चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारताने आता २०३५ पर्यंत स्वतःचे अवकाश स्थानक पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. १७ ऑक्टोबर) ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांच्याशी गगनयान मोहिमेबाबत संवाद साधत असताना या महत्त्वाकांक्षी योजनेला लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगितले. अवकाश स्थानक म्हणजे नेमके काय? कोणकोणत्या देशांनी असे स्थानक तयार केले आहे? त्यासंबंधी घेतलेला हा आढाव ….

अवकाश स्थानक म्हणजे काय?

ब्रिटानिकाच्या (ज्ञानकोश) माहितीनुसार, अवकाश स्थानक हे कृत्रिम उपग्रहासारखी रचना असून ती पृथ्वीच्या कक्षेत सोडली जाते आणि तिथेच राहते. मानवाला दीर्घकाळ अंतराळात राहता यावे, यासाठी सर्वप्रकारच्या सोयी-सुविधा या स्थानकात उपलब्ध करण्यात येतात. यामध्ये ऊर्जा, पर्यावरणीय व्यवस्थेचा अंतर्भाव असतो. अवकाश स्थानकाच्या माध्यमातून अनेक कामे केली जातात. जसे की, अंतराळातील घटनांचे निरीक्षण करणे, सूर्य आणि चंद्राचा अभ्यास करणे, पृथ्वीचा अभ्यास करणे आणि मानव दीर्घकाळ अंतराळात राहिल्यानंतर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात, याचेही निरीक्षण करण्यात येते.

Vande Bharat, Tejas,
कोकण मार्गावरील ‘वंदे भारत’, ‘तेजस’ रद्द? ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर रेल्वेगाड्या रद्द असल्याचा संदेश
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

हे वाचा >> भारतीय अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ का म्हणतात? जाणून घ्या या शब्दाचा अर्थ काय

छोटे अवकाश स्थानक हे पृथ्वीवरच जोडून नंतर प्रक्षेपित करण्यात येते. तथापि, मोठे अवकाश स्थानक तयार करण्यासाठी त्याचे छोटे छोटे भाग अवकाशात प्रक्षेपित करण्यात येतात. त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत त्याचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात येतात. अवकाश स्थानकाचे भाग मोकळेच अंतराळात सोडण्यात येतात. क्रू सदस्य आणि इतर वस्तू नंतर वेगळ्या प्रक्षेपित केल्या जातात. त्यामुळे अवकाश स्थानकाला हवा, पाणी, अन्न आणि विविध उपकरणे यांचा पुरवठा करण्यासाठी वारंवार अवकाश वाहतूक करावी लागते.

सौरऊर्जा आणि बॅटरीजच्या माध्यमातून अवकाश स्थानक काम करत असतात. अवकाश स्थानकाचे महत्त्व विषद करताना नासाने म्हटले की, अवकाश स्थानकामुळे मानवाला अंतराळात राहणे शक्य झाले आहे. अवकाश स्थानक अंतराळात पोहोचल्यानंतर अनेकांनी त्यात वास्तव्य केले आहे. असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा अवकाश स्थानकात मानव उपस्थित नव्हता. पृथ्वीवर जे संशोधन करणे शक्य होत नाही, असे मानवाच्या फायद्यासाठी असणारे अनेक संशोधने अवकाश स्थानकात करता येत आहेत, असे नासाने सांगितले.

अवकाश स्थानकात केलेल्या संशोधनातून जे फलित हाती लागते, त्याला ‘स्पिनऑफ्स’ (एखाद्या गोष्टीतून अनपेक्षितपणे निघालेली दुसरी उपयुक्त गोष्ट) असे म्हटले जाते. “अंतराळात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये दीर्घकाळ घालविल्यानंतर मानवी शरीरावर त्याचे काय परिणाम होतात, याचेही संशोधन शास्त्रज्ञ करत आहेत. अंतराळयान सुरक्षित आणि सुरळीत कसे काम करेल? याचाही अभ्यास नासा आणि भागीदार देश करत आहेत. भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे”, असे मत नासाच्या संकेतस्थळावर व्यक्त करण्यात आले आहे.

कोणत्या देशाकडे स्वतःचे अवकाश स्थानक आहे?

स्वतःचे अवकाश स्थानक असलेला चीन हा एकमेव देश आहे. चीनने तयार केलेले “तियांगॉन्ग अवकाश स्थानक” २०२२ पासून अंतराळात कार्यरत आहे. याला ते ‘आकाशातील राजवाडा’ किंवा ‘स्वर्गीय महाल’ असेही म्हणतात. यामध्ये सध्याच्या घडीला दोन पुरूष, एक महिला असे तीन अंतराळवीर आहेत. पृथ्वीपासून या स्थानकाचे अंतर ४५० किमी इतके आहे. नोव्हेंबर २०२२ साली चीनने तियांगॉन्ग अवकाश स्थानकाला शेवटचा आणि अंतिम अवशेष जोडला.

तियांगॉन्ग अवकाश स्थानकामध्ये ‘तिआन्हे’ (Tianhe) हा मुख्य भाग असून त्यामध्ये अंतराळवीर राहतात आणि आपले काम करतात. सेलेस्टियल ड्रीम आणि क्विस्ट फॉर द हेवन्स या दोन प्रयोगशाळा ‘तिआन्हे’च्या दोन्ही बाजूस जोडलेल्या आहेत. तियांगॉन्गमध्ये ११० क्युबिक मीटर (३,८८० क्युबिक फूट) इतकी आत मोकळी जागा आहे. सेलेस्टियल ड्रीम या तिसऱ्या भागामध्ये ३२ क्युबिक मीटर (१,१३० क्युबिक फूट) इतकी मोकळी जागा आहे.

हे वाचा >> अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास देहाचं काय केलं जातं? जाणून घ्या…

चीनने २०२३ साली, जुंटियन (Xuntian) ही महाकाय अंतराळ दुर्बिण प्रक्षेपित करण्याचे नियोजन आखले आहे. ही दुर्बिण तियांगॉन्ग अवकाश स्थानकाचा भाग होणार नाही, पण अवकाश स्थानकाशी समांतर राहूनच दुर्बिणीचा प्रवास असेल. तसेच कधीकधी दुरुस्तीसाठी अवकाश स्थानकाशी दुर्बिण जोडली जाईल, अशी माहिती फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने दिली आहे. तियांगॉन्ग अवकाश स्थानकाला आणखी काही जोडले जाण्याची शक्यता नाही, अद्याप चीनने नवी घोषणा केलेली नाही.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, चीनने याआधी तियांगॉन्ग १ आणि २ असे दोन अवकाश स्थानक कक्षेत पाठविले आहेत. तियांगॉन्ग अवकाश स्थानक हे अवकाश संशोधनाच्या प्रयत्नांमधील चीनची प्रगती आणि वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतीक बनले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून (ISS) चीनला दूर ठेवल्यानंतरही त्यांनी केलेली प्रगती अमेरिकेला आव्हान देणारी आहे.

तियांगॉन्गशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही पद्धतीचे सहकार्य करण्यास नासावर बंदी घालण्यात आलेली आहे.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (ISS) अनेक देशांच्या सहकार्यातून बनले आहे. युरोपियन स्पेस एजन्सी, नासा, रशिया, कॅनडा आणि जपानने हे स्थानक तयार करण्यासाठी सहकार्य केले आहे. १९९८ मध्ये जगभरातील १६ देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या स्थानकाचा पहिला घटक १९९८ साली अंतराळात सोडण्यात आला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर घटक सोडण्यात आले किंवा स्पेस शटलबरोबर तेथे पाठवण्यात आले. सध्या या स्थानकाचे वजन ४६५ टन एवढे आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४०० किमी अंतरावरील कक्षेत हे स्थानक मार्गक्रमण करत असते. मानवाने अवकाशात सोडलेला किंवा अवकाशातच जोडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा घटक म्हणून याकडे पाहिले जाते. यामध्ये सात अंतराळवीर राहू शकतात. तुलना करायची झाल्यास चीनचे तियांगॉन्ग हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या (ISS) आकारमानाच्या तुलनेत केवळ ४० टक्के एवढेच आहे.

फॉक्सवेदर डॉट कॉमच्या माहितीनुसार १९९८ साली आयएसएसचा पहिला झार्या किंवा सनराईज हा पहिला घटक रशियामधून प्रक्षेपित करण्यात आला होता. झार्या हे तात्पुरते नियंत्रण केंद्र होते. त्यानंतर नासाने नोड १ हा घटक स्पेस शटलच्या माध्यमातून प्रक्षेपित केला. नासाच्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर २०२२ साली या स्थानकावर अंतराळवीरांचा पहिला गट पाठविण्यात आला. आयएसएसचे काम पूर्ण करण्यासाठी एक दशकाहून अधिक वेळ आणि ३० हून अधिक मोहिमा हाती घ्याव्या लागल्या. २०११ साली स्थानकाचे पूर्ण झाले.

ताशी २८,१६३ किलोमीटर वेगाने हे स्थानक प्रवास करून पृथ्वीभोवती ९० मिनिटात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. स्पेस डॉट कॉमच्या माहितीनुसार या स्थानकाच्या सौर पट्ट्या एक एकर परिसराएवढ्या पसरल्या आहेत. या स्थानकाचे ४१९,७२५ किलो एवढे अगडबंब वजन आहे. अंतराळवीरांसाठी १३,६९६ क्युबिक फूट इतकी प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आराम करण्यासाठी मोकळी जागा, दोन बाथरूम, जिम अशा सुविधा आतमध्ये आहेत.

आणखी वाचा >> अवकाशाशी जडले नाते: आसमाँ के पार शायद..

अमेरिकेतील हॉस्टन आणि मॉस्कोमध्ये आयएसएसच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच हंट्सविले आणि अलाबामा येथील पेलोड नियंत्रण केंद्रही क्रू सदस्यांना सहकार्य करते. या मोहिमेचे नियंत्रण केंद्र जपान, कॅनडा आणि युरोपमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उघड्या डोळ्यांनीही पाहता येऊ शकते.

प्रचंड पैसा आणि वेळ खर्च करून हे विशाल अवकाश स्थानक अनेक देशांनी एकत्र येऊन तयार केले असले तरी त्याचा अवधी आता संपत आलेला आहे. २०३० नंतर हे स्थानक बंद केले जाण्याची शक्यता आहे. स्पेस डॉट कॉमच्या माहितीनुसार निकामी झाल्यानंतर या स्थानकाला पृथ्वीच्या कक्षेतून बाजूला केले जाईल (deorbited) किंवा भविष्यात नवे अवकाश स्थानक तयार करण्यासाठी त्याच्या भागांचा वापर केला जाईल. यावरून अवकाश स्थानकाचे आयुष्य हे १० ते १५ वर्षांचे आहे, असे अनुमान काढले जात आहे. २०३० नंतर अवकाशात चीनचे तियांगॉन्ग हे एकमेव अवकाश स्थानक असणार आहे.

२०२५ साली भारताची पहिली अंतराळवीर मोहीम

भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्रो) मिशन गगनयानवर जोरात काम सुरू आहे. या मिशनअंतर्गत २०२५ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठविणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी इस्रोशी झालेल्या बैठकीनंतर सांगितले. शुक्र मोहीम आणि मंगळावरील अवतरणासह विविध आंतरग्रह मोहिमांसाठी काम करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी इस्रोच्या वैज्ञानिकांना केले.

“चांद्रयान-३ आणि आदित्य एल१ मोहिमेमध्ये इस्रोला यश मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी निर्देश दिले की, भारताने आता आणखी नवीन आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून अभियान हाती घ्यायला हवे. ज्यामध्ये २०३५ पर्यंत भारतीय अवकाश स्थानक स्थापित करणे आणि २०४० पर्यंत भारताचा अंतराळवीर मंगळ ग्रहावर पाठविणे, या उद्दिष्टांचा नामोल्लेख पंतप्रधानांनी केला”, असे निवेदन बैठकीनंतर सरकारतर्फे देण्यात आले आहे.

आणखी वाचा >> अवकाशस्थानकाची सुरस कथा

‘गगनयान’ मोहिमेअंतर्गत ( Gaganyaan Mission ) इस्रोकडून दोन अंतराळवीर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठविण्यात येणार होते, असे २०२२ साठी नियोजन केले गेले. मात्र, करोना महामारीमुळे आणि इतर अडचणी निर्माण झाल्यानंतर यात खंड पडला. त्यामुळेच आता या मोहिमेची पूर्ती होण्यासाठी २०२५ उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्यासह पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह, पीएमओचे प्रधान सचिव पीके मिश्रा आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.