अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार शनिवार, १० मे रोजी सायंकाळी भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधीबाबत मतैक्य झाल्याचे जाहीर केले. पाठोपाठ पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दर आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही शस्त्रसंधीबाबत घोषणा केल्या. त्यामुळे गेले तीन दिवस सुरू असलेल्या धोकादायक चकमकींना पूर्णविराम मिळाला आणि दोन्ही देशांतील सर्वसामान्य जनतेने हुश्श केले. पण अवघ्या काही तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरातमध्ये ड्रोनचे थवे धाडले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर सीमारेषेवर पुन्हा तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. पाकिस्तानची ही कृती चकित करणारी असली, तर या देशावर भरवसा करता येणार नाही, याची पूर्ण कल्पना असल्याने भारतीय सैन्यदले सज्ज आहेत. त्याचबरोबर, शस्त्रसंधीवरून पाकिस्तानी लष्कर आणि तेथील सरकारदरम्यान मतभेद असल्याचेही उघड झाले आहे.
शस्त्रसंधीची घोषणा ट्रम्पकडून
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोश्यल’ या समाज माध्यमावर भारतीय वेळेनुसार सायंकाळी याबाबत घोषणा केली. पाठोपाठ पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दर यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताना ट्रम्प यांचे आभार मानले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही शस्त्रसंधीच्या वृत्ताची पुष्टी केली. त्याच दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी गेल्या २४ तासांमध्ये आपण भारत आणि पाकिस्तानी नेत्यांबरोबर केलेल्या चर्चेला यश आल्याचे जाहीर केले.
अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव?
९ मे च्या रात्री अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा शस्त्रसंधीच्या दृष्टीने निर्णायक ठरल्याचे बोलले जाते. पाकिस्तानात लोकनियुक्त सरकार असले, तरी भारताशी संघर्षाबाबत सगळे निर्णय तेथील लष्कप्रमुख घेत असतात. रुबियो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्याशीही चर्चा केल्याचा दावा केला. त्याबरोबरच ते आणि अमेरिकेचे अध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी ९ तारखेची संपूर्ण रात्र भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केल्याचाही दावा केला आहे. अवघ्या ४८ तासांपूर्वी उपाध्यक्ष व्हान्स यांनी ‘भारत-पाकिस्तान संघर्षाशी आम्हाला काही देणेघेणे नाही’ असे म्हटले होते. त्यामुळे १० तारखेला शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेच्या अध्यक्षांनी करणे धक्कादायक होते.
भारताची भूमिका काय?
शस्त्रसंधीसंदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी १० तारखेच्या सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचा उल्लेखही केला नाही. त्याऐवजी, पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांनी दुपारी भारताच्या लष्करी कारवाई महासंचालकांशी संपर्क साधून शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला, असे मिस्री यांनी सांगितले. त्यामुळे अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने शस्त्रसंधी जाहीर केली, तरी तसे भारताबाबत म्हणता येणार नाही. पाकिस्तानने हल्ले थांबवले नाहीत, तर आम्हीही हल्ले करू अशी भारताची भूमिका होती. भारताच्या दृष्टीने पहलगाम हल्ला ही कुरापत (एस्कलेशन) होती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ हा त्याचा रास्त प्रतिसाद (रिस्पॉन्स) होता.
शस्त्रसंधीचे पाकिस्तानकडून उल्लंघन का?
पाकिस्तानच्या पंतप्रधान तसेच परराष्ट्रमंत्र्यांनी शस्त्रसंधीबाबत अमेरिकेचे जाहीर आभार मानले. सायंकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु नंतर अवघ्या दोन तासांनी पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोनहल्ले आणि गोळीबार सुरू झाला. इतक्या धडधडीतपणे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन कसे केले, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. याचे एक संभाव्य कारण पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांच्यात शस्त्रसंधीवरून एकवाक्यतेचा अभाव हे असू शकते. पण पाकिस्तानी लष्कराने अमेरिकेचा दबावही झुगारून लावला हे बरेचसे अनपेक्षित आहे. ही शक्यता खरी असल्यास भविष्यातही शस्त्रसंधीचे पावित्र्य पाकिस्तानकडून भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने सायंकाळच्या घोषणेदरम्यानच आमचे सैनिक आणि यंत्रणा अजून काही काळ सज्ज राहील असे म्हटले होते. कदाचित पाकिस्तानी लष्कराचा भरवसा न वाटल्यामुळेच भारताची ही भूमिका अद्याप कायम आहे.