावा देखील ह्युमन राईट्स कमिशनने केला होता. ‘टाइम्स मॅगजीन’चा पत्रकार अलेक्स पेरी याने प्रदीप शर्मा यांची खास भेट घेऊन त्यांच्याशी या एन्काउंटर प्रकरणावर चर्चाही केली होती. ही मुलाखत जेव्हा पेपरमध्ये छापून आली तेव्हा खऱ्या अर्थाने या ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ अधिकाऱ्यांवर हळूहळू चौकशी बसवण्यात आली. यानंतर ‘लखन भैय्या’ एन्काउंटरमध्ये प्रदीप शर्मा याचं नाव आलं आणि त्यांना अटकही करण्यात आली.

आणखी वाचा : वडिलांच्या निधनानंतर फराह आणि साजिद खानकडे होते निव्वळ ३० रुपये; ‘या’ दिग्गज लेखकाने केलेली मदत

तब्बल ३ वर्षं प्रदीप शर्मा यांनी तुरुंगवास भोगला आणि पुराव्या अभावी २०१३ मध्ये त्यांची या प्रकरणात निर्दोष सुटका झाली. त्यानंतर दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याला अटक करून प्रदीप शर्मा पुन्हा चर्चेत आले. या अटकेमुळे फारसं काहीच साध्य झालं नाही. २०१९ मध्ये मात्र निवृत्ती घेऊन त्यांनी शिवसेनेकडून निवडणूकसुद्धा लढवली. २०२१ मध्ये ‘मनसुख हिरेन’ याच्या हत्येसाठी पुन्हा प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली, ते अजूनही तुरुंगातच आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र आंग्रे यांनी कोंग्रेस पक्षात प्रवेश केला. सचिन वाझेसुद्धा अंटालिया स्फोटकं प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या सगळ्या अधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी आफताब अहमद खान यांनी खूप आधीच निवृत्ती घेतली होती, पोलिस डिपार्टमेंटमधील एन्काउंटर आणि त्यांचं वाढतं प्रमाण यांच्या ते विरुद्ध होते, २१ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ८१ व्यावर्षी त्यांचे निधन झाले.