India nuclear test Buddha Purnima: भारताच्या इतिहासात अशा काही तारखा आहेत, ज्या भारतीय संस्कृती आणि राष्ट्रशक्तीच्या निदर्शक ठरल्या आहेत.१२ मे (२०२५) रोजी भारतात सर्वत्र बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. ही तिथी भारताच्या इतिहासातील तीन महत्त्वाच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या जागतिक महत्त्वाच्या निर्णयांकडे लक्ष वेधून घेते. बुद्ध पौर्णिमा हा दिवस शांती आणि प्रबोधनाचा दिवस असतो. भारताने या दिवसाचा उपयोग अनेकदा आपल्या राष्ट्रशक्तीच्या निर्णायक आणि धाडसी घोषणांसाठीही केला आहे. तीन वेगवेगळ्या कालखंडातील तीन पंतप्रधान अर्थात इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि आता नरेंद्र मोदी यांनी याच पवित्र दिवशी भारताचं स्थान जागतिक पटलावर अधोरेखित करण्याचं काम केलं.
इंदिरा गांधी आणि ‘स्मायलिंग बुद्धा’ (१९७४)
१८ मे १९७४ रोजी संपूर्ण जग बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना भारताने पोखरण (राजस्थान) येथे पहिल्ली अणुचाचणी यशस्वीरित्या पार पाडली. या चाचणीचं गुप्त नाव होतं, स्मायलिंग बुद्. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली ही चाचणी पार पडली. ती केवळ वैज्ञानिक प्रगतीची निदर्शक नव्हती, तर एक स्पष्ट राजकीय आणि सामरिक पाऊल होतं. बुद्ध पौर्णिमेचा दिवस जगाला शांतीचा संदेश देतो. त्याच दिवशी भारताने अणुशक्तीचं प्रदर्शन केलं आणि त्याचवेळेस हेही जाहीर केलं की, या अणुशक्तीचा वापर भारत शांततेसाठीच करेल. परंतु, कुणी भारताच्या दिशेने नजर जरी वाकडी केली तर आम्ही युद्धसज्जही आहोत, हाही संदेश त्याच वेळेस जगाला दिला.
स्मायलिंग बुद्धा
स्मायलिंग बुद्धा हे भारताच्या पहिल्या अणुचाचणीचं कोडनेम होतं, जी १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे करण्यात आली होती. ‘स्मायलिंग बुद्धा’ हे नाव शांततेचं आणि करुणेचं प्रतीक मानलं जातं. त्याचाच वापर करत भारताने आपल्या ताकदीचा संदेश जगाला दिला. आपण शांततेचे समर्थक आहोत, पण गरज पडल्यास शक्तीचा वापर करण्यासही सिद्ध आहोत. विशेष म्हणजे ही चाचणी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आली होती, ज्यामुळे शांततेच्या दिवशी सामरिक ताकद दर्शवून भारताने जगाला सांगितलं की, शांतीची इच्छा ठेवणाऱ्या राष्ट्रानेही शक्तिशाली असणं आवश्यक आहे. ही घटना भारताच्या अणुप्रकल्पातील एक ऐतिहासिक टप्पा ठरली. या चाचणीमुळे भारताचा समावेश जगातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये होऊ लागला.
वाजपेयींची ‘शक्ती मालिका’ (१९९८)
पहिल्या अणुचाचणीनंतर तब्बल २४ वर्षांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने ‘शक्ती मालिके’ अंतर्गत भारताच्या दुसऱ्या अणुचाचण्या अनुक्रमे ११ आणि १३ मे १९९८ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पार पाडल्या. या चाचण्यांना ‘ऑपरेशन शक्ती’ असं नाव देण्यात आलं होतं. या अणुचाचण्यादेखील बुद्ध पौर्णिमेच्या आसपास करण्यात आल्या आणि त्यामागे केवळ तांत्रिक नव्हे, तर एक स्पष्ट राजकीय आणि तात्त्विक हेतूही होता. पंतप्रधान वाजपेयींनी अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिंटन यांना लिहिलेल्या पत्रात पाकिस्तान आणि चीनकडून निर्माण झालेल्या धोक्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. हे देशांतर्गत एक संयमित पण निर्णायक शक्तिप्रदर्शन होतं. वाजपेयींनी स्पष्ट केलं की, भारत आक्रमक नाही, पण कोणाच्याही दबावाला बळीही पडणार नाही. या चाचण्या भारताच्या अणुशक्तीच्या प्रगत तांत्रिक क्षमतेचं प्रतीक होत्या आणि शांततेच्या अधिष्ठानावर उभं राहूनही भारत गरजेनुसार शक्तिशाली उत्तर देऊ शकतो, हा संदेश त्यांनी जगाला दिला.
मोदी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ (२०२५)
यंदा २०२५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परंपरेला आणखी एक नवीन परिमाण दिलं. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अचूक लष्करी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर या ७ मे रोजी सुरू झालेल्या या मोहिमेत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शांततेचा मार्गही सामर्थ्याच्या माध्यमातूनच जातो. तेही आपल्या पूर्वसुरींप्रमाणेच शांततेची भाषा बोलत होते, परंतु हातात शक्तिशाली शस्त्रे होती. ही तारीख निवडणं योगायोग नव्हता, तर एक जाणूनबुजून केलेली रणनीतिक निवड होती. ही शांततेच्या दिवशी जगाला शक्तीचा संदेश देण्याची भारताच्या राष्ट्रधोरणाची सलग परंपरा आहे.
एक सूत्र, एक विचारधारा
इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे तिन्ही पंतप्रधान वेगवेगळ्या विचारधारा आणि युगांचे प्रतिनिधी होते. परंतु, त्यांना जोडणारी गोष्ट म्हणजे बुद्ध पौर्णिमा. हा दिवस संयम, सामर्थ्य आणि रणनीतीचं एकत्रित प्रतीक आहे. तिघांनीही गौतम बुद्धांच्या जयंतीदिनी भारताच्या दृढतेचे प्रदर्शन केले. शांतता हवीच, पण शत्रूने आपल्या देशाला दुर्बळ समजू नये, हा संदेश दिला.
तीन नेते, तीन क्षण, एक संदेश
भारताने २०२५ साली बुद्ध पौर्णिमा केवळ मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये साजरी केली नाही, तर ती साजरी केली पोखरणपासून पाकिस्तानव्याप्त काश्मीरपर्यंत जिथे शांततेच्या तत्त्वांवर आधारित सामर्थ्याचे स्पष्ट प्रदर्शन करण्यात आले. बुद्धाचा प्रकाश, करुणा आणि संयम यांची आठवण करून देतानाच, भारताने जगाला हेही दाखवून दिलं की, शांती ही फक्त प्रार्थनेत नसते, तर ती सजगतेत, सज्जतेत आणि सामर्थ्याच्या संतुलित वापरात असते. शांततेच्या दिवशी दिलेला हा शक्तीचा संदेश म्हणजे भारताच्या राष्ट्रधोरणात सातत्याने दिसणारी एक रणनीती आहे.