Pulwama Attack memory १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस भारताच्या इतिहासात रक्तरंजित ठरला. भारताच्या संरक्षणार्थ लढणाऱ्या ‘त्या’ लढवय्यांच्या रक्ताने या दिवसाचा इतिहास लिहिला गेला. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले. परिणामी या हल्ल्याच्या काही दिवसांनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, त्यामुळे आधीच ताणलेले दोन्ही देशांमधील संबंध अधिकच क्षतिग्रस्त झाले. त्याच पार्श्वभूमीवर प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मृतीला वंदन करून त्या दिवसाच्या घटनेचा हा घेतलेला आढावा!

जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी श्रीनगर -जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील पुलवामा येथील लेथपोरा गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली गाडीसह आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय जवानांच्या दोन गाडयांना (बसेसना) लक्ष्य करण्यात आले, परिणामी ४० जवान शहीद झाले.

satyapal_malik_statement_on_pm_modi_Pulwama_Attack
“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार”, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा दावा; पुलवामाचा हल्ला कसा झाला?
land, BJP MLA, Nagpur,
भाजपा आमदाराला ६०० कोटींची जमीन १ रुपयांत; नागपूर महापालिकेचा अजब कारभार
aditi sarangdhar shares private ride bad experience
Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…
Malegaon bomb blast case
विश्लेषण : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण नेमकं काय आहे? कर्नल पुरोहितचे कनेक्शन काय?

हल्ला कोणी केला?

हा हल्ला पुलवामा येथील गुंडीबाग गावातील आदिल अहमद दार या २१ वर्षीय तरुणाने केला होता. या हल्ल्यानंतर लगेचच जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून एक ध्वनीचित्रफित प्रसिद्ध करण्यात आली. या व्हिडिओ मध्ये दारने “ज्या वेळेस ही ध्वनीचित्रफित तुमच्या हाती लागेल, तो पर्यंत मी स्वर्गाचा आनंद घेत असेन.” असा संदेश काश्मिरी जनतेसाठी दिला होता. आदिल अहमद दार हा लाकडाच्या कारखान्यात कामगार होता. त्याला थेट जैशच्या ‘फिदाईन’ (आत्महत्या) पथकात भरती करण्यात आले होते. १९ मार्च २०१८ साली तो कामासाठी घरातून निघाला आणि परत कधीच घरी गेला नाही. इतकेच नाही तर काश्मीर विद्यापीठातील भूविज्ञानाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेला त्याचा मित्र समीर अहमद दार हा देखील त्या दिवसापासून बेपत्ता होता. काही दिवसांनी दार याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत त्याच्याकडे AK-47 रायफल होती आणि तो स्वत:ला “वकास कमांडो” (Waqas Commando) म्हणवून घेत होता.

अधिक वाचा: जात की बिरादरी: मुस्लीम धर्मात जात व्यवस्था नक्की कशी असते?

हल्ल्यानंतर काय झाले?

या हल्ल्याची जवाबदारी जैश- ए- मोहम्मद या दहशदवादी संघटनेने स्वीकारली, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांना नव्याने तडा गेला. याचीच परिणती म्हणून २८ फेब्रुवारी २०१९ रोजी, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश करून बालाकोटमधील कथित जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर बॉम्बहल्ला केला. याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान हवाई दलाने राजौरी- नौशेरा सेक्टरमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिणामी भारतीय वायूसेनेने याला प्रत्युत्तर देताना मिग २१ बायसन पाकिस्तानच्या हद्दीत घुसले, ते लढाऊ विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानी लष्कराने पकडले, मात्र दोन दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली.

तपासाचा उलगडा कसा झाला?

पुलवामा येथील हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) टीम दुसऱ्या दिवशी काही न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यासाठी श्रीनगरमध्ये दाखल झाली. चौकशीनंतर अनेकांना अटक करण्यात आली. २०२० साली ऑगस्ट महिन्यात जम्मू येथील विशेष न्यायालयात तब्बल १३ हजार ८०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यात मसूद अझहर, रौफ असगर आणि अममार अल्वी यांच्यासह जैशच्या पाकिस्तानस्थित नेतृत्वाचे आरोपी म्हणून नाव नमूद करण्यात आले, विशेष म्हणजे या आरोपींच्या यादीत नऊ स्थानिक संशयितांचा समावेश होता, त्यापैकी सात पुलवामा येथील रहिवासी होते. या हल्ल्याचा सूत्रधार उमर फारूखसह चार पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. इन्शा जान नावाच्या महिलेसह सहा स्थानिक संशयितांना अटक करण्यात आली.

अधिक वाचा: चीनचे परराष्ट्र मंत्री आफ्रिकेत? चीनच्या मनात नक्की आहे तरी काय?

एनआयएने या प्रकरणाचा छडा कसा लावला?

२९ मार्च २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी उपनगरातील नौगाम येथील एका घरावर छापा टाकला. त्यानंतर झालेल्या चकमकीत उमर फारुख आणि कामरान हे दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. उमर हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख ‘मसूद अझहर’ याचा पुतण्या होता. तर कामरान हा आयईडी तज्ज्ञ होता. पोलिसांनी उमरकडून अर्धवट नष्ट झालेला सॅमसंग एस-९ गॅलेक्सी फोन जप्त केला. फोनमध्ये सुरुवातीला काही फारसे सापडले नाही, म्हणून हा फोन नौगाम येथील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला. नंतर, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासाठी हा फोन इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडे (CERT-In) पाठवला. सीईआरटी-इनने उमरने शूट केलेले परंतु नंतर डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ मोठ्या संख्येने पुनर्प्राप्त केले. हा पहिला महत्त्वाचा पुरावा ठरला.

इतकेच नव्हे तर उमर आणि जैश-ए-मोहम्मदचा सर्वोच्च कमांडर मसूद अझहर यांच्यातील संवाददेखील मिळविण्यात टीमला यश आले. उमर आणि इन्शा जान असलेल्या एका फोटोने एनआयए टीमला शाकीर बशीर आणि पीर तारिक अहमद शाह यांच्यासह इतर आरोपींपर्यंत पोहोचवले. शाकीर, इन्शा आणि तिचे वडील शाह यांना एनआयएने ताब्यात घेतले. तपासादरम्यान, अब्बास राथेर, समीर दार, सजाद अहमद भट आणि मुदासीर अहमद खान यांच्यासह आणखी काही नावे समोर आली. आदिल अहमद दार याने हल्ल्यासाठी वापरलेली मारुती इको कार अनंतनाग येथील बिजबेहारा येथे राहणाऱ्या साजाद अहमद भट याने खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. हल्ल्यानंतर भट हा लगेचच भूमिगत झाला होता आणि नंतर झालेल्या हल्ल्यात तो मारला गेला. मुदासीरचाही दक्षिण काश्मीरमध्ये मृत्यू झाला असून समीर दारलाही मारल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.